तीर्थ ब्रह्मगिरी

जटा मंदिर / मुळगंगा मंदिर

त्र्यंबकेश्वर, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक

दृष्टी पडता ब्रह्मगिरी | त्यास नाही यमपुरी |

नामा म्हणे प्रदक्षिणा | त्याच्या पुण्या नाही गणना ||

संतश्रेष्ठ नामदेव महाराज यांच्या या ओवीतून ब्रह्मगिरी पर्वताचे महात्म्य स्पष्ट होते. पुराणकाळापासून अनेक थोर ऋषीमुनींच्या पदस्पर्शाने वास्तव्याने पावन झालेल्या या पर्वताचे आध्यात्मिक महत्त्व मोठे आहे. दक्षिण गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीसह वैतरणा आणि अहिल्या या नद्यांचा उगम याच पर्वतावरून होतो. साक्षात शंकराचे वास्तव्य असलेल्या या ब्रह्मगिरी पर्वताची परिक्रमा केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि फलप्राप्ती होते, अशी भाविकांची दृढ श्रद्धा आहे.

ब्रह्मगिरी हा सह्याद्री पर्वत रांगांमधील एक विशाल पर्वत. समुद्र सपाटीपासून त्याची उंची ४२४८ फूट आहे. महाराष्ट्रातील कळसूबाईनंतर उंचीनुसार दुसऱ्या क्रमांकाचा हा सुळका असल्याचे अभ्यासक सांगतात. हिमालय पर्वताने भूगर्भातून डोके वर काढले नव्हते तेव्हापासून सह्याद्री पर्वत अस्तित्वात आहे. सह्याद्रीच्या या भागास ब्रह्मगिरी असे म्हणतात. ब्रह्मगिरी पर्वताची सद्योजात, वामदेव, अघोर, तत्पुरुष इशान अशी पाच शिखरे आहेत. सद्योजात शिखरापासून गोदावरीचा उगम झाला, तर वामदेव, अघोर, तत्पुरुष, इशान या शिखरांपासून अनुक्रमे वैतरणा, अहिल्या, बाणगंगा, रामगंगा या नद्यांचा उगम झाला. असे सांगितले जाते की ब्रह्मदेवाला सृष्टीनिर्मितीचे ज्ञान झाले ते ठिकाण म्हणजे ब्रह्मगिरी होय!

ब्रह्मगिरी पर्वताची आख्यायिका अशी की महर्षी गौतम ऋषी यांच्या हातून गोहत्या घडली होती. या पापातून मुक्ततेसाठी त्यांनी घोर तपश्चर्या केली शंकराला प्रसन्न करून घेतले. त्यांनी शंकराकडे गंगेची मागणी केली, परंतु गंगा जटेतून बाहेर येण्यास तयार नव्हती. गंगेला भूतलावर अवतीर्ण करण्यासाठी शंकराने तांडव नृत्य केले. त्यावेळी सारी पृथ्वी हादरून गेली. शंकराने आपल्या जटा जोराने जमिनीवर आपटून विश्वकल्याणासाठी गंगेला जटेतून बाहेर काढले. ते स्थान म्हणजे आजचे ब्रह्मगिरीवरील जटा मंदिर होय. ज्यावेळी गंगेचा उगम ब्रह्मगिरीवर झाला ती तिथी होती माघ शुद्ध दशमी. त्यावेळी गुरू सिंह राशीत होता तो दिवस होता गुरुवारचा. दरवर्षी या दिवशी या मंदिरात गंगावतरण उत्सव साजरा केला जातो.

दुसऱ्या आख्यायिकेनुसार, ब्रह्म आणि विष्णू यांच्यात चर्चा सुरू होती. त्यावेळी ब्रह्मदेव म्हणाले की मी सृष्टीचा निर्माता आहे. त्यामुळे शिवमहिमा काय आहे हे मला चांगलेच ठाऊक आहे. विष्णूने मात्र नम्रपणे सांगितले की मी शिवमहिमा जाणून घेण्याचा खूप प्रयत्न केला. त्यासाठी तपश्चर्याही केली. परंतु मला अजूनही शिवाचे पूर्ण ज्ञान झालेले नाही. यानंतर दोघांनीही शंकराचा शोध घेण्याचे ठरवले. ब्रह्माने शंकराचे मस्तक शोधावे आणि विष्णूने चरण शोधावे, असे ठरले. दोघांनी खूप शोध घेतला, पण हाती काहीच लागले नाही. तेव्हा ब्रह्मदेवाने एक बनाव केला. त्यांनी आपल्या सामर्थ्याने एक गाय आणि फूल निर्माण केले आणि त्यांना आपल्या बाजूने साक्ष देण्यास राजी करत आपल्याला शिवाचे मस्तक सापडल्याचा दावा केला. मात्र, देवांना याबद्दल शंका वाटली. ती दूर करण्यासाठी ते थेट शिवलोकात गेले. तिथे त्यांनी शिवाची भेट घेऊन सर्व हकिगत कथन केली. त्यांचे म्हणणे ऐकल्यानंतर ब्रह्मदेवाचा बनाव शंकराच्या लक्षात आला. क्रोधित होऊन शंकराने ब्रह्मदेवाला शाप दिला की आजपासून पृथ्वीवर तुझी कोणीही पूजा करणार नाही. यामुळे ब्रह्मदेवालाही शंकराचा राग आला आणि त्यानेही शंकराला भूतलावर तू पर्वत होऊन राहशील, असा शाप दिला. नंतर मात्र ब्रह्मदेवाला आपली चूक उमगली. त्याने शंकराची तपश्चर्या केली. शंकर प्रसन्न झाले आणि त्याने ब्रह्मदेवाला वचन दिले की पर्वतरूपाने पृथ्वीवर माझे वास्तव्य असेल आणि या पर्वताचे नाव ब्रह्मगिरी असेल! त्यामुळे या पर्वताचे आध्यात्मिक महत्त्व मोठे आहे.

ब्रह्मगिरीची परिक्रमा पुराणकाळापासून प्रचलीत आहे. ही परिक्रमा करेल त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे पुण्य लाभते, असे दाखलेही पुराणांमध्ये आढळतात. या पर्वतावर गहिनीनाथांचे वास्तव्य होते, असे सांगितले जाते. वडील विठ्ठलपंत यांच्यासह ज्ञानेश्वरादी भावंडे या ठिकाणी आली असता, त्यांचे थोरले बंधू निवृत्तीनाथ यांना ब्रह्मगिरीवरच गहिनीनाथांचा अनुग्रह लाभला.

तीन प्रकारे ब्रह्मगिरीची परिक्रमा करण्याचा प्रघात आहे. एक केवळ ब्रह्मगिरी परिक्रमा, दुसरी हरिहर ब्रह्मगिरी परिक्रमा आणि तिसरी अंजनेरी पर्वतासह ब्रह्मगिरी परिक्रमा. या तिघांमध्ये केवळ ब्रह्मगिरीची परिक्रमा सर्वात लहान आणि अधिक प्रसिद्ध आहे. हा परिक्रमा मार्ग सुमारे २० ते २२ किमी एवढा असून साधारणतः ते तासांत परिक्रमा पूर्ण होते. हरिहर ब्रह्मगिरी परिक्रमा ही थोडी मोठी प्रदक्षिणा असून तिचा मार्ग साधारण ३७ किमीचा आहे. तिसरी प्रदक्षिणा ही अंजनेरीसह असून हे अंतर सुमारे ५५ ते ६० किमी आहे.

पहाटे सूर्योदयापूर्वी उठून, कुशावर्तावर स्नान करून, त्र्यंबकेश्वराचे दर्शन करून परिक्रमेस सुरुवात केली जाते. या मार्गावर प्रयाग तीर्थ, सरस्वती तीर्थ, नागा तीर्थ, रामतीर्थ, नरसिंह तीर्थ इत्यादी अनेक तीर्थे लागतात. ब्रह्मगिरी पर्वतावर जटामंदिर, ब्रह्मगिरी मंदिर मूळगंगा मंदिर अशी स्थाने आहेत. त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेणारे अनेक भाविक या पर्वतावर येतात. पण खऱ्या अर्थाने इथे भाविकांची गर्दी जमते ती श्रावण महिन्यात. राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक या काळात येथे दर्शनासाठी येतात. श्रावण महिन्यात त्यातही तिसऱ्या सोमवारी, येथे अलोट गर्दी होते. या काळात ब्रह्मगिरी परिक्रमा केल्याने विशेष फलप्राप्ती होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

परिक्रमेशिवाय इतर वेळीही ब्रह्मगिरी पर्वतावरीव ब्रह्मगिरी मंदिराचे दर्शन घेता येते. तेथे जाण्यासाठी त्र्यंबकेश्वर येथील निवृत्तीनाथ मंदिरापासून पायरी मार्ग आहे. काहीशा अवघड असलेल्या या पायरी मार्गाने ब्रह्मगिरी पर्वतावर पोहचण्यासाठी साधारणतः दोन ते अडीच तास लागतात. ब्रह्मगिरी पर्वत वन विभागाच्या अखत्यारित येत असल्याने पर्वतावर जायचे असेल तर वनविभागाच्या चौकीवर प्रवेश शुल्क भरून जावे लागते. या पायरी मार्गातून जाताना रस्त्यात मुक्तादेवी मंदिर आहे. पर्वतावर गेल्यानंतर काहीसे खाली उतरून ब्रह्मगिरी मंदिरात जाता येते. येथे असलेल्या छोटेखानी प्राचीन मंदिरात शिवपिंडी असून मंदिराच्या समोरील कुंडात गोमुखातून दक्षिण गंगा अर्थात गोदावरीचे पाणी वाहत असते. या परिसरातच मूळगंगा जटा मंदिर आहेत. पावसाळ्याच्या दिवसांत भाविकांबरोबरच पर्यंटकांचीही येथे गर्दी असते.

जटा मंदिर हे येथील प्राचीन मंदिर आहे. मंदिर आकाराने लहान असून काळ्या पाषाणातील आहे. या मंदिरात स्वयंभू शिवलिंग आहे. याच जागेवर शंकराने गुडघ्यावर बसून आपल्या जटेतून गंगेला मुक्त करण्यासाठी येथील दगडावर जटा आपटल्या होत्या. त्या जटांच्या गुडघे जेथे टेकले होते त्या खुणा आजही या मंदिरात पाहता येतात. जटा आपटलेल्या भागातून दक्षिण गंगा अर्थात गोदावरी नदीचा उगम झाल्याचे मानले जाते. येथे श्रावणात केलेला जलाभिषेक, रुद्राभिषेक अत्यंत शुभ मानला जातो. त्यामुळे श्रावणी सोमवारी आणि महाशिवरात्रीला येथे भाविकांची गर्दी असते.

जटा मंदिरापासून पायी पाच मिनिटांवरब्रह्मगिरी मंदिरआहे. ब्रह्मगिरी मंदिराच्या समोरील कुंडात गोमुखातून गंगेचे पाणी पडत असते. तेथून मूळगंगा मंदिराकडे जाता येते. मूळगंगा मंदिरात लहानसे चौकोनी कुंड आहे. हे गंगेचे मूळ प्रकटस्थान मानले जाते. या कुंडातील पाणी कधीच आटत नाही वा त्याची पातळीही कमीजास्त होत नाही. या कुंडातच काळ्या पाषाणात कोरलेली गंगा देवीची मूर्ती विराजमान आहे. येथील दगडी मंडपात गौतम ऋषी आणि त्यांची पत्नी अहिल्या यांच्या प्राचीन मूर्ती आहेत. तेथेच बाजूला शिवपिंडी नंदी आहे. कुंडाच्या वरील बाजूस शिर नसलेली गाय आहे. तिचे शिर हे बाजूलाच असलेल्या ब्रह्मगिरी मंदिरासमोरील कुंडात असल्याचे सांगितले जाते. (आख्यायिकेनुसार गौतम ऋषींच्या हातून गायीचे शिर धडावेगळे झाले होते.) कुंडाच्या बाहेर असलेल्या तीन उंबराच्या झाडांमधून गंगा वाहते. असे सांगितले जाते की गंगा प्रकट झाल्यावर या कुंडात गौतम ऋषींनी स्नान केले होते. हीच गंगा येथून गुप्त होऊन खाली असलेल्या गंगाद्वार येथे प्रकट होते पुन्हा तेथून त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त कुंडातून नाशिक, पंचवटी, पैठण, नांदेड असे मार्गक्रमण करीत बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते.

उपयुक्त माहिती:

  • नाशिकपासून ब्रह्मगिरीच्या पायथ्याचे अंतर ३० किमी 
  • नाशिकहून एसटी महापालिका बस सुविधा
  • खासगी वाहने थेट पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या वाहनतळापर्यंत जाऊ शकतात
  • त्र्यंबकेश्वर येथे निवास न्याहरीसाठी अनेक पर्याय
  • पायरी मार्गावर खाद्यपदार्थांची लहानमोठी दुकाने
Back To Home