लातूर येथील सिद्धेश्वर-रत्नेश्वर देवालय हे राजा ताम्रध्वज यांनी १२ व्या शतकात उभारलेले एक ऐतिहासिक मंदिर आहे. यादव काळातील राजा ताम्रध्वज यांनी आपले गुरू सिद्धरामेश्वर स्वामी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या मंदिराची निर्मिती केली होती. भव्य आणि देखणी स्थापत्यशैली लाभलेले हे मंदिर आणि सभोवतालचा विस्तीर्ण परिसर लातूरकरांच्या अस्मितेचे आणि श्रद्धेचे प्रमुख केंद्र मानले जाते. सामाजिक समतेचा पुरस्कार करणाऱ्या वीरशैव संप्रदायाशी या मंदिराचे नाते अत्यंत दृढ आहे. येथे दररोज भक्त आणि पर्यटकांची मोठी मांदियाळी असते. विशेषतः महाशिवरात्रीच्या उत्सवासाठी या मंदिरात हजारो भाविकांची अलोट गर्दी उसळते.
सिद्धरामेश्वर किंवा सिद्धेश्वर हे १२ व्या शतकातील एक थोर वीरशैव संत होते. योगी, तत्त्वज्ञानी आणि कन्नड कवी असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेले सिद्धेश्वर हे एक महान समाजसुधारकही होते. त्यांनी नेहमीच जातीभेद, वर्णभेद आणि कर्मकांडांना विरोध केला. बसवण्णा, अल्लमप्रभू आणि अक्का महादेवी यांच्यासोबत ते वीरशैव क्रांतीत सहभागी होते. शिवभक्तीत तल्लीन असलेले सिद्धेश्वर लिंगायत संप्रदायाच्या पाच आचार्यांपैकी एक मानले जातात.
अद्वैत, कर्मयोग आणि सामाजिक समता या तत्त्वांना महत्त्व देणाऱ्या सिद्धरामेश्वरांनी शिवभक्तीचा प्रसार केला. राजा ताम्रध्वज त्यांचे अनन्य भक्त होते. यादवकुळातील या राजाने वीरशैव संप्रदायाला नेहमीच राजाश्रय दिला. आपल्या गुरूंप्रती असलेल्या आदरापोटी राजा ताम्रध्वजांनी हे शिवमंदिर उभारले आणि मंदिराचे काम पूर्ण झाल्यावर ते महातपस्वी सिद्धेश्वरांना अर्पण केले.
शैवधर्माला तात्त्विक अधिष्ठानासह व्यावहारिक धर्मात रूपांतरित करणाऱ्या चळवळीचे उगमस्थान म्हणूनही या मंदिराकडे पाहिले जाते. हे मंदिर लातूरचे ग्रामदैवत म्हणून गौरविले जाते. शहराचे प्राचीन नाव ‘रत्नापूर’ असल्याचे मानले जाते; त्यामुळेच येथील महादेवाला ‘रत्नेश्वर’ असेही संबोधले जाते. या मंदिराचा उल्लेख ‘रत्नापूर माहात्म्य’ या पुरातन ग्रंथात आढळतो. काही अभ्यासकांच्या मते हे मंदिर मूळचे पार्वती देवीला समर्पित असल्याचा तर्क केला जातो. त्यासाठी ते गर्भगृहाच्या उजव्या बाजूला असलेल्या शिव-पार्वतीच्या मूर्तीचा दाखला देतात. काहींच्या मते सिद्धेश्वर हे शिवाचेच रूप आहे आणि हे मंदिर त्यांच्याच दैवी स्वरूपाचे प्रतीक आहे. मंदिराच्या भिंतीवर कोरलेल्या आकृत्यांचे संदर्भ काही आख्यायिकांशी जोडले जातात, मात्र त्यांचा निश्चित ऐतिहासिक तपशील उपलब्ध नाही. जाणकारांच्या मते हे मंदिर वीरशैव संप्रदायाच्या उदयाशी निगडित आहे.
१२ व्या शतकात उभारलेल्या या मंदिराचा काळाच्या ओघात अनेकदा जीर्णोद्धार करण्यात आल्याचे संदर्भ मिळतात.
मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत आल्यावर नव्याने बांधलेल्या प्रशस्त कमानदार सभामंडपात प्रवेश होतो. दगडी बांधकामाच्या या सभामंडपात आधुनिक वास्तुकलेच्या खुणा स्पष्टपणे जाणवतात. अनेक खांब आणि महिरपी कमानी असलेल्या या पुरातन वास्तूत आठ पायऱ्या चढून प्रवेश होतो. त्याच्या पुढे आणखी एक दगडी प्रवेशद्वार आहे. त्याच्या ललाटबिंबावर गणेशाची प्रतिमा आहे. त्या प्रवेशद्वारातून पुढे मंदिराच्या मुख्य सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडपात गर्भगृहासमोर नंदीची मूर्ती आहे. काळ्या पाषाणात घडवलेली ही सुबक नंदीमूर्ती एका दगडी पीठावर स्थापित आहे. मूर्तीवरील दगडी दागिने आणि मुखावरील कोरीव काम वैशिष्ट्यपूर्ण आहे. गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीत दोन्ही बाजूंच्या देवकोष्टकांत गणपतीच्या मूर्ती आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारापर्यंत येण्यासाठी तीन बाजूंनी उतरत्या पायऱ्यांची रचना आहे.
गर्भगृहाचे प्रवेशद्वार कमानदार नक्षीने सुशोभित आहे आणि त्याच्या द्वारशाखांवर स्तंभ तसेच तळाशी द्वारपाल कोरलेले आहेत. ललाटबिंबस्थानी गणपतीची धातूची मूर्ती आहे. गर्भगृहात एका पीठावर सिद्धेश्वरांचा मुखवटा आहे आणि त्यामागे चांदीची महिरप आहे. पीठासमोर संगमरवरी दगडांनी वेढलेला एक चौकोनी खोलगट भाग आहे, त्यामध्ये शिवलिंगाचा आकार दिसतो. त्यावर चांदीच्या फणधारी नागाने तोलून धरलेला अभिषेक कलश आहे.
गर्भगृहाच्या प्रदक्षिणा मार्गावर गणपतीसह सप्तमातृकांचे स्थान असलेले देवकोष्टक आहे. गर्भगृहाच्या दोन्ही बाजूंनी छतावर जाण्यासाठी जिने आहेत. या जिन्यांच्या शेजारी एक शंकर-पार्वतीची वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती आहे आणि दुसरीकडे एक ऐतिहासिक शिलालेख जतन करण्यात आलेला आहे. याच शिलालेखावरून या मंदिराचे बांधकाम साधारण सातशे वर्षांपूर्वी झाल्याचे निश्चित होते. मंदिराच्या सभामंडपाच्या शेजारी गुंफेसारखी रचना असलेल्या एका खोलगट भागात शंकराचे आणखी एक स्थान आहे. तेथील नंदीमूर्तीवरही तपशीलवार कोरीव काम आहे. मंदिराच्या अगदी शेजारी बंदिस्त पायऱ्यांची मोठी पुष्करणी आहे. मंदिर परिसरात आणखीही काही छोटी मंदिरे आहेत. मुख्य मंदिराच्या बाजूलाच तीन मंदिरे आहेत.
त्यातील रत्नेश्वराचे मंदिर जास्त मोठे नसले तरी त्यातील शिवपिंडी मात्र विशाल आहे. त्याचे बांधकामही पुरातन शैलीचे आहे. त्याच्या द्वारशाखांवर स्तंभशाखा, सुरसुंदरी आणि द्वारपाल आहेत. शेजारीच नागेश्वर आणि हनुमानाचे मंदिर आहे. हनुमान मंदिराची रचनाही वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि त्याच्या शिखरावर चारही दिशांना वानररूपी मूर्ती आहेत. परिसरात रामलिंगेश्वर, भूतेश्वर, केशवराज, श्रीराम आणि दत्तात्रेयांचीही मंदिरे आहेत. मुख्य मंदिराच्या भिंतीवर अनेक ठिकाणी कोरीव काम केलेली शिल्पे आहेत. त्यामध्ये हत्ती, घोडे तसेच विविध देव-देवतांच्या मूर्तींचा समावेश आहे.
शंकराच्या या मंदिरात साजरा होणारा सर्वात मोठा उत्सव महाशिवरात्रीचा आहे. रत्नेश्वर मंदिराच्या यात्रेची सुरुवातही महाशिवरात्रीपासूनच होते. दहा दिवस चालणाऱ्या या यात्रेच्या काळात सिद्धेश्वर-रत्नेश्वर मंदिरात अनेक धार्मिक कार्यक्रम होतात. या उत्सवात सहभागी होण्यासाठी धाराशिव, नांदेड तसेच कर्नाटक राज्यातूनही मोठ्या प्रमाणावर भाविक येथे येतात. शिवरात्रीच्या आदल्या रात्री बारा वाजता गवळी समाज बांधवांकडून सिद्धेश्वराला दुग्धाभिषेक करण्यात येतो. यानंतरच मुख्य पूजा आणि अभिषेक सुरू होतात. हा पहिला दुग्धाभिषेक करण्याचा मान गवळी समाजाला देण्याची ही प्रथा अनेक पिढ्यांपासून चालत आलेली आहे. श्रावण महिन्यातही मंदिरात विशेष पूजा आणि अभिषेक केले जातात. दररोज सकाळी ५.३० वाजल्यापासून रात्री ८.३० वाजता होणाऱ्या आरतीपर्यंत भाविकांना या मंदिरात दर्शन घेता येते.