श्री क्षेत्र श्रद्धासागर

दर्यापूर रोड, अकोट, ता. अकोट, जि. अकोला

वारकरी संप्रदायाच्या आचार-विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी आयुष्य समर्पित करणारे वासुदेव महाराज यांचे सुंदर मंदिर अकोट येथे आहे. ‘श्री क्षेत्र श्रद्धासागर’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या या मंदिरात वासुदेव महाराजांच्या तसेच विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तीचे दर्शन घडते. प्रारब्धवाद सोडून प्रयत्नवाद अंगिकारण्याचा उपदेश करणाऱ्या वासुदेव महाराजांचे हजारो अनुयायी येथे नित्यनेमाने दर्शनासाठी येतात. या मंदिराच्या परिसरात देवाची आळंदी येथील श्री जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेची राज्यातील पहिली मान्यताप्राप्त उपशाखाही आहे.
वासुदेव महाराज हे शेगावच्या गजानन महाराजांचे पट्टशिष्य श्रीसंत भास्कर महाराज यांचे नातू होत. गजानन महाराजांनी योगसामर्थ्याने भास्कर महाराजांची अकोली जहागीर येथील १२ वर्षे कोरडी पडलेली विहीर सजल केल्याची कहाणी ‘गजानन विजय’ ग्रंथात नमूद आहे. भास्कर महाराजांना गजानन महाराजांनी तेल्हारा तालुक्यातील अडगाव (बुद्रुक) येथे स्वहस्ते समाधी दिली होती. भास्कर महाराजांचे पुत्र पुंडलिक महाराज जायले आणि स्नुषा चंद्रभागादेवी यांच्या पोटी २४ फेब्रुवारी १९१७ रोजी (फाल्गुन शुद्ध तृतिया) वासुदेव महाराजांचा जन्म झाला. वासुदेव महाराज बालपणापासूनच कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते. लहानपणीच त्यांनी वडिलांकडून धर्म, वेद, शास्त्र, पुराण आदींचे धडे घेतले.
वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी त्यांनी काळगव्हाण येथे रामनवमीच्या दिवशी रामजन्माचे कीर्तन केले. मात्र, काही दिवसांतच त्यांना अंधत्व आले. त्यावेळी गजानन महाराजांनी हकीम रूपात येऊन त्यांच्या डोळ्यांमध्ये अंजन घातल्यानंतर तसेच कमरेस ताईत बांधल्यानंतर त्यांची दृष्टी परत आल्याची आख्यायिका सांगण्यात येते.
काही वर्षांनी पितृछत्र हरपल्यानंतर वासुदेव महाराजांनी एका अरण्यात तपश्चर्या केली. तेथे साक्षात्कार झाल्यावर ते पंढरपूर तसेच आळंदीला गेले. त्यानंतर ते सद्‌गुरू जोग महाराज संस्थेत शिक्षणासाठी गेले. या संस्थेचा चार वर्षांचा अभ्यासक्रम एकाच वर्षात पूर्ण केल्यानंतर ते वेदाभ्यास करण्यासाठी काशी येथे गेले. तेथे त्यांनी योगेश्वर झा यांच्याकडे वेदांचे धडे घेतले. त्यानंतर त्यांनी नागझरी येथील श्रीसंत गोमाजी महाराज संस्थानाच्या वारकरी शिक्षण संस्थेत प्राचार्य म्हणून कार्य केले.
शेगाव संस्थानात संतकवी दासगणू हे गजानन महाराज चरित्राचे लेखन करीत असताना तेथे वर्ध्यानजीकच्या सिंधी येथील सद्‌गुरू गौरीशंकर महाराज आले. त्यांनी तेथे बसलेल्या वासुदेव महाराजांना अडगाव (बुद्रुक) येथे जाऊन भास्कर महाराज संजीवन समाधीचा जीर्णोद्धार करण्यास सांगितले. त्यावर त्यांनी ‘जीर्णोद्धारासाठी लागणारे पैसे माझ्याकडे नाहीत. मी आजवर कोणाकडेही काहीही मागितलेले नाही. त्यामुळे एवढे पैसे कसे उभे करायचे,’ असा प्रश्न केला. तेव्हा लोकांनी स्वेच्छेने दिलेल्या वर्गणीतून हा जीर्णोद्धार करण्याचे निर्देश गौरीशंकर महाराजांनी त्यांना दिले. त्यानुसार वासुदेव महाराजांनी लोकवर्गणीतून निधी जमवला आणि १९५५ मध्ये अडगाव (बुद्रुक) येथील संजीवन समाधी स्थानाचा जीर्णोद्धार केला. काही दिवसांनी त्यांनी आकोली जहागीर येथील गजानन महाराजांनी सजल केलेल्या विहिरीचा जीर्णोद्धार केला. आपल्या जीवनकाळात वासुदेव महाराजांनी ३७ ग्रंथांची निर्मिती केली. त्यात श्री गजानन महाराज संपूर्ण चरित्र, सार्थ अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, श्री गजानन भास्कर पासष्टी, श्री गजानन महाराजांची नित्यपूजन पोथी, श्री भास्कर महाराज चरित्र आदींचा समावेश आहे. संपूर्ण मानवजात एक असून भेदाभेद मानू नये, ही शिकवण त्यांनी आपल्या अनुयायांना दिली.
श्री क्षेत्र श्रद्धासागर येथे श्री भास्कर महाराज संस्थानाची स्थापना करणाऱ्या वासुदेव महाराजांनी वारकरी संप्रदायाच्या विचारांचा प्रसार व प्रचार करण्याच्या उद्देशाने या परिसरात वारकरी शिक्षण संस्थेची उभारणी केली. या संस्थेने अनेक मोठ-मोठे कीर्तनकार घडवले आहेत. वासुदेव महाराजांनी येथे भाविकांना पाक्षिक एकादशीचा नियमही घालून दिला. तसेच उन्हाळी बालसंस्कार शिबीराचा उपक्रमही सुरू केला. येथे त्यांनी बारस (द्वादशी) पंगतही सुरू केली. आयुष्याच्या उत्तरार्धात, २००२ मध्ये त्यांनी अडगाव येथील श्रीसंत भास्कर महाराज संजीवन समाधी मंदिर, तेथील धर्मशाळा, सभामंडप, अकोली जहागीर येथील गजानन महाराजांनी सजल केलेली विहीर, तेथील मंदिर, गावातील तीन मजली गुरु-शिष्य मंदिर, आळंदी येथील धर्मशाळा तसेच बेलुरा, अडगाव, अकोली जहागीर येथील कोट्यवधी रुपये किंमतीची शेतजमीन शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थानात विलीन केली. त्यानंतर शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी श्रीक्षेत्र भास्करनगर येथे प्रत्येक एकादशीला कीर्तन केले. गुरुवार २ जुलै २००९ रोजी (आषाढ शुद्ध दशमी) त्यांचे निधन झाले.
अकोट येथे दर्यापूर मार्गावर विस्तीर्ण परिसरात हे मंदिर स्थित आहे. रस्त्यालगत असलेल्या प्रवेश कमानीतून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. दुमजली असलेल्या या मंदिराच्या तळमजल्यावर ध्यानमंदिर आहे. येथे वासुदेव महाराजांच्या पादुका आहेत. ध्यानमंदिराच्या सर्व भिंतीवर भास्कर महाराज, गजानन महाराज तसेच वासुदेव महाराजांची अनेक दुर्मिळ छायाचित्रे लावलेली आहेत. मुख्य मंदिर हे दुसऱ्या मजल्यावर आहे व येथे येण्यासाठी दोन वैशिष्ट्यपूर्ण पायरी मार्ग आहेत. सुमारे २० पायऱ्या चढून मंदिराच्या दर्शनमंडपात प्रवेश होतो. तीन दर्शनमंडप, सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. अर्धखुल्या स्वरूपाच्या या सभामंडपातील नक्षीदार खांब वरील बाजूने महिरपी कमानीने एकमेकांशी जोडलेले आहेत. सभांडपात पुढील बाजूला प्रदक्षिणा मार्ग सोडून गर्भगृहाची रचना आहे. या गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला संगमरवरी द्वारपाल शिल्पे आहेत. प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबस्थानी गणपतीची मूर्ती आहे. गर्भगृहात वज्रपिठावरील मखरात वासुदेव महाराजांची शुभ्र संगमरवरी बैठी मूर्ती आहे. डोक्यावर फेटा, अंगावर कफनी व धोतर ल्यायलेल्या या मूर्तीवर चांदीचे छत्र आहे. या मूर्तीच्या मागील वज्रपिठावर विठ्ठल-रखुमाई विराजमान आहेत. या मूर्तींच्या मागील प्रभावळीवर पाच फण्याचा नाग कोरलेला आहे. आकर्षक बांधकाम असलेल्या या मंदिराच्या दर्शनमंडपांवर तीन लहान शिखरे, सभामंडपावर एक घुमटाकार शिखर व गर्भगृहावर उरुशृंग पद्धतीचे मुख्य शिखर आहे.
मंदिर परिसरात दुमजली वारकरी भवन आहे. येथे देवाची आळंदी येथील श्री जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेची मान्यताप्राप्त उपशाखा आहे. मंदिराच्या विश्वस्त मंडळातर्फे परिसरात ‘मध्यस्थी’ असे नाव असलेल्या वधू-वर सूचक मंडळही चालवण्यात येते. परिसरात श्रद्धेश्वर हनुमान मंदिर, गोशाळा, तसेच विश्वस्त मंडळाचे कार्यालयही आहे. राज्य सरकारने या क्षेत्राला ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला आहे. दररोज सकाळी ६ वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत भाविकांना या मंदिरात दर्शन घेता येते.
वासुदेव महाराजांचा जन्मोत्सव सोहळा येथे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. भक्तिमय वातावरणात होणाऱ्या या सोहळ्यात साधू-संत, महंतांबरोबरच हजारो वारकरी सहभागी होतात. या सोहळ्यानिमित्त काकडा, ज्ञानेश्वरी प्रवचन, वासुदेव महाराज चरित्र ग्रंथ पारायण, श्री ज्ञानेश्वरदास विरचित ग्रंथांवर निरूपण, ज्ञानेश्वरी भावकथा निरूपण, हरिपाठ, आरती, हरिकीर्तन होते. या सोहळ्यानिमित्त अन्नदानही करण्यात येते. सोहळ्यादरम्यान परिसरात आरोग्य तपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात येते. आषाढी तसेच कार्तिकी वारीनिमित्त श्री क्षेत्र श्रद्धासागर येथून पंढरपूर तसेच आळंदी येथे पालखी व दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त दरवर्षी श्री क्षेत्र श्रद्धासागर ते श्री क्षेत्र अकोली जहागीरपर्यंत श्री संत वासुदेव महाराज पायदळ पालखी दिंडी सोहळ्याचेही आयोजन केले जाते.

उपयुक्त माहिती:

  • अकोट बस स्थानकापासून ३ किमी अंतरावर
  • अकोट येथून एसटी व खासगी वाहनांची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा
Back To Home