महाराष्ट्रातील एक महान परिवर्तनवादी संत आणि महानुभाव पंथाचे संस्थापक श्रीकृष्णावतारी चक्रधर स्वामी यांचा अनेकदा विदर्भातही संचार असे. या भागात महानुभाव पंथीयांचे अनेक अनुयायी आजही मोठ्या संख्येने आहेत. याच महानुभाव पंथाचे आराध्यदैवत असलेल्या श्रीकृष्णाचे मंदिर अकोट येथे स्थित आहे. महानुभाव पंथातील हे ‘मांडलिक स्थान’ मानले जाते. येथे भगवान श्रीकृष्णाची काळ्या पाषाणात घडवलेली सुंदर मूर्ती विराजमान आहे. महानुभावांप्रमाणेच परिसरातील विविध पंथांतील लोक मंदिरात दर्शनासाठी मोठ्या संख्येने येत असतात.
महानुभाव पंथाचे संस्थापक श्रीकृष्णावतारी चक्रधर स्वामी यांची कर्मभूमी महाराष्ट्र. त्यांनी आपल्या अनुयायांना ‘महाराष्ट्री असावे’ असा आदेश दिला होता. त्याच प्रमाणे मराठी भाषेस धर्मभाषेची प्रतिष्ठा प्राप्त करून दिली होती. महाराष्ट्रात त्यांनी ठिकठिकाणी भ्रमण केले, वास्तव्य केले. त्यांची पदकमले ज्या-ज्या ठिकाणी लागली ती स्थळे महानुभावांसाठी तीर्थासम पवित्र आहेत. अशा स्थळांना महानुभाव पंथामध्ये चरणांकित स्थान म्हटले जाते. तर ज्या स्थळाशी परंपरेने महानुभाव पंथातील पंचपरमेश्वरांचा संबंध जोडण्यात आलेला आहे किंवा जे चरणांकित स्थानांच्या जवळ आहे, अशा स्थानांना मांडलिक स्थान म्हटले जाते. अकोट येथील श्रीकृष्ण मंदिर हे अशाच प्रकारचे स्थान आहे.
सर्वज्ञ चक्रधर स्वामींचा काळ हा बाराव्या शतकातील आहे. देवगिरी येथील कन्हरदेव, महादेव, आणणदेव आणि रामदेव या यादव नृपतींची कारकीर्द त्यांनी पाहिली होती. ते श्रीकृष्णाचे अवतार असल्याची पंथीय श्रद्धा आहे. त्यांनी ‘उत्तरापंथे प्रयाण’ केल्यानंतर त्यांचे पट्टशिष्य नागदेवाचार्य यांनी त्यांच्या जीवनातील विविध प्रसंग (लीला), तसेच चक्रधरांनी निरुपलेले विचारशास्त्र, अर्थज्ञान यांचे वर्णन केले व ते म्हाइंभट यांनी लिहून घेतले. याच बरोबर म्हाइंभट यांनी स्वामी जेथे जेथे गेले होते, तेथे जाऊन त्यांच्या लीळा एकत्र केल्या. शके १२००च्या मध्यापर्यंत हे कार्य चालले होते. यातून मराठीतील आद्य चरित्रग्रंथ ‘लीळाचरित्र’ साकारला. या ग्रंथानुसार, चक्रधरांचा जन्म गुजरातमधील भडोच येथे झाला.
आपल्या महाराष्ट्र भ्रमणाच्या काळात ते अनेकदा विदर्भात आल्याच्या नोंदी आहेत. ‘लीळाचरित्रा’च्या पूर्वार्धातील १७४व्या लीळेमध्ये ‘तेथौनि गोसावीं मांगळौरा बीजें केलें’ म्हणजे ‘तेथून चांगदेवांनी मांगळौर येथे जाणे केले’ असे म्हटलेले आहे. तर पूर्वार्धातील ८७व्या, तसेच १४६व्या लीळेमध्ये त्यांनी आळेगावी वस्ती केल्याचे म्हटले आहे. मांगळौर म्हणजे आजचे मंगळूर हे गाव बार्शीटाकळी तालुक्यात आहे, तर आळेगाव बालापूर तालुक्यात आहे. ही दोन्ही स्थाने अकोटपासून १२५ किमीच्या अंतरात आहेत. महानुभाव पंथातील आचारधर्मानुसार, यात श्रीकृष्ण, दत्तात्रेय, चांगदेवराऊळ, गोविंदप्रभू आणि चक्रधर स्वामी या पाच परमेश्वरांपैकी कोणत्याही परमेश्वरावताराच्या चरणस्पर्शाने पवित्र झालेल्या ‘संबंधी’ पाषाणाची किंवा त्या पाषाणाच्या घडलेल्या मूर्तीची स्थापना केली जाते. पंथीय श्रद्धेनुसार, ज्या वस्तूला परमेश्वरावतार मुद्दामहून स्पर्श करतात, त्या वस्तूत परमेश्वराची कृपाशक्ती व मायाशक्ती या दोन्ही शक्ती विद्यमान असतात. अशा पाषाणास वा त्यापासून तयार केलेल्या मूर्तीस ‘विशेष’ असे संबोधले जाते. अकोटमधील श्रीकृष्ण मंदिरातील कृष्णमूर्ती ही अशा प्रकारे ‘विशेष’ आहे. मंदिरातील या मूर्तीची स्थापना १७ मार्च १९९१ रोजी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर करण्यात आली. माहूर, गोवर्धन पर्वत, रिद्धपूर व डोमेग्राम येथील ‘विशेष’ (पवित्र पाषाण) ही मूर्ती घडवताना वापरण्यात आले आहेत. त्यामुळे महानुभाव तत्त्वानुसार ही मूर्ती ‘नमस्कारी’ म्हणजेच वंदनीय मानली जाते. राजापेठ येथील महानुभाव आश्रमातील संन्यस्त महात्मे पंडितराज दादा कारंजेकर यांनी ही मूर्ती साकारली आहे.
अकोट शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हे मंदिर आहे. मंदिराभोवती असलेल्या आवारभिंतीत दोन प्रवेशद्वारे आहेत. यातील मुख्य प्रवेशद्वार दुमजली आहे. या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला कक्षासने आहेत. या प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रागंणात प्रवेश होतो. पेव्हरब्लॉकची फरसबंदी असलेल्या या प्रांगणात भाविकांना बसण्यासाठी आसने आहेत. सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. कमानीकृती प्रवेशद्वारातून अर्धखुल्या सभामंडपात प्रवेश होतो. या सभामंडपात सर्वत्र संगमरवरी फरसबंदी आहे. येथून पुढे अंतराळाचे प्रवेशद्वार आहे. अंतराळाच्या लाकडी प्रवेशद्वाराच्या द्वारशाखेवर नक्षीकाम आहे. अंतराळाप्रमाणेच गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर मंगलकलश व पर्णवेलींचे नक्षीकाम आहे. गर्भगृहात उंच संगमरवरी वज्रपिठावर बासरीवादन करणाऱ्या श्रीकृष्णाची मूर्ती आहे. मूर्तीच्या डोक्यावर सुंदर मुकूट व मागील बाजूला गाय आहे. याशिवाय गर्भगृहात कृष्णमूर्तीच्या दोन्ही बाजूला विशेष पाषाण आहेत.
या मंदिरात कृष्णजन्माष्टमी, दत्तजयंती, त्याच प्रमाणे दर भाद्रपद शुद्ध द्वितीयेला चक्रधर जयंती, भाद्रपद शुद्ध त्रयोदशीला गोविंदप्रभू जयंती हे सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. या वेळी मंदिरात मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती असते.