महाराष्ट्राच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक इतिहासात वारकरी संप्रदायाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. या संप्रदायातील प्रमुख संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांची देहू ही कर्मभूमी आहे. हे क्षेत्र भक्ती आणि वैराग्यासाठी ओळखले जाते. इंद्रायणी नदीच्या काठी वसलेल्या या गावाला साडेतीनशे वर्षांहून अधिक जुना ऐतिहासिक वारसा लाभला आहे. येथील प्रत्येक वास्तू विठ्ठल भक्तीने भारलेली आहे आणि ती तुकोबांच्या जीवनप्रवासाची साक्ष देते. या क्षेत्राला भाविक वैकुंठ स्वरूप मानतात. देहूतील विठ्ठल मंदिर, जन्मस्थान, शिळा मंदिर आणि वैकुंठगमन स्थान ही महत्त्वाची धार्मिक ठिकाणे आहेत.
संत तुकाराम महाराज हे सोळाव्या शतकातील महाराष्ट्रातील एक अत्यंत प्रभावशाली संत आणि कवी होते. त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील देहू या गावी झाला.
त्यांच्या जन्माच्या वर्षाबद्दल इतिहासकारांमध्ये मतभेद असले तरी इसवी सन १६०८ हे त्यांचे जन्मवर्ष मानले जाते. त्यांचे पूर्ण नाव तुकाराम बोल्होबा आंबिले असे होते. त्यांचे घराणे पिढ्यानपिढ्या देहूमध्ये किराणा मालाचा व्यापार आणि सावकारीचा व्यवसाय करत असे. त्यांचे वडील बोल्होबा आणि आई कनकाई हे दोघेही पंढरपूरच्या विठ्ठलाचे परम भक्त होते. तुकाराम महाराजांचे बालपण एका सधन आणि सुखी कुटुंबात गेले. त्यांच्या घराण्याला समाजात मोठा मान होता आणि त्यांची आर्थिक स्थितीही उत्तम होती.
वयाच्या अठराव्या वर्षी त्यांच्या आयुष्यात मोठा बदल घडवणाऱ्या घटना घडल्या. महाराष्ट्रात त्या काळी मोठा दुष्काळ पडला होता. तो ‘दशमान दुष्काळ’ म्हणून ओळखला जातो. या भीषण दुष्काळात तुकाराम महाराजांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांची पहिली पत्नी रखुमाबाई आणि त्यांचा थोरला मुलगा यांचा अन्नावाचून मृत्यू झाला. व्यापारात मोठे नुकसान झाले आणि घरात गरिबी आली. या लागोपाठ आलेल्या संकटांमुळे तुकाराम महाराजांचे मन संसारातून उडाले. त्यांनी लोकांची देणी देण्यासाठी आपल्या हिश्श्याची सावकारीची कागदपत्रे इंद्रायणी नदीत बुडवून टाकली आणि अनेक गरीब शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले. यानंतर ते आत्मचिंतनासाठी देहू जवळील भामचंद्र डोंगरावर जाऊ लागले.
डोंगरावरील एकांतात त्यांनी ईश्वराचे चिंतन आणि नामस्मरण केले. तिथेच त्यांना कवित्वाची स्फूर्ती मिळाली. त्यांनी विठ्ठलभक्तीवर आधारित हजारो अभंग रचले. त्यांचे अभंग हे केवळ काव्य नाही, तर त्यात मानवी जीवनाचे सार आणि समाजातील चुकीच्या वागण्यावर केलेले प्रहार होते. ‘जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले’ यांसारख्या शब्दांतून त्यांनी माणुसकीचा धर्म मांडला.
तुकाराम महाराजांचे कार्य हे केवळ धार्मिक स्वरूपाचे नव्हते, तर ते सामाजिक सुधारणेचेही होते. त्यांनी जात-पात आणि उच्च-नीच असा भेदभाव नाकारला. त्यांच्या विचारांचा प्रभाव त्या काळातील जनमानसावर मोठा होता. स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा तुकाराम महाराजांच्या विचारांनी प्रेरित होते. शिवरायांनी त्यांना भेटीसाठी बोलावले होते आणि नजराणाही पाठवला होता. परंतु तुकाराम महाराजांनी तो नम्रपणे नाकारून विरक्तीचा आदर्श घालून दिला.
संत कवी महिपती यांच्या ‘भक्तिविजय’ ग्रंथात व डॉ. सदानंद मोरे यांच्या ‘तुकाराम दर्शन’ या पुस्तकात दिलेल्या माहितीनुसार,
संत तुकाराम महाराजांच्या कुळाचे मूळ पुरुष विश्वंभर बाबा यांच्यापासूनच या घराण्यात पंढरीची वारी आणि विठ्ठल भक्तीचे संस्कार रुजले. ऐतिहासिक नोंदींनुसार तुकोबांचे आठवे पूर्वज असलेले विश्वंभर बाबा हे विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते आणि वयोमानामुळे त्यांना जेव्हा पंढरपूरची वारी करणे कठीण झाले तेव्हा पांडुरंगाने त्यांना स्वप्नात साक्षात्कार दिला. देहू गावातील एका आंबा बागेत जिथे तुळशीची पाने व फुले सापडतील तिथे उत्खनन करण्यास देवाने सांगितले आणि त्या ठिकाणी विश्वंभर बाबांना विठ्ठल व रखुमाईच्या अत्यंत सुंदर तसेच स्वयंभू मूर्ती प्राप्त झाल्या. याच पवित्र जागी त्यांनी देहूतील पहिले विठ्ठल मंदिर उभारले आणि हाच देऊळवाडा पुढे तुकोबांच्या आध्यात्मिक प्रवासाचा मुख्य आधार बनला.
तुकोबांच्या जीवनातील सर्वात श्रद्धापूर्ण प्रसंग म्हणजे त्यांच्या अभंगांच्या वह्या इंद्रायणी नदीत बुडवल्या जाणे आणि त्या पुन्हा कोरड्या बाहेर येणे हा होय. तत्कालीन कर्मठ विचारांच्या लोकांनी तुकोबांना अभंग रचण्याचा अधिकार नाकारला व त्यांच्या गाथा नदीत बुडवण्याची कठोर शिक्षा दिली. आपल्या साहित्याचा त्याग करून तुकोबांनी इंद्रायणी काठी एका शिळेवर १३ दिवस अन्नपाणी त्यागून तपस्या केली आणि विठ्ठलाच्या कृपेने त्या वह्या पाण्यावर कोरड्या अवस्थेत तरंगून वर आल्या, अशी मान्यता आहे.
वारकरी संप्रदायातील मान्यतेनुसार संत तुकाराम महाराज हे मृत्यू पावले नाहीत तर ते फाल्गुन वद्य द्वितीयेला सदेह वैकुंठाला गेले. ज्या वेळी ते इंद्रायणी नदीच्या काठावरून निजधामाकडे निघाले तेव्हा प्रत्यक्ष विष्णूचे विमान त्यांना नेण्यासाठी अवतरले, अशी भाविकांची धारणा आहे. या कारणामुळे देहूत तुकोबांची समाधी पाहायला मिळत नाही. येथे केवळ वैकुंठगमन मंदिर उभारलेले आहे. या मंदिरांच्या देखभालीसाठी आणि प्रसादासाठी ऐतिहासिक काळात विविध मराठा शासकांनी जमिनी व सनदा प्रदान केल्या होत्या. यामध्ये प्रामुख्याने छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्या कालखंडातील महत्त्वपूर्ण राजकीय नोंदी आढळतात. तुकोबांच्या सदेह वैकुंठगमनानंतर त्यांचे कनिष्ठ पुत्र नारायण महाराज यांनी या मंदिराचा मोठा विस्तार केला आणि १७२३ मध्ये सध्याचे भव्य दगडी मंदिर बांधून पूर्ण केले.
देहू गावाच्या वेशीवर सुमारे पन्नास फूट उंचीचे भव्य प्रवेशद्वार आहे. तीन मंडप व आठ स्तंभ असलेल्या या प्रवेशद्वारात एकूण बारा महिरपी कमानी आहेत. प्रवेशद्वारातील मधले मंडप सर्वाधिक उंच आहेत. या मंडपाच्या छतावरील मेघडंबरीत संत तुकाराम महाराजांची मूर्ती आहे. मुख्य रस्त्यावरून इंद्रायणीकडे जाताना ‘चौदा टाळकरी प्रवेशद्वार’ लागते. दोन्ही बाजूस चौकोनी स्तंभ व स्तंभांवरील सज्जावर सलग असलेल्या तीन मेघडंबरी असे प्रवेशद्वाराचे स्वरूप आहे. मेघडंबरीतील सर्व स्तंभ एकमेकांना महिरप कमानीने जोडलेले आहेत. मेघडंबरीच्या छतावर शिखरे आहेत. प्रवेशद्वारातील चौकोनी स्तंभांवर देवकोष्टके आहेत आणि त्यात चौदा टाळकरी संतांची शिल्पे आहेत.
मुख्य मंदिराकडे येताना रस्त्याच्या दुतर्फा पूजा साहित्य, खाद्यपदार्थ, कपडे, खेळणी, भांडी, धातूच्या वस्तू इत्यादींची दुकाने आहेत. काही अंतर चालून आल्यावर देऊळवाडा परिसरात प्रवेश होतो. देऊळवाड्याचा जीर्णोद्धार काही वर्षांपूर्वीच झाला असला तरी त्याचे स्वरूप प्राचीन आहे. भक्कम तटबंदी असलेल्या या देऊळवाड्याचे दुमजली प्रवेशद्वार विशाल आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस दर्शनी भिंतीवर गरुड व हनुमंत यांची शिल्पे कोरलेली आहेत.
प्रवेशद्वारासमोर दोन्ही बाजूस पाषाणी कठडे आहेत आणि आतील बाजूस पहारेकरी कक्ष आहेत. प्रवेशद्वाराच्या वरील मजल्यावर नगारखाना आहे. येथे तुकाराम महाराजांचे वैकुंठगमन शिल्प अशा पद्धतीने लावलेले आहे की ते अधांतरी भासते.
मंदिराच्या फरसबंदी प्रांगणात दोन दीपमाळा आहेत. प्रांगणात तटबंदीला लागून ऐसपैस ओवऱ्या आहेत. तटबंदीत इतर दिशांनाही प्रवेशद्वारे आहेत. प्रांगणात मधोमध संत तुकाराम महाराजांचे मंदिर आहे. फक्त सभामंडप असलेल्या या पालखी मंदिरास चारही बाजूस प्रत्येकी तीन प्रवेशद्वारे आहेत. संपूर्ण मंदिरावर बाहेरील बाजूने नक्षीकाम केलेले आहे. सभामंडपात संत तुकाराम महाराजांची पालखी आहे. तिथे त्यांच्या नित्य वापरातील भांडी व इतर वस्तूही आहेत. मंदिराच्या छतावर घुमटाकार शिखर व त्यावर कळस आहे.
या मंदिराच्या बाजूला प्रांगणात विठ्ठल रखुमाई मंदिर आहे. मंदिरासमोर उजव्या व डाव्या बाजूला दोन लहान देवळ्या आहेत. त्यात गरुड व हनुमंत यांच्या मूर्ती आहेत.
सभामंडप व गर्भगृह अशी विठ्ठल रखुमाई मंदिराची रचना आहे. सभामंडपास समोर, डाव्या व उजव्या बाजूला दरवाजे आहेत. प्रवेशद्वाराच्या नक्षीदार द्वारशाखा पितळी पटलाने मढवलेल्या आहेत. दाराच्या वरील भागावर गणपती शिल्प व भिंतीच्या बाहेरील भागावर कीर्तिमुख आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस मत्स्य शिल्पे आहेत आणि दोन्ही बाजूस दर्शनी भिंतीवरील देवकोष्टकांत गणपतीच्या मूर्ती आहेत. सभामंडपात भिंतीस लागून स्तंभ आहेत. गर्भगृहात वज्रपीठावर विठ्ठल-रखुमाई यांच्या काळ्या पाषाणातील मूर्ती आहेत. सभामंडपाच्या छतावर घुमटाकार शिखर व त्यावर एकावर एक असे दोन आमलक आणि कळस आहेत. गर्भगृहाच्या छतावर गोलाकार व वर निमूळते होत गेलेले उंच शिखर आहे. मंदिरासमोर पद्मचौथऱ्यावर वारकरी ध्वज पताका स्तंभ आहे.
विठ्ठल रखुमाई मंदिराच्या बाजूला शिळा मंदिर आहे. संत तुकाराम महाराजांच्या गाथा इंद्रायणी डोहात बुडवल्यानंतर विचारमग्न अवस्थेत महाराज तेथे तेरा दिवस बसले होते, असे सांगितले जाते. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस मयूर नक्षी आहे. संपूर्ण मंदिरावर आत व बाहेरील बाजूने पशू, पक्षी, पाने-फुले व देवीदेवतांची नक्षी कोरलेली आहे. गर्भगृहात महाराजांची योगमुद्रेतील व हातात वीणा असलेली काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. तुकाराम महाराज मंदिराच्या बाजूला संत बहिणाबाई यांचे मंदिर आहे.
प्रांगणात श्रीराम मंदिर देखील आहे. सर्व मंदिरे उंच चौथऱ्यावर असल्यामुळे प्रवेशद्वारांसमोर पायऱ्या आहेत. सभामंडप व गर्भगृह अशी रचना असलेल्या या मंदिराच्या गर्भगृहात वज्रपीठावर श्रीराम, लक्ष्मण, जानकी व हनुमान यांच्या मूर्ती आहेत. देऊळवाड्याच्या बाजूला संत तुकाराम महाराजांचे द्वितीय पुत्र नारायण महाराजांचे समाधी मंदिर आहे. आठ स्तंभांवर छत व छतावर शिखर असलेल्या अर्धखुल्या स्वरूपाच्या अष्टकोनी मंदिरात बाह्य बाजूने लोखंडी जाळ्या लावल्या आहेत. मंदिरात मधोमध समाधीचा चौथरा आहे आणि त्यावर पद्मपादुका व मागे वज्रपीठावर नारायण महाराजांची मूर्ती आहे.
नारायण महाराजांनी पालखी सोहळा सुरू केला होता, त्यामुळे त्यांना पालखी सोहळ्याचे जनक म्हटले जाते. येथूनच काही अंतरावर इंद्रायणीच्या घाटावर संत चोखामेळा यांचे मंदिर आहे. मंदिरात वज्रपीठावर संत चोखामेळा यांची योगासन मुद्रेतील मूर्ती आहे.
येथून जवळच संत तुकाराम महाराज वैकुंठगमन स्मृती मंदिर आहे. नक्षीदार द्वारशाखा व तोरण असलेल्या या मंदिरात तुकोबांची मूर्ती आहे आणि मागे विठ्ठल रखुमाई यांच्या मूर्ती आहेत. छतावर गोलाकार निमूळते शिखर आहे. शीर्षभागी आमलक व कळस आहे. मंदिराच्या सभोवतीच्या प्रांगणात तुकाराम महाराजांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या प्रसंगांची शिल्पे लावलेली आहेत. याच प्रांगणात नांदुरकी वृक्षाखाली वैकुंठगमन स्थान आहे. संत तुकाराम महाराज येथूनच पुष्पक विमानाने सदेह स्वर्गास गेले, अशी भाविकांची श्रद्धा आहे. तुकाराम बीजेच्या दिवशी दुपारी बारा वाजता हा वृक्ष थरथरतो, असे सांगितले जाते.
देऊळवाड्यापासून काही अंतर पुढे चालून गेल्यावर संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थळ असलेला वाडा आहे. या दुमजली वाड्याचा अलीकडील काळात जीर्णोद्धार झाला असला तरी त्याचे मूळ स्वरूप अबाधित आहे. वाड्यातील लाकडी स्तंभांवर तख्तपोशी आहे आणि त्यावर दुसऱ्या मजल्याचा सज्जा व सज्जावरील स्तंभांवर छत आहे. येथे भिंतींवर विविध साधू-संतांच्या प्रतिमा आहेत. येथेच महाराजांच्या अभंगातील पदे लिहिलेली आहेत. वाड्याच्या आतील खोलीत वज्रपीठावर संत तुकाराम महाराज यांची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. याच वाड्यातील दुसऱ्या खोलीत संत तुकाराम महाराजांची पत्नी जिजाबाई यांची मूर्ती आहे. तुकाराम महाराजांच्या जन्मस्थळाच्या बाजूला इनामदार वाडा आहे आणि येथे महाराजांचे काही वंशज राहतात. पालखीच्या पहिल्या मुक्कामाचा मान या वाड्यास आहे.
देऊळवाड्यापासून एक किलोमीटर अंतरावर इंद्रायणी नदीच्या तीरावर नव्याने बांधण्यात आलेले भव्य गाथा मंदिर आहे. प्रशस्त प्रांगण, प्रांगणात सुंदर कारंजे, बहुमजली वास्तू आहे आणि मुख्य मंदिरात जाण्यासाठी सुमारे चाळीस पायऱ्या आहेत. पायरी मार्गाच्या दोन्ही बाजूला झूल पांघरलेल्या गजराजांची शिल्पे, प्रशस्त सभामंडप, छतावर घुमटाकार शिखरे, शिखरावर कळस असे गाथा मंदिराचे भव्य दिव्य स्वरूप आहे. मंदिराच्या संगमरावरी भिंतींवर सुमारे ४५०० अभंग व महाराजांचा जीवनपट शिल्प स्वरूपात कोरलेला आहे. मंदिरात तुकाराम महाराजांची मूर्ती आहे. आषाढी एकादशीला तुकाराम महाराजांची पालखी याच ठिकाणाहून पंढरपूरला प्रस्थान करते. मंदिराच्या मागे इंद्रायणीच्या काठावर घाट विकसित केला आहे. हे ठिकाण म्हणजेच इंद्रायणी डोह होय. याच ठिकाणी तुकोबांची गाथा नदीत बुडवली गेली होती.
देहूमध्ये वर्षभर विविध धार्मिक उत्सव आणि सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. फाल्गुन वद्य द्वितीयेला साजरा होणारा तुकाराम बीज हा येथील सर्वात मोठा उत्सव मानला जातो आणि या दिवशी लाखो भाविक देहूत दर्शनासाठी गर्दी करतात. या दिवशी दुपारी वैकुंठगमन सोहळा होतो व येथील नांदुरकी वृक्षाच्या दर्शनासाठी रांगा लागतात. असे सांगितले जाते की आजही तुकाराम बीजेच्या दिवशी दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी हे नांदुरकीचे झाड प्रत्यक्ष हलते. ज्येष्ठ महिन्यात देहू येथून निघणारा आषाढी वारी पालखी सोहळा हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचा महत्त्वाचा सोहळा मानला जातो. तुकोबांच्या पादुका पालखीत ठेवून वारकरी विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान करतात. या पालखी सोहळ्याची परंपरा तुकोबांचे चिरंजीव नारायण महाराज यांनी सुरू केली व ती आजही अखंडपणे चालू आहे. माघ शुद्ध पंचमीला म्हणजेच वसंत पंचमीच्या दिवशी तुकोबांचा जन्मोत्सव देहूतील जन्मस्थान मंदिरात पारंपरिक पद्धतीने साजरा होतो. आषाढी एकादशी व कार्तिकी एकादशीला देहूमध्ये मोठ्या जत्रा भरतात आणि त्यावेळी भजन तसेच कीर्तनाचे अखंड कार्यक्रम आयोजित केले जातात. भाविकांच्या निवासासाठी आणि भोजनासाठी संस्थानमार्फत व्यवस्था केली जाते.