संगमेश्वर महादेव मंदिर

तुळापूर, ता. हवेली, जिल्हा पुणे

तुळापूर येथील संगमेश्वर महादेव मंदिर भीमा, भामा आणि इंद्रायणी नद्यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेले आहे. हे मंदिर सुमारे एक हजार वर्षांपूर्वीचे असून याची बांधणी हेमाडपंती स्थापत्यशैलीत केलेली आहे. या क्षेत्राला ‘दक्षिण काशी’ म्हणून ओळखले जाते. येथे छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान झाले आणि याच ऐतिहासिक महत्त्वामुळे या स्थळाला मोठी ओळख मिळाली. मंदिर परिसरात छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक आहे. फाल्गुन अमावास्येला येथे ‘शौर्य दिन’ पाळला जातो आणि त्यानिमित्त महाराष्ट्रभरातून हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. महाराष्ट्र सरकारने या परिसराला ‘अ’ दर्जाच्या तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला आहे.

या तीर्थक्षेत्राची ऐतिहासिक पार्श्वभूमी अत्यंत प्राचीन आणि महत्त्वपूर्ण घटनांनी भरलेली आहे. मूळ संगमेश्वर मंदिराचे बांधकाम साधारण एक हजार वर्षांपूर्वी यादव काळात झाल्याचे ऐतिहासिक संदर्भ आहेत. चौदाव्या शतकात भारतात झालेल्या परकीय आक्रमणांच्या काळात हेमाडपंती वास्तुशैलीतील हे मूळ मंदिर उद्ध्वस्त झाले होते. त्यानंतर सतराव्या शतकाच्या सुरुवातीला नगरगाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गावाच्या इतिहासात मोठे बदल झाले. विजापूरच्या आदिलशाही दरबारातील प्रभावशाली वजीर मुरारपंत जगदेव पंडित एका असाध्य व्याधीने त्रस्त झाले होते. त्यांना विविध उपचारांनंतरही आराम मिळत नव्हता. हितचिंतकांच्या सल्ल्यानुसार त्यांनी नगरगाव येथील सिद्धपुरुष स्वामी रुद्रनाथ महाराज यांची भेट घेतली व स्वामींच्या उपचारांनी त्यांची प्रकृती पूर्णपणे सुधारली. या उपकाराची परतफेड म्हणून मुरारपंतांनी स्वामींना त्यांची इच्छा विचारली असता, स्वामींनी भग्न शिवमंदिराच्या जीर्णोद्धाराची मागणी केली. स्वामींच्या या सूचनेनुसार मुरारपंतांनी सन १६३३ च्या सुमारास येथे मंदिराची नव्याने उभारणी केली. याच काळात हत्तीच्या वजनाइतक्या वस्तूंचे दान करण्याचे ‘तुळादान’ येथे पार पडले. हत्तीचे अचूक वजन करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले यांनी एक बुद्धिचातुर्याची युक्ती सुचवली होती. त्यांनी हत्तीला मोठ्या बोटीत उभे करून पाण्याची पातळी मोजली आणि हत्ती उतरवून त्या पातळीपर्यंत सोने-नाणे भरले. या ऐतिहासिक तुळादानानंतर नगरगावचे नाव बदलून तुळापूर असे करण्यात आले.

स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांना औरंगजेबाने विश्वासघाताने पकडून याच ठिकाणी आणले होते. येथे त्यांचा अनन्वित छळ करून त्यांना जीवे मारण्यात आले. त्यानंतर संताजी, बहिर्जी आणि मालोजी घोरपडे या शूर मराठा सरदारांनी मुघल सैन्य आणि फितुरांचे अक्षरशः शिरकाण केले. त्यानंतर संगमेश्वर मंदिराच्या बाजूलाच छत्रपती संभाजी महाराजांचे समाधी मंदिर उभारण्यात आले. तीर्थक्षेत्र तुळापूरच्या पेशवे काळातील नोंदीही सापडतात. बाजीराव पेशवा आणि मस्तानीमध्ये दुरावा निर्माण व्हावा यासाठी बाजीरावांचे चिरंजीव नानासाहेब (बाळाजी बाजीराव) यांनी मस्तानीला तुळापूर येथे आणले होते. पण, बाजीरावांच्या प्रेमात आकंठ बुडालेली मस्तानी आपल्या प्रेमापासून विलग होऊ शकली नाही. नानासाहेब पेशव्यांनी येथे बाणलिंगाची प्रतिष्ठापना करून मंदिराचे बांधकाम केल्याचीही नोंद आहे.

तुळापूरचे स्थान अत्यंत पवित्र मानले जाते. भीमा, भामा आणि इंद्रायणी या तीन नद्यांचा संगम होत असल्याने या स्थानाला संगमेश्वर हे नाव मिळाले. पौराणिक कथांनुसार, रामायण काळातील जटायूने या त्रिवेणी संगमावर कठोर तपश्चर्या केली होती. आजही येथे जटायूचे सूक्ष्म अस्तित्व असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. वारकरी संप्रदायाचे शिरोमणी संत ज्ञानेश्वर महाराजांनी आळंदी येथे संजीवन समाधी घेण्यापूर्वी या मंदिरात सलग तीन दिवस अनुष्ठान केल्याचा उल्लेख धार्मिक ग्रंथांमध्ये आढळतो. नद्यांच्या या संगमाला उत्तर भारतातील प्रयाग तीर्थाच्या बरोबरीचे स्थान दिले जाते आणि येथे पितृश्राद्ध तसेच अस्थिविसर्जन करण्याचे मोठे महत्त्व आहे.

आळंदी या तीर्थक्षेत्रापासून १२ किमी अंतरावर तुळापूर आहे. मंदिराच्या भोवती भक्कम दगडी तटबंदी आहे. मंदिराच्या उजव्या बाजूला त्रिवेणी संगम घाटावर जाण्यासाठी दरवाजा आहे, तर डावीकडे श्री रुद्रनाथ महाराजांची संजीवनी समाधी आणि श्रीराम मंदिर आहे. या मंदिराच्या मागील बाजूस श्री विष्णू महाबल्लाळेश्वर महादेव मंदिर आहे. त्याच्याच बाजूला ओम कोटेश्वराय मंदिर आहे. तसेच आणखी दोन शिव मंदिरेही या परिसरात आहेत. अशी पाच प्राचीन शिव मंदिरे असलेले हे तीर्थक्षेत्र काशी, गया, प्रयाग या तीर्थक्षेत्रांच्या बरोबरीचे स्थान म्हणून ओळखले जाते. घाटाच्या बाजूलाच आधुनिक सुविधांनी युक्त असे भक्त निवास आहे.

संगमेश्वर मंदिराची स्थापत्य शैली यादवकालीन हेमाडपंती पद्धतीचा एक उत्तम नमुना मानली जाते. पूर्वाभिमुख असलेल्या मुख्य महाद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणात समोरच एक उंच दगडी दीपमाळ आहे. त्यापुढे काळ्या पाषाणात घडवलेला मोठा नंदीमंडप आहे. या मंडपातील नंदीच्या अंगावरील दागिने आणि घंटांचे कोरीव काम वैशिष्ट्यपूर्ण आहे. सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. सभामंडपात दगडी स्तंभ आहेत. गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीला लागून असलेल्या चौथऱ्यांवर उजवीकडे विठ्ठल-रुक्मिणी व डावीकडे गणपती यांच्या मूर्ती आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावरील ललाटबिंबावर गणेशाची मूर्ती व द्वारशाखांवर नक्षीकाम आहे. मंदिराच्या गर्भगृहात स्वयंभू शिवलिंग विराजमान आहे. गर्भगृहावरील विटा आणि चुन्याच्या सहाय्याने बांधलेले शिखर मराठा मंदिर स्थापत्यशैलीचे आहे.

मंदिराच्या बाजूलाच छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे. अष्टकोनी आकाराच्या या वास्तूमध्ये एका उंच चौथऱ्यावर छत्रपती संभाजी महाराज यांचा अर्धपुतळा आहे. या स्फूर्तिस्थळालाही दरवर्षी हजारो इतिहासप्रेमी भेट देतात. धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने परिसराची स्वच्छता आणि सौंदर्याकडे विशेष लक्ष दिले आहे. भक्त निवास, अंतर्गत रस्ते, स्वागत कमान आदी कामांमुळे हे स्थळ आता जिल्ह्यातील महत्त्वाचे पर्यटनस्थळ म्हणूनही ओळखले जाते.

मंदिरात वर्षभर विविध उत्सव व सण साजरे होतात. महाशिवरात्री हा येथील सर्वात मोठा उत्सव मानला जातो. या दिवशी त्रिवेणी संगमावर स्नान करण्यासाठी लाखो भाविक येतात. या निमित्ताने मंदिरात विशेष रुद्रपूजा व अखंड हरिनामाचा जप केला जातो.

त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी मंदिरातील उंच दीपमाळ प्रज्वलित केली जाते. फाल्गुन अमावास्येला छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिन ‘शौर्य दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्या दिवशी महाराष्ट्रभरातून शिवप्रेमी अभिवादन करण्यासाठी येथे येतात. श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी मंदिरात विशेष अभिषेक आणि धार्मिक विधी केले जातात.

नदीच्या पात्रातून कावड आणण्याची परंपरा आजही येथे जपली गेली आहे. आषाढी व कार्तिकी एकादशीला आळंदीकडे जाणाऱ्या पालख्यांचा मुक्काम येथे असतो. भाविकांना सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेत येथील महादेवाचे व समाधी स्थळाचे दर्शन घेता येते.

उपयुक्त माहिती

  • पुणे शहरापासून ३२ किमी अंतरावर
  • पुणे शहरातील अनेक भागांतून तुळापूरसाठी पीएमपीएमएल बस सेवा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीची सुविधा
Back To Home