महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक म्हणजे माहुरची रेणुकामाता. ही देवी पार्वतीचे अवतारस्वरूप आहे. एलांबा (एल्लम्मा), एकवीरा, यामांबा (यमाई), लज्जागौरी, जोगुळांबा, भूदेवी, मातंगी, सांतेरी ही सर्व रेणुका मातेचीच रुपे असल्याचे अभ्यासक सांगतात. देशात अनेक ठिकाणी रेणुकामातेची मंदिरे आहेत. त्यातीलच एक म्हणजे विदर्भातील ‘प्रतिमाहूर’ म्हणून ओळखले जाणारे पातूर येथील रेणुका माता मंदिर होय. येथे सुवर्णा (बोर्डी) नदीकाठावरील एका उंच, निसर्गरम्य टेकडीवर रेणुकामाता वसलेली आहे. माहूर गडावरील रेणुकामातेच्या दर्शनासाठी जाऊ न शकणारे असंख्य भाविक येथे देवीच्या दर्शनास येतात.
रेणुका देवी ही भूदेवी आहे. रेणुका या शब्दाचा अर्थ रेणुमयी पृथ्वी असा होतो. पौराणिक आख्यायिकांनुसार, रेणुका ही जमदग्नी ऋषींची पत्नी आहे. ‘रेणुका माहात्म्य’ ग्रंथात तिची अशी चारित्र्यकथा सांगण्यात आली आहे की प्राचीन काळी कान्यकुब्ज देशात इक्ष्वाकुवंशीय रेणू ऊर्फ प्रसेनजीत नावाचा राजा राज्य करीत होता. त्याने कन्याकामेष्टी यज्ञ केला असता, त्या यज्ञाग्नीतून एक कन्या जन्मास आली. तिचे पाळण्यातील नाव कामली असे ठेवण्यात आले. रेणु राजाची कन्या म्हणून तिला रेणुका असे म्हणण्यात येऊ लागले. ती मोठी झाल्यानंतर रेणु राजाने भागीरथीक्षेत्री तिचे स्वयंवर मांडले. त्यात तिने जनदग्नी ऋषींना वरले. या दाम्पत्यास रुमण्वत्, सुषेण, वसू, विश्वावसू व रामभद्र म्हणजेच परशुराम असे पाच मुलगे झाले.
रेणुका आपल्या पतीदेवाच्या नित्यपूजेअर्चेसाठी लागणारे पाणी मातीच्या घड्यात भरून तुंगभद्रेवरून आणून देत असे. एके दिवशी तुंगभद्रेच्या जलराशीत चित्ररथ गंधर्व जलक्रीडा करीत होता. त्यास पाहून रेणुकेचे चित्त क्षणभरासाठी विचलित झाले. जमदग्नींना अंतर्दृष्टीने हा प्रसंग समजल्यानंतर त्यांनी आपल्या मुलांपैकी एकेकाला तिचा शिरच्छेद करण्याची आज्ञा दिली. पहिल्या तीन मुलांनी मातृहत्येस नकार दिला. मात्र परशुरामाने पित्याची आज्ञा तत्काळ पाळली. त्याने उडवलेले मातेचे शिर चांभाराच्या पाण्याच्या कुंडीत जाऊन पडले. त्याची आज्ञाधारकता पाहून जमदग्नी प्रसन्न झाले व त्यांनी त्याला वर मागण्यास सांगितले. तेव्हा त्याने मातेला सजीव करण्याचा वर मागितला.
त्यावर जमदग्नी म्हणाले की ते आता अशक्य आहे. कारण तू उडवलेले तिचे शिर अपवित्र ठिकाणी जाऊन पडले आहे. त्यामुळे ते तिच्या धडास लावणे इष्ट नाही. मात्र या पुढे लोक तिच्या शिराची उपासना एल्लम्मा या नावाने करतील आणि धडाची ख्याती भूदेवी म्हणून होईल. रेणुका मातेची ही कहाणी सुपरिचित आहे. ‘महाभारता’मध्ये रेणुकेची उत्पत्ती कमळापासून झाली असून रेणु हा तिचा भ्राता आणि सोमप हा पिता असल्याचे म्हटले आहे. तर ‘कालिका पुराणा’मध्ये रेणुका ही विदर्भ देशाच्या राजाची मुलगी असल्याचे म्हटले आहे.
पातूरमध्ये रेणुका ही ग्रामदेवता म्हणून पुजली जाते. येथील मंदिराची आख्यायिका अशी की या टेकडीवरील माळरानावर देवीचे प्राचीन काळापासून अस्तित्व होते. सुमारे २०० वर्षांपूर्वी दत्तभक्तांचे तीर्थस्थान असलेल्या गाणगापूर (जि. कलबुर्गी, कर्नाटक) येथून दीनानाथ महाराज कुलकर्णी हे गृहस्थ येथे आले. त्यावेळी त्यांना टेकडीवरील हिवराच्या झाडाजवळ वसलेल्या देवीचे दर्शन झाले. त्यानंतर त्यांनी देवीचे एक छोटे मंदिर उभारले. कालांतराने या टेकडीचा परिसर अत्तरदे कुटुंबियांच्या ताब्यात आला. त्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला, तसेच परिसरात श्रीराम, श्रीकृष्ण तसेच दत्तात्रेय यांची छोटी मंदिरेही उभारली. १९७६ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आल्याचे सांगण्यात येते. उंच टेकडीवर वसलेल्या रेणुकामातेच्या मंदिरापर्यंत येण्यासाठी पायथ्यापासून २५६ पायऱ्या चढाव्या लागतात. सुरुवातीला येथे पायवाट होती. त्यानंतर येथे पायरी मार्ग बनविण्यात आला. आबाल-वृद्धांच्या सोयीसाठी या पायऱ्यांच्या दोन्ही बाजूंना स्टेनलेस स्टीलचे कठडे बसवण्यात आले आहेत. पायऱ्या चढून वर येताना सुरुवातीला दीनानाथ महाराज कुलकर्णी यांच्या समाधीचे दर्शन घडते. वाटेत हनुमान आणि गणपती मंदिरेही लागतात. पायऱ्या चढून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. या टेकडीवरील हिरवळ व येथील स्वच्छतेमुळे हा परिसर प्रसन्न भासतो. या प्रांगणात मंदिरासमोर दीपस्तंभ आहे व भाविकांना बसण्यासाठी सर्वत्र बाके आहेत.
सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. अर्धखुल्या स्वरूपाच्या सभामंडपात पुढील बाजूस प्रदक्षिणा मार्ग सोडून गर्भगृहाची रचना आहे.
गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबस्थानी गणपतीचे शिल्प आहे. या प्रवेशद्वाराच्या उजवीकडे देवीची मोठी प्रतिमा आहे. गर्भगृहातील वज्रपिठावर आकर्षक मखरात देवीची वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती आहे. ही मूर्ती मानेपासून वर अशी आहे. शेंदूरचर्चित मूर्तीच्या डोक्यावर मुकूट, चांदीचे डोळे व नाकात नथ आहे. पूर्वाभिमुख असलेल्या या देवीच्या मूर्तीवर छत्र आहे. मंदिराच्या गर्भगृहावर पांढऱ्या रंगाचे आकर्षक शिखर आहे. त्यावर द्विस्तरीय आमलक व कळस आहे.
मुख्य मंदिराशिवार प्रांगणात महादेव, श्रीकृष्ण, श्रीराम व श्रीदत्त यांची मंदिरे आहेत. या टेकडीवरून पातूर शहराचे विहंगम दृश्य दिसते. टेकडीवरून उत्तर दिशेला नानासाहेब वाडा (मंदिर), तसेच दक्षिणेला शाहबाबू दर्ग्याचे दर्शन होते. टेकडीच्या पायथ्याशी गायत्री देवीचे मंदिर असून नजीकच तपे हनुमान मंदिर आहे. येथील रेणुका माता नवसाला पावते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. नवस फेडण्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या गर्दीमुळे हा परिसर सदैव गजबजलेला असतो. मंगळवारी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या अधिक असते. येथे रामनवमी, दत्तजयंती, कृष्णजन्माष्टमीसह हिंदू धर्मातील विविध सण-उत्सव उत्साहात साजरे केले जातात. शेगावला जाणाऱ्या अनेक दिंड्यांचाही येथे मुक्काम असतो. शारदीय नवरात्रोत्सव हा येथील सर्वात मोठा उत्सव आहे. या उत्सवादरम्यान नऊही दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या उत्सवादरम्यान सकाळी ६.३०, तसेच रात्री ८ वाजता आरती होते. या आरतीला अकोला, वाडेगाव, बालापूर, मालेगाव, बार्शी टाकळी आदी परिसरांतून येणारे शेकडो भाविक हजर असतात.