
भोगावती नदीच्या काठावर वसलेले पेण हे ऐतिहासिक शहर प्राचीन काळापासून प्रमुख बंदर व व्यापारी केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. चालुक्य, कदंब, शिलाहार अशा अनेक राजवटींनी या परिसरावर राज्य केले. छत्रपती शिवरायांच्या काळात मराठा सरदार वाघोजी तुपे यांनी पेणची गढी काबीज केली. स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी ६ ऑगस्ट १६६८ व ११ मे १६७४ रोजी पेणच्या बंदराला भेटी दिल्याच्या नोंदी आहेत. अशा या ऐतिहासिक व प्राचीन शहरातील चालुक्यकालीन रामेश्वर व दुर्गामाता मंदिर हे येथील ग्रामदैवत व हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
पेणे या शब्दाचा कोशातील अर्थ आहे मिरवणुकीच्या वेळी पालखी उभी करण्याचे विशिष्ट ठिकाण किंवा प्रवासातील मुक्कामाची जागा. त्यावरून पेण हे ग्रामनाम आले. कुलाबा गॅझेटियरमधील नोंदीनुसार मुंबईला दख्खनशी जोडणाऱ्या बोरघाटाच्या मार्गावरील हे महत्त्वाचे केंद्र होते. येथून प्रामुख्याने मिठाचा व्यापार होत असे. प्रतिवर्षी हजारो बैलांवरून येथून मीठ नेले जात
असे. पेण हे गजबजलेले बंदर असल्यामुळे मोगल, सिद्दी व इंग्रजांचा त्यावर डोळा होता. भारत इतिहास संशोधन मंडळात असलेल्या कागदपत्रांमधील उल्लेखानुसार सिद्दीच्या तहाच्या वेळी इंग्रजांनी शिवाजी महाराजांकडे पेणची मागणी केली होती. पेशवाईच्या काळात येथे ब्राह्मण वस्तीत वाढ झाली. त्यावेळीं सावरकर बंधूंनी स्थापन केलेल्या ‘अभिनव भारत’ या संघटनेची एक शाखा पेणला होती. ‘पंडित जॅक्सन’ म्हणून ख्यातकीर्त असलेले भारतविद्याशास्त्रज्ञ तसेच कोकणातील देवी–देवता आणि रूढी–परंपरांचा वेध घेणारा ‘फोकलोअर नोट्स’ हा द्विखंडी ग्रंथ लिहिणारे ब्रिटिश सनदी अधिकारी ए. एम. टी. जॅक्सन यांची नाशिकमध्ये क्रांतिवीर अनंत कान्हेरे यांनी २१ डिसेंबर १९०९ रोजी हत्या केली. सावरकरांना काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावल्याचा त्याने सूड घेतला. त्या प्रकरणी पेणमधून ४० संशयितांना पकडण्यात आले होते. मिठाच्या कायदेभंग आंदोलनातही हा परिसर केंद्रस्थानी होता. या सत्याग्रहानंतर साने गुरुजींना पेणमध्येच अटक झाली होती. २५ सप्टेंबर १९३० या दिवशी चिरनेरला जंगल सत्याग्रह झाला होता; परंतु त्याआधी पेणजवळील बडगाव येथे जिल्ह्यातील पहिला जंगल सत्याग्रह झाला होता. १९३२ च्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीत पेणमधील महिला अग्रभागी होत्या. या चळवळीत सरस्वती विनायक लिमये, यमुना मुकुंद लिमये, लीला विनायक मनोहर, प्रभावती वसंत वरखेडकर अशा अनेक महिलांना ब्रिटिशांनी अटक केली होती.
‘गणेश मूर्तींचे माहेरघर’ म्हणून सध्या प्रसिद्ध असलेल्या पेण शहरातील देऊळवाडा परिसरात चालुक्यकालीन स्थापत्यशैलीतील रामेश्वर मंदिर आहे. असे सांगितले जाते की चालुक्य राजवटीत त्याची निर्मिती झाली. या मंदिरात प्राचीनत्वाच्या खुणा जागोजागी जाणवतात. मंदिराबाहेर दगडी दीपस्तंभ आहे. एका मोठ्या पाषाणी जोत्यावर हे दक्षिणाभिमुख मंदिर उभे आहे. मंदिराच्या बांधकामात दगड व लाकडांचा वापर केलेला आहे. मूळ मंदिरासमोर
नंतरच्या काळात बांधलेला सभामंडप प्रशस्त व दुमजली आहे. या सभामंडपात शंभर वर्षांहून जुनी काचेची विविधरंगी झुंबरे आहेत. सभामंडपातून मुख्य मंदिरात प्रवेश होतो. येथे मंदिराच्या बांधकामाचा काळ सांगणारा एक जीर्ण शिलालेख आहे.
मंदिराच्या प्रवेशद्वारावर जय–विजय यांच्या प्रतिमा आहेत. ललाटबिंबावर गणेशमूर्ती व मंडारकावरील अर्धचंद्रशिलेवर कीर्तिमुख आहे. येथून आत आल्यावर समोर रामदरबार दिसतो. त्यामध्ये श्रीराम, सीता, लक्ष्मण, विष्णू, विठ्ठल–रखुमाई व मारुती यांच्या मूर्ती आहेत. या दरबाराच्या बाहेर डावीकडील देवळ्यांत एकमुखी दत्त व गणेशमूर्ती आहेत. उजव्या बाजूला असलेल्या स्वतंत्र गर्भगृहात दुर्गामातेची वैशिष्ट्यपूर्ण चतुर्भुज रेखीव मूर्ती आहे. दुर्गामातेच्या गर्भगृहाला स्वतंत्र कळस आहे. त्याच्या पाषाणी घुमटाची रचना आतून शंकूच्या आकाराची आखीव व रेखीव आहे. रामेश्वर महादेवाच्या गर्भगृहासमोर अखंड पाषाणातील नंदी आहे. गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीवर कालभैरवाची मूर्ती, शिवपिंडी व लहानसा नंदी आहे. प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबावर गणेशमूर्ती व मंडारकावरील अर्धचंद्रशिलेवर कीर्तिमुख आहे. येथून पाच पायऱ्या उतरून गर्भगृहात जावे लागते. गर्भगृहाच्या मध्यभागी रामेश्वर महादेवाची मोठी व सुंदर पिंडी आहे. ही पिंडी भूतलापासून काहीशी उंच आहे. दुर्गामातेच्या गर्भगृहाप्रमाणे या गर्भगृहावरही स्वतंत्र दगडी कळस आहे. येथील दगडी घुमट हा त्या काळातील कुशल स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना समजला जातो.
या मंदिराबाबत एक कथा अशी सांगण्यात येते की काशीच्या शंकराचार्यांनी या मंदिरासाठी सोन्याचे दोन कळस दिले होते. पेणमधील भावेशास्त्री या ब्रह्मवेत्त्याशी काशीचे शंकराचार्य यांचा वादविवाद झाला होता. त्यात हरल्यामुळे शंकराचार्यांनी आपली पालखी रामेश्वर मंदिरात ठेवली व तेथून ते
खोपोली मार्गावर चालत गेले. तेथे त्यांनी दुसरी पालखी मागवली व ते पुढे मार्गस्थ झाले.
मंदिराबाहेर सुंदर उद्यान आहे. बाजूला महाकाली देवीचे मंदिर व त्याच्या डाव्या बाजूला श्रीरामाचे मंदिर आहे. समोर मारुतीचे मंदिर आहे. त्याला टिपेचा मारुती असे म्हटले जाते. या मंदिराच्या पायऱ्यांवर शके १८२० (इ.स.१८९८) असे साल नोंदलेले आहे. महाकाली मंदिरासमोर एकसंध पाषाणात कोरलेले शिल्प आहे. स्थानिक लोक या शिल्पाला बापदेव असे संबोधतात. इतिहास संशोधकांच्या मते, सहाव्या शतकात या शिल्पाची निर्मिती करण्यात आलेली आहे. या मंदिराला पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांनी भेट दिली होती. पूर्वी हे मंदिर तळ्याकाठी होते. मात्र, तलावाच्या जागेवर आता अनेक इमारती उभ्या आहेत. हा भाग आता कासारतळे म्हणून ओळखला जातो. कुलाबा जिल्हा गॅझेटियरनुसार मलिक अंबर याने हे कासारतळे बांधले होते. रामेश्वर मंदिरासह या परिसरात असलेली व्याघ्रेश्वर, गोटेश्वर व पाटणेश्वर ही चालुक्यकालीन मंदिरे असल्याचे सांगितले जाते.