मुदगड येथील एका छोट्याशा टेकडीवर रम्य स्थानी वसलेल्या रामलिंगेश्वर मंदिरातील शिवपिंडीची स्थापना श्रीरामांनी केल्याचे मानले जाते. मौखिक परंपरेने चालत आलेल्या लोकसाहित्यात आणि काही ग्रंथांत या मंदिराचा उल्लेख आढळतो. हेमाडपंती स्थापत्य शैलीचा प्रभाव असलेल्या या मंदिरात अनेक प्राचीन मूर्ती आहेत. यामुळे भाविकांबरोबरच अभ्यासकांनाही हे मंदिर भुरळ घालते. या मंदिराला राष्ट्रकूट आणि त्यानंतरच्या काळात राजाश्रय होता, असे सांगण्यात येते. निजामाच्या सत्ताकाळातही मंदिरास देणग्या दिल्या जात होत्या. यावरून या मंदिराचे महत्त्व स्पष्ट होते.
देशभरात अनेक ठिकाणी रामेश्वर वा रामलिंग या नावाने शिवलिंगे आढळतात. स्कंद पुराणातील पाताळ खंडात श्रीरामांनी शिवलिंगाची स्थापना केल्याचे उल्लेख येतात. या मंदिराच्या आख्यायिकेनुसार, श्रीराम हे भगवान विष्णूचे अवतार व शंकराचे भक्त आहेत. रावणाने सीताहरण केल्यानंतर श्रीराम व लक्ष्मण यांनी तिचा शोध सुरू केला. त्या शोधात यश यावे याकरिता त्यांनी या ठिकाणी भगवान शंकराची आराधना केली. त्यासाठी त्यांनी हे शिवलिंग स्थापन केले व त्यामुळे या शिवलिंगास ‘रामलिंग’ म्हणून ओळखले जाऊ लागले. ‘रामलिंग माहात्म्य’सारख्या काही स्थानिक पोथ्यांमध्ये या मंदिराचे आणि शिवलिंगाचे महत्त्व मांडण्यात आले आहे. मराठवाडा आणि कर्नाटक सीमाभागात रामलिंगेश्वरावर आधारित अनेक अभंग आणि गौळणी गायल्या जातात. काही जात्यावरील ओव्यांमध्ये ‘रामलिंगाच्या दर्शनाला, चला जाऊया मुदगडाला’ असे उल्लेख आढळतात.
मौर्य काळामध्ये अश्मक जनपदाचा भाग असलेला लातूर जिल्ह्याचा हा परिसर पुढे राष्ट्रकूटांच्या अमलाखाली आला. लातूर म्हणजे प्राचीन लत्तलूर होय. ते राष्ट्रकूट घराण्याचे मूलस्थान आहे. येथे बदामीच्या चालुक्यांचीही सत्ता होती. काही इतिहास संशोधकांच्या मते, लातूर-बिदर परिसरास चालुक्य देश असे म्हणत व यावरूनच बदामीतील राजवंशास चालुक्य असे म्हटले जाऊ लागले. या राजवटींच्या काळात लातूर आणि परिसरास राजकीय व व्यापारीदृष्ट्या मोठे महत्त्व प्राप्त झाले होते. याच काळात येथे अनेक मंदिरांची उभारणी झाली, तसेच देवस्थानांना राजाश्रय मिळाला. येथे निजामाची सत्ता प्रस्थापित झाल्यानंतरही मुदगड येथील या मंदिराच्या देखभालीसाठी आणि उत्सवांसाठी सरकारी साहाय्य लाभले. त्या संदर्भातील सनदा, तसेच अन्य ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये ‘श्री रामलिंगेश्वर संस्थान, मुदगड’ असा उल्लेख आढळत असल्याचे सांगण्यात येते.
हे मंदिर प्रशस्त आवारात वसले आहे. त्यास दगडी आवारभिंत व शोभिवंत प्रवेशद्वार आहे. त्यावर अर्धगोलाकृती दगडी बांधकाम आणि शिखरे आहेत.
द्वारचौकटीच्या ललाटबिंबस्थानी हनुमानाची मूर्ती आहे. या प्रवेशद्वारास पाच पायऱ्या आहेत. आत दोन्ही बाजूंना पुरातन शैलीच्या ओवऱ्या आहेत. उजव्या बाजूला एक दीपमाळ आहे. या दीपमाळेचे वेगळेपण असे की त्यात दिवे ठेवण्यासाठी कोष्टके आणि हस्त अशा दोन्हींची रचना केलेली आहे. समोरच एका खुल्या मंदिरासारख्या रचनेत विठ्ठल-रखुमाईच्या मूर्ती आहेत. या मूर्तींच्या दोन्ही बाजूंना संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांच्याही मूर्ती स्थापित केलेल्या आहेत. मंदिराच्या उजव्या बाजूला अनेक पुरातन कोरीव मूर्ती भिंतीलगत ठेवलेल्या आहेत. त्यात शंकर-पार्वती, विष्णू, गणपती, अश्वावर स्वार झालेले यक्ष अशा अनेक मूर्ती आहेत. मुख्य मंदिराच्या दर्शनी भिंतीवर उजव्या बाजूला सप्तमातृका आणि गणपती कोरलेले आहेत. मंदिराच्या प्रवेशद्वाराभोवतीही बारीक नक्षीकाम केलेले आहे. प्रवेशद्वाराच्या तीन पदरी द्वारशाखांवर सुंदर कोरीवकाम आहे. दोन्ही बाजूंना द्वाररक्षक आणि चवऱ्या ढाळणारे सेवक आणि सेविका आहेत. द्वाराच्या शीर्षस्थानी असलेल्या पट्टीवर दोन व्याल आहेत. त्यांच्या मधोमध एका राक्षसाच्या पोटावर पाय देऊन उभी असलेली चतुर्भुज देवीची मूर्ती आहे. तिच्या बाजूलाच नंदीमूर्तीही कोरलेली आहे, तसेच त्याचाही एक पाय राक्षसावर आहे.
या कमी उंचीच्या दरवाजातून आत प्रवेश केल्यानंतर सभामंडपाच्या मध्यभागी रंगशिळा दिसते. याच्या चारही दिशांना असलेल्या खांबांवर सुंदर नक्षीकाम आहे. समोर मुख्य गर्भगृह आणि डाव्या-उजव्या बाजूंना उपगर्भगृहे आहेत. मंदिरातील अशा रचनेला ‘त्रिकूट’ म्हटले जाते. उजव्या बाजूच्या गर्भगृहाच्या अंतराळात नंदीच्या दोन मूर्ती आहेत. या नंदीपैकी एकाचे मुख उजव्या बाजूच्या गर्भगृहाकडे तर दुसऱ्याचे मुख डाव्या बाजूच्या गर्भगृहाकडे आहे. या दोन्ही गर्भगृहात शिवपिंडी आहेत. उजव्या बाजूच्या गर्भगृहात असलेल्या शिवपिंडीची शाळुंखा गोलाकार आहे. तर डाव्या बाजूला असलेल्या गर्भगृहात आयताकृती शाळुंखा असलेली शिवपिंडी आहे.
मुख्य गर्भगृहाच्या दरवाजाच्या बाजूला देवकोष्टकासारख्या रचनेत दोन मूर्ती आहेत. त्यापैकी एक मूर्ती शेषशायी विष्णूची आहे. कालपरत्वे मूर्तीची काहीशी झीज झाली असली तरी शेषावर निद्रा घेणाऱ्या विष्णूचे पाय चेपणारी लक्ष्मी, विष्णूच्या नाभीतून उगवलेल्या कमळावर स्थापित असलेले ब्रह्मदेव त्यात दिसतात. दुसऱ्या मूर्तीची थोडी जास्त झीज झाली आहे, त्यामुळे ती मूर्ती कुणाची आहे ते ओळखता येत नाही. मुख्य गर्भगृहाचा दरवाजाही कोरीव काम असलेला आहे. त्याच्या ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे. गर्भगृहातील शिवपिंडी रेखीव आहे. साधारण फूटभर उंच असलेल्या या दुहेरी वर्तुळाकार शाळुंखा असलेल्या दगडी शिवपिंडीची रचना अतिशय वेधक आहे. गर्भगृहातील अभिषेकाचे जल बाहेर सोडण्यासाठी शक्यतो गोमुखाची रचना असते. या गर्भगृहाबाहेर मात्र गोमुखाच्या ऐवजी मत्स्यमुखाची रचना केलेली आहे. असे मत्स्यमुख दुर्मिळ मानले जाते. मंदिराच्या बाहेर समर्थ रामदासांची एक मूर्ती आहे. त्याच्या शेजारी असलेल्या शिवपिंडीच्या शाळुंखेवर गोलाकार शिवलिंग आहे.
दुपारी दोन ते चार ही वेळ वगळता या मंदिरात सकाळी साडेपाच ते रात्री साडेआठपर्यंत भाविक देवदर्शन घेऊ शकतात. सोमवार, महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यात मंदिरात दिवसभर देवदर्शनाची संधी मिळते. या मंदिरात वर्षभर विविध धार्मिक सोहळे उत्साहात साजरे होतात. महाशिवरात्रीचा उत्सव येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. या दिवशी पहाटेपासूनच अभिषेक, रुद्रपठण आणि भजनांचे कार्यक्रम आयोजित केले जातात. निलंगा तालुका आणि कर्नाटक सीमा भागातून हजारो भाविक दर्शनासाठी येथे येतात. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी भाविकांची विशेष गर्दी असते. श्रीरामांनी या लिंगाची स्थापना केली असल्याचे मानले जात असल्याने येथे रामनवमीचा उत्सवही मोठ्या प्रमाणावर साजरा होतो.