पितांबर महाराज समाधी मंदिर

कोंडोली, ता. मानोरा, जि. वाशिम

शेगावचे योगीराज संत गजानन महाराज यांचे पट्टशिष्य आणि मानसपुत्र पितांबर महाराज यांच्या पावन वास्तव्यामुळे मानोरा तालुक्यातील कोंडोली गावास तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाला आहे. तब्बल २४ वर्षे गजानन महाराजांच्या सहवासाचा आणि सेवेचा लाभ मिळालेले पितांबर महाराज हे स्वतः उच्च कोटीचे आध्यात्मिक सामर्थ्य असलेले सत्पुरुष होते. त्यांनी कोंडोली येथे अनेक लीला घडवल्याच्या आख्यायिका प्रचलित आहेत. येथे अरुणावती नदीच्या काठावर त्यांचे भव्य समाधी मंदिर उभारण्यात आले आहे. त्याचबरोबर येथे पितांबर महाराज यांचे बंधुतुल्य संत लाला महाराज यांचेही समाधीस्थान आहे.

एकोणिसाव्या-विसाव्या शतकात महाराष्ट्रात होऊन गेलेल्या संतांच्या मांदियाळीत शेगावचे योगी संत गजानन महाराज यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. गजानन महाराज यांचे पूर्वायुष्य अज्ञात आहे. मात्र, माघ वद्य सप्तमी शके १८०० म्हणजेच २३ फेब्रुवारी १८७८ रोजी ते शेगाव येथे सर्वप्रथम प्रकट झाले, असे मानले जाते. त्यावेळी ते १८ वर्षांचे होते. संतकवी दासगणू महाराज यांनी इ.स. १९३९ मध्ये रचलेल्या ‘श्री गजानन विजय’ या ग्रंथात याविषयीची हकीकत विस्ताराने मांडली आहे. त्यानुसार, त्या दिवशी शेगावमधील देवीदास पातूरकर यांच्या मुलाच्या ऋतुशांतीचा कार्यक्रम होता. त्यानिमित्त भोजनाच्या पंगती उठत होत्या. त्याचवेळी तेथून बंकटलाल अगरवाल व दामोदरपंत कुलकर्णी हे गृहस्थ चालले होते. अचानक त्यांना एका उष्ट्या पत्रावळीवर अंगात जुनीपुराणी बंडी, हाती चिलिम, जवळ भोपळ्याचा तुंबा अशा अवस्थेतील एक मुलगा अन्न खात बसलेला दिसला. तेच गजानन महाराजांचे शेगावला झालेले पहिले दर्शन होय. या प्रसंगानंतर गजानन महाराज तेथून दूर निघून गेले. ते चार दिवसांनी पुन्हा दिसले. त्या दिवशी गावात गोविंदबुवा टाकळीकर यांचे कीर्तन होते. ते श्रवण करण्यास बंकटलाल अगरवाल व गावात शिंपीकाम करणारे पितांबर हे चालले होते. त्यावेळी त्यांना कीर्तनस्थळी पुन्हा गजानन महाराज दिसले. पितांबर महाराजांना झालेले हे गजानन महाराजांचे पहिले दर्शन होते. ती तारीख २६ किंवा २७ फेब्रुवारी १८७८ असावी. त्यावेळी गजानन महाराजांनी पितांबर यांना, घोटाभर आणि तेही गढूळ पाणी असलेल्या ओढ्यात तुंबा बुडवून त्यातून स्फटिकासम निर्मळ पाणी काढण्याचा चमत्कार दाखवला. ते पाहून पितांबर हे गजानन महाराजांचे निस्सीम भक्त बनले. पुढे शेगावमध्ये सखाराम आसोलकर यांच्या जागेवर महाराजांचा मठ बांधण्यात आला, तेव्हा तेथे भास्कर, बाळाभाऊ, अमरावतीचे गणेश आप्पा, तसेच रामचंद्र गुरव यांच्यासह पितांबर हे महाराजांसोबत राहू लागले. दासगणूंनी या पाच जणांना पांडवांची उपमा दिली आहे.

यानंतर काही वर्षांनी पितांबर हे गजानन महाराज यांच्या आज्ञेने त्यांच्यापासून दूर झाले. ‘श्री गजानन विजय’च्या १२ व्या अध्यायात त्याची कथा सांगितली आहे. एके दिवशी मठामध्ये राहात असलेल्या पितांबर यांच्या अंगावरील फाटके धोतर पाहून गजानन महाराजांनी त्यांना एक चांगले वस्त्र नेसावयास दिले. महाराजांच्या शिष्यांमध्ये काही शिष्य त्यावरून पितांबर यांना टोचून बोलू लागले. त्यावरून वाद झाला. तेव्हा गजानन महाराज यांनी पितांबरास मठ सोडून जाण्यास सांगितले. दासगणूंनी याचे वर्णन करताना म्हटले आहे की ‘ऐसी भक्ती न भक्ती झाली। शिष्यांत तेढ माजली। ती मिटवाया माव केली। ऐशा रीतीं गजाननें।। पितांबरास म्हणती गुरूवर। तूं येथून जावें दूर। जाणतें मूल झाल्यावर। आई त्याला दूर ठेवी।।’ तेव्हा पाणावलेल्या डोळ्यांनी पितांबर यांनी शेगाव सोडले व ते कोंडोली येथे एका आंब्याच्या झाडावर येऊन बसले. तेथे त्यांची परीक्षा पाहण्यासाठी गावकऱ्यांनी तो सुका आम्रवृक्ष हिरवागार करून दाखव, असे आव्हान दिले. तेव्हा पितांबर महाराज यांनी गजानन महाराजांच्या कृपेने तो चमत्कार करून दाखवला. यानंतर पितांबर महाराजांच्या पायी सर्वांनी लोटांगण घातले. ही घटना १९०२ मध्ये घडल्याचे सांगण्यात येते. येथेच पितांबर महाराजांनी आपला मठ स्थापन केला.

पितांबर महाराज शेगावहून येथे आल्यानंतर काही महिन्यांतच, इ.स. १९०३ च्या महाशिवरात्रीस स्वतः गजानन महाराज यांनी येथे प्रकट होऊन आपल्या या परमशिष्याची भेट घेतली होती. यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा या गावातील संत लाला महाराज हे कालांतराने येथे पितांबर महाराजांसमवेत राहू लागले. लाला महाराज हे पितांबर महाराजांचे बंधुतुल्य होते. कोंडोलीतील आपल्या जीवनकाळात पितांबर महाराजांनी विष पचवल्याच्या, तसेच पिंपातल्या पाण्याचे तुपात रूपांतर केल्याच्या चमत्कारकथा येथे सांगण्यात येतात. उपलब्ध संदर्भानुसार, संत पितांबर महाराज इ.स. १९१३ मध्ये अनंतात विलीन झाले. आषाढ कृष्ण १२ ही त्यांची पुण्यतिथी होय. नंतर ग्रामस्थांनी येथे त्यांचे समाधी मंदिर बांधले. जीर्णोद्धार केल्यानंतर त्या मंदिरास सध्याचे भव्य स्वरूप प्राप्त झाले आहे.

कोंडोली गावाबाहेर अरुणावती नदीच्या किनारी विस्तीर्ण परिसरात हे ‘श्री पितांबर महाराज गुरू श्री गजानन महाराज संस्थान’ वसले आहे. या मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या वरील भागात तीन कमानींची रचना व त्यावर तीन छोटी शिखरे आहेत. येथून आत प्रवेश केल्यानंतर मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडपाच्या डावीकडून आणखी एक प्रवेशद्वार आहे. उत्सवकाळाव्यतिरिक्त या डावीकडील प्रवेशद्वारातून भाविकांना प्रवेश करता येतो. सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. सभामंडपात मुख्य प्रवेशद्वाराजवळ एका मोठ्या चौथऱ्यावर तीन देवळ्यांमध्ये संत नारायणदेव महाराज, संत पितांबर महाराज आणि संत पुरुषोत्तम देव महाराज यांच्या मूर्ती आहेत.

गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीवर प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला हाती गदा घेतलेली द्वारपाल शिल्पे आहेत. या शिल्पांच्या वरील बाजूस दीपकोष्ठके आहेत. प्रवेशद्वाराच्या द्वारशाखेवर पाना-फुलांची नक्षी व ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे. गर्भगृहात जमिनीवर मध्यभागी असलेल्या चौकोनी वज्रपीठावर लाला महाराज यांची मूर्ती आहे. या मूर्तीच्या मागील भिंतीत असलेल्या वज्रपीठावर गणपती, संत ज्ञानेश्वर, गजानन महाराज, संत तुकाराम, विठ्ठल-रुक्मिणी यांच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या प्रांगणात संत पितांबर महाराज सभागृह, तसेच संस्थानच्या कार्यालयाची मोठी इमारत आहे. सभागृहासमोर एका चौथऱ्यावर संत गजानन महाराज यांची मूर्ती प्रतिष्ठापित आहे.

या मंदिरात पहाटे ६ ते रात्री ९ या काळात भाविक समाधी स्थानाचे दर्शन घेऊ शकतात. येथे दर महाशिवरात्रीस मोठा यात्रोत्सव होतो. महाशिवरात्रीच्या दिवशी संत गजानन महाराज व पितांबर महाराज यांची भेट झाली होती, त्या भेटीची स्मृती म्हणून या संस्थानात या यात्रेचे आयोजन करण्यात येते. सात दिवसांच्या या उत्सवात शिवमहापुराण कथा, ज्ञानयज्ञ, भजन, कीर्तन, प्रवचन, शोभायात्रा, दिंडी सोहळा, महाप्रसाद अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या उत्सवात अनेक भाविक सहभागी होतात. येथे समाधिस्त झालेले संत पुरुषोत्तम महाराज देव यांचा पुण्यतिथी उत्सवही येथे आषाढ शुद्ध सप्तमीस विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येतो.

२०२४ मध्ये या मंदिराचा समावेश राज्याच्या पर्यटन विकास योजनेत करण्यात आला. त्याअंतर्गत मंदिरातील भक्त निवास व अन्य पर्यटन विकास कामांसाठी मंदिर संस्थानास दीड कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाने मंजूर केला आहे.

उपयुक्त माहिती:

  • मानोरा येथून ६ किमी अंतरावर
  • वाशिम येथून ६४ किमी अंतरावर
  • मानोरा येथून एसटी व खासगी वाहनांची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीची सुविधा आहे
  • संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ८८८८७०४४१५

पीताम्बर महाराज समाधि मंदिर

कोंडोली, ताल. मनोरा, जिला. वाशिम

Back To Home