कारंजा लाड हे शहर नृसिंह सरस्वती महाराज यांचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. दत्त संप्रदायातील श्रीपाद श्री वल्लभ यांच्यानंतरचे श्रीदत्तांचे दुसरे पूर्णावतार नृसिंह सरस्वती किंवा नरसिंह सरस्वती मानले जातात. वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथे त्यांचे मंदिर आहे. हे मंदिर गुरूमंदिर या नावाने ओळखले जाते. नृसिंह सरस्वतींनी शिव, विष्णू, देवी, गणेश आणि नृसिंह यांच्या उपासनेचा उपदेश केला. त्यांच्या भ्रमण कार्यकाळात कारंजा, औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर ही गावे दत्तोपासकांची तीर्थक्षेत्रे बनली. त्यांच्यामुळे महाराष्ट्रात दत्तोपासना लोकप्रिय झाली.
‘मध्ययुगीन महाराष्ट्र – सामाजिक आणि सांस्कृतिक जीवन’ या प्रा. म. श्री. माटे यांच्या ग्रंथानुसार, ‘मध्ययुगीन महाराष्ट्रात जे पंथ उदयाला आले, त्यांपैकी दत्त संप्रदाय हा एक आहे. महानुभाव पंथाप्रमाणेच दत्त संप्रदाय हाही मुख्यत्त्वे महाराष्ट्रातच प्रचलित आहे. या संप्रदायाचे आद्य प्रवर्तक हा मान श्रीपाद श्रीवल्लभ आणि नृसिंह सरस्वती यांना जातो. या दोघांनीही पारंपरिक पद्धतीने वेदाध्ययन केलेले होते, तीर्थाटने केलेली होती आणि दोघांनाही योगमार्गात मोठा अधिकार प्राप्त झालेला होता.’ नृसिंह सरस्वती यांना त्यांचे भक्त श्रीदत्ताचा अवतार मानतात. महाराष्ट्रात हसन गंगू बहमनी याने सल्तनत स्थापन केली असतानाच्या काळात, इ.स. १३७८ मध्ये वाशीम जिल्ह्यातील करंजा लाड येथे नृसिंह सरस्वती यांचा जन्म झाला.
इ.स. १५४८ (शके १४७०)च्या सुमारास सरस्वती गंगाधर यांनी लिहिलेल्या ‘गुरुचरित्र’ या ग्रंथात नृसिंह सरस्वती यांचे जीवनचरित्र सांगितले आहे. त्यातील ११व्या अध्यायात असे म्हटले आहे की ‘जन्म होतांचि तो बालक। ॐकार शब्द म्हणतसे अलौलिक।’ म्हणजे जन्म झाल्यावर लगेचच त्यांच्या मुखातून ॐकार जप सुरू झाला. कधीही ते सर्वसामान्य मुलाप्रमाणे रडले नाहीत. त्यामुळे सर्वांना याचे आश्चर्य वाटू लागले होते. त्यावेळच्या ज्योतिषांनी हा मुलगा ‘पूज्य होईल त्रिभुवनांत। याचे दर्शनमात्रें पतित। पुनीत होतील परियेसीं।।’ असे जातक वर्तविले होते. गुरुचरित्रानुसार त्यांचे जन्मनाम शाळीग्राम असे होते. मात्र त्यांना नरहरी असेच म्हटले जाई.
ते सात वर्षांचे होईपर्यंत ॐकाराखेरीज त्यांना कोणताच शब्द बोलता येत नसे.
वयाच्या दहाव्या वर्षी म्हणजे १३८८ साली त्यांना वाराणसी येथील वृद्ध यती श्रीकृष्ण सरस्वती यांनी संन्यासदीक्षा दिली. त्यांनीच त्यांचे नृसिंह सरस्वती असे नामकरणही केले. पुढे वयाच्या तिसाव्या वर्षापर्यंत त्यांनी अनेक तिर्थयात्रा करून ते आपल्या आई-वडिलांना भेटण्यासाठी करंजा येथे आले. काही काळ कुटुंबासोबत राहिल्यानंतर महाराजांनी पुन्हा तिर्थयात्रेसाठी जाण्याची परवानगी मागितली. परंतु परवानगी देताना मातृहृदय दाटून आले. स्वामींनी आईची ती अवस्था पाहिली व त्यांनी वाड्यातील एका भिंतीकडे पाहून आईला सांगितले की या ठिकाणी तू निरांजन लावून माझी आठवण काढलीस की मी तुला येथे दिसेन. सध्याच्या गुरुमंदिरापासून जवळच असलेल्या वाड्यातील ही भिंत नरहरी भिंत म्हणून ओळखली जाते. असे सांगितले जाते की या भिंतीला लागून असलेल्या खोलीत महाराजांचा जन्म झाला होता. स्वामींच्या दर्शनासाठी येणारे भाविक आवर्जून या वाड्यात येऊन या भिंतीचे दर्शन घेतात. आजही येथे स्वामींचे अस्तित्व जाणवते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
असे सांगितले जाते की नृसिंह स्वामींनंतर पुढील ४०० वर्षे स्वामींच्या या जन्मस्थळाबाबत कोणालाच माहित नव्हते. करंजा लाड येथील ग्रामस्थही त्याबाबत अनभिज्ञ होते. वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी यांनी १९०९ ते १९१० या काळात कारंजा लाड येथे भेट दिली व पूर्ण माहिती घेऊन हा वाडा म्हणजेच नृसिंह सरस्वती स्वामींचे जन्मस्थान असल्याचे सांगितले. या वाड्याच्या समोर एक पुरातन वटवृक्ष आहे, जो स्वामींच्या जन्मापासून तेथे आहे. या ठिकाणीच स्वामींचे मंदिर बांधले जावे, अशी इच्छा टेंबे स्वामींनी व्यक्त केली. परंतु १९१४ साली टेंबेस्वामी यांनी समाधी घेतल्याने नृसिंह सरस्वती मंदिराचे काम रेंगाळले. ६ नोव्हेंबर १९३३ साली शंकराचार्य स्वामी ब्रह्मानंद सरस्वती हे कारंजा लाड येथे आले. त्यांना या ठिकाणी असलेल्या नृसिंह सरस्वती यांच्या जन्मस्थानासंदर्भात समजल्यावर त्यांनी तातडीने मंदिर बांधण्याच्या हालचाली सुरू केल्या. एका महिन्याच्या आत म्हणजेच ३ डिसेंबर १९३३ मध्ये दत्तजयंतीच्या मुहूर्तावर मंदिराच्या बांधकामास सुरुवात झाली आणि केवळ चार महिन्यांत हे मंदिर बांधून तयार झाले.
या मंदिरात नृसिंह सरस्वती स्वामींची मूर्ती स्थापन करायची होती. परंतु गुरूचरित्रात त्यांच्याबद्दल असलेल्या वर्णनाव्यतिरिक्त दुसरी कोणतीही माहिती उपलब्ध नव्हती. त्यावेळी ब्रह्मानंद सरस्वती स्वामींनी मुंबईतील स्कूल ऑफ आर्टचे मुख्याध्यापक व आपले शिष्य श्री. धुरंदर व तेथील प्राचार्य सालोमन यांना स्वामींचे चित्र काढण्याची जबाबदारी दिली. असे सांगितले जाते की या दोघांनी काढलेली आपापली चित्रे जेव्हा त्यांनी ब्रह्मानंद स्वामींकडे सुपूर्द केली तेव्हा ती तंतोतंत सारखीच होती. या चित्रांवरून जयपूर येथून शुभ्र संगरमरवरी मूर्ती बनविण्यात आली आणि १ एप्रिल १९३४ या दिवशी या मूर्तीची येथे प्रतिष्ठापना करण्यात आली. यासोबतच येथे श्रीदत्त, चिंतामणी गणपती, काशीविश्वेश्वर आणि पादुकांची स्थापना करण्यात आली.
स्वामींचे जन्मस्थान असलेल्या वाड्यापासून केवळ ५० मीटर अंतरावर हे गुरुमंदिर स्थित आहे. एका तीन मजली भव्य प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरील बाजूला नगारखान्यावर श्रीदत्तांची मोठी प्रतिमा आहे. सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. अर्धखुल्या सभामंडपाच्या शेजारी प्राचीन वटवृक्ष आहे.
या वटवृक्षाच्या पारावर शिवपिंडी व नंदीची मूर्ती आहे. सभामंडपात अंतराळाच्या दर्शनी भिंतींसमोर दोन्हीबाजूला काचेच्या पेट्यांमध्ये चांदीचे गजराज आहेत. सभामंडपातून पाच पायऱ्या चढून काहीशा उंचीवर असलेल्या अंतराळात प्रवेश होतो. अंतराळाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्हीकडे असलेल्या देवकोष्टकांत वासुदेवानंद सरस्वती स्वामी व ब्रह्मानंद सरस्वती स्वामी यांच्या भगवी वस्त्रे परिधान केलेल्या सुंदर मूर्ती आहेत.
अंतराळात प्रदक्षिणा मार्ग सोडून गर्भगृहाची रचना आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर चांदीचे नक्षीकाम आहे. गर्भगृहात सोनेरी रंगाच्या अधिष्ठानावर बालस्वरूपातील नृसिंह सरस्वतींची शुभ्र संगमरवरी मूर्ती आहे. गणपती आणि श्रीदत्त यांच्याही मूर्ती येथे आहेत. येथील सर्व कार्यक्रम गाणगापूरच्या मठाप्रमाणे चालतात. पहाटे पाच वाजता काकड आरती होते. सकाळी आठ ते साडेआठ वाजेपर्यंत निर्गुण पादुकांना गंधलेपन केले जाते. दुपारी साडेबारा वाजता आरती व त्यानंतर आलेल्या भाविकांना महाप्रसाद दिला जातो. रात्री साडेनऊ वाजेपर्यंत भाविकांना येथे दर्शन घेता येते. दर गुरुवारी येथे स्वामींची पालखी काढली जाते. याशिवाय गुढीपाडवा, आषाढ शुक्ल प्रथमेला वासुदेवानंद सरस्वती पुण्यतिथी, श्रावण वद्य पंचमीला वासुदेवानंद सरस्वती यांची जयंती, भाद्रपद शुक्ल चतुर्थीला श्रीपाद श्रीवल्लभ जयंती, मार्गशीर्ष शुद्ध दशमीला ब्रह्मानंद सरस्वती यांची पुण्यतिथी, पौष शुक्ल द्वितेयाला नृसिंह सरस्वती जयंती हे उत्सव येथे मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.