
चाळीसगाव–भडगाव या राष्ट्रीय महामार्गावर तितूर नदीकाठी वाघळी येथे मुधाई देवीचे प्राचीन व प्रसिद्ध मंदिर आहे. भारतीय पुरातत्व विभागानुसार, शिल्पसौंदर्याचा खजिना असलेले हे भूमिज शैलीतील मंदिर बाराव्या शतकातील आहे. अभ्यासकांच्या मते एकेकाळी हे सूर्यमंदिर असावे. मंदिराच्या गर्भगृहाच्या बाह्यभिंतीतील देवकोष्टकात एक अतिशय सुंदर असे सूर्यशिल्प कोरलेले आहे. त्यावरून व येथे सापडलेल्या शिलालेखावरून ते सिद्ध होते. हे मंदिर इ.स. १९१४ मध्ये राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे.
खान्देशाच्या इतिहासानुसार अकराव्या–बाराव्या शतकात राष्ट्रकुटांच्या पतनानंतर येथे यादवांची सत्ता स्थापन झाली. यादवांचे काही मांडलिक राजे येथे राज्य करीत होते. चाळीसगावनजीकच्या पाटण येथे सापडलेल्या शिलालेखांवरून या परिसरात या काळात निकुंभवंशातील इंद्रराजा वा त्याचा पुत्र गोवन (तिसरा) यांचे राज्य होते. त्यांच्या सत्ताकाळात इ.स. ११५० ते १२०० दरम्यान वाघळी येथे हे मंदिर उभारण्यात आले. हे मंदिर मातीच्या एका कृत्रिम टेकाडीवर वसलेले आहे. चाळीसगाव–भडगाव राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. मंदिराच्या प्रांगणात परिसरात उत्खननात सापडलेल्या अनेक मूर्ती व शिल्पे आहेत. येथून सुमारे दहा पायऱ्या चढल्यावर मंदिराच्या समतल असलेल्या आणखी एका प्रांगणात प्रवेश होतो. या प्रांगणात प्राचीन वृक्ष व भाविकांना बसण्यासाठी आसन व्यवस्था आहे.
मुधाई देवीच्या मंदिरासमोर एक हवनकुंड आहे. असे सांगितले जाते की या हवनकुंडातून एक भुयारी मार्ग आहे. त्यातून वाघळी गावातील श्रीकृष्ण मंदिरापर्यंत जाता येत असे. मात्र सध्या हा मार्ग बंद करण्यात आलेला आहे.
पूर्वाभिमुख असलेल्या मुधाई मंदिराचा पाया ताऱ्याच्या आकाराचा आहे. मुखमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. अर्धमंडपाच्या समोरील दोन स्तंभांजवळ एक गणेशाची व दुसरी शेंदूरचर्चित पाषाणमूर्ती आहेत. प्रवेशद्वारानजीक सूर्यप्रतिमा कोरलेले स्तंभ आहेत. मुखमंडपात असलेल्या चार स्तंभांवर वैशिष्ट्यपूर्ण कोरीवकाम आहे. या स्तंभांच्या वरील बाजूला दगडी कुंभांची अनोखी रचना आहे. हे दगडी कुंभ कोरताना कुंभाच्या चारही बाजूने दगडी नक्षीकाम व आतील बाजूला कुंभाची रचना केलेली आहे. दुर्मिळ समजले जाणारे अशा पद्धतीचे कोरीव काम वेरूळ येथील जगप्रसिद्ध कैलास लेण्यांतील सभामंडपातील खांबांवरही पाहायला मिळते. या मुखमंडपातून मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो. मुखमंडपाप्रमाणेच सभामंडपात व अंतराळातही नक्षीदार दगडी स्तंभ आहेत. अशा एकूण २४ स्तंभांवर मंदिराचा भार तोललेला आहे. सभामंडप व अंतराळाच्या वितानावर सुंदर नक्षीकाम केलेले आहे. येथील सभामंडप व अंतराळ बंदिस्त स्वरूपाचे आहेत.
गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराला नक्षीदार स्तंभशाखा आहेत. याशिवाय दाराची चौकट ही पाच शाखांनी बनलेली आहे. या द्वारशाखांवर सुंदर नक्षीकाम आहे. ललाटबिंबस्थानी गणेशप्रतिमा आहे व त्याच्या वरील द्वारचौकटीवर सूर्यप्रतिमा आहे. त्यावरील उत्तरांग भागात नवग्रहांचे अंकन आहे. गर्भगृहात एका पाषाणी वज्रपिठावर मुधाई देवीची तांदळा स्वरूपातील मूर्ती आहे. याशिवाय येथे उमामहेश्वराची एक प्राचीन मूर्ती आहे. त्यात शंकराच्या वामांकावर पार्वती बसल्याचे दाखवण्यात आले आहे. मंदिराच्या पश्चिमेकडील म्हणजेच मागच्या भिंतीवर सूर्यदेव, उत्तरेकडील भिंतीवर चामुंडा देवी आणि दक्षिणेकडील भिंतीवरील देवकोष्टकात गणपतीची उभी मूर्ती आहे. चामुंडा देवीच्या एका हातामध्ये खटवांग आणि वरच्या हातामध्ये नाग पकडलेला दिसतो. येथील सूर्यदेवाची मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्याच्या शेजारी उषा आणि प्रत्युषा आहेत. खालच्या बाजूस सात अश्वांचा मुखाकडील भाग कोरलेला आहे. मंदिराचा कळस नष्ट झाल्याने त्यावर सिमेंट–काँक्रीटचा स्लॅब टाकण्यात आलेला आहे.
या मंदिराच्या गर्भगृहाच्या द्वारचौकटीवरील सूर्यप्रतिमा, येथील नवग्रहाचे अंकन व मुखमंडपाच्या द्वारस्तंभांनजीक असलेल्या दहाहून अधिक सूर्यप्रतिमा यावरून हे मंदिर पूर्वी सूर्यमंदिर असल्याचे व कालांतराने या मंदिरात मुधाई देवीची तांदळा स्वरुपातील मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली असावी, असे मंदिर स्थापत्य व मूर्तीशास्त्र अभ्यासकांचे मत आहे. एकाच मंदिरात एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरलेल्या सूर्यप्रतिमा अभावानेच पाहायला मिळतात. खान्देशात प्राचीन काळापासून आदित्य राणूबाई हे सूर्योपासनेशी संबंधित व्रत केले जाते. यावरून या कयासास बळ मिळते. हे स्त्रियांनी करावयाचे व्रत श्रावणातील रविवारी केले जाते. यात स्नानानंतर विड्याच्या पानावर रक्तचंदनाने सूर्याचे चित्र व त्या बाजूला वर्तुळात षटकोन काढला जातो. या चित्रांची व सहा गाठी मारलेल्या सहापदरी दोऱ्याची एकत्रित पूजा केली जाते.
नवरात्री हा येथील मोठा उत्सव असतो. या नऊ दिवसांत देवीच्या दर्शनासाठी हजारो भाविक येथे येतात. यावेळी मंदिर व परिसरात सजावट केली जाते. दररोज विविध वस्त्र व अलंकारांनी देवीची मूर्ती सजविली जाते. या दिवसांत दररोज सकाळी व संध्याकाळी येथे आरती होते. यावेळी परिसरातील अनेक गावांतील भाविक येथे उपस्थित असतात.