लाकडी व दगडी वस्तू घडवणाऱ्या कुशल कारागिरांचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिंदखेड येथे मोरेश्वर महादेवाचे प्राचीन मंदिर स्थित आहे. काळ्या पाषाणात बांधलेल्या या पुरातन मंदिरातील शिवलिंग स्वयंभू आहे. असे सांगितले जाते की मोर्णा नदीतीरी वसलेल्या या मंदिरातील शिवलिंगाखालून येणारे पाणी कधीही आटत नाही. देशावर किंवा गावावर कोणतेही संकट येणार असेल तर मात्र हे पाणी कमी होते. येथील जागृत महादेवावर विदर्भातील असंख्य भाविकांची श्रद्धा आहे. येथे चैत्रात भरणाऱ्या यात्रेदरम्यान होणारा शिवपार्वतीचा विवाहसोहळा प्रसिद्ध आहे.
मंदिराविषयी आख्यायिका अशी की काही शतकांपूर्वी येथे निंबाजी वाघ नावाचे शिवभक्त राहत. ते दरवर्षी ‘दक्षिण कैलास’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिखर शिंगणापूर येथील महादेवाच्या दर्शनासाठी जात असत. वार्धक्यामुळे थकले, तरीही ते ही नित्यवारी चुकवत नव्हते. एके दिवशी तेथे जात असताना त्यांना अतिथकवा आला. तेव्हा त्यांनी एके ठिकाणी मुक्काम केला. त्या रात्री त्यांना महादेवाने दृष्टांत देऊन सांगितले की ‘यापुढे तुला माझ्या दर्शनासाठी शिखर शिंगणापूरला येण्याची गरज नाही. मी स्वतःच तुझ्या गावात येईन. तू गावी परत जा.
गावाच्या पूर्व दिशेला असलेल्या स्मशानाजवळ खोदकाम कर. या ठिकाणी तुला माझे दर्शन घडेल.’ त्यानुसार त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने तेथे खोदले असता त्यांना शिवलिंग तसेच नंदीची मूर्ती आढळली.
या मंदिराची उभारणी नेमकी कधी झाली याचा इतिहास काळाच्या पडद्याआड गेला आहे. हे मंदिर हेमाडपंती शैलीमध्ये बांधण्यात आले आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या बाह्यभागावर मुघलकालीन वास्तुशैलीचा मोठा प्रभाव पाहावयास मिळतो. या मंदिरावर मुघलशैलीतील मिनारांचे बांधकाम केलेले आहे. याबाबत आख्यायिका अशी की औरंगजेबाच्या आक्रमणाच्या काळात या परिसरात आलेल्या एका मुघल सरदाराने हे मंदिर उद्ध्वस्त करण्यासाठी सैन्य पाठवले होते. त्यावेळी ग्रामस्थांनी त्यांना हे मंदिर साक्षात्कारी असल्याचे सांगत ते पाडण्यास विरोध केला. तेव्हा त्या सरदाराने ग्रामस्थांना महादेवाच्या माहात्म्याची प्रचिती दाखवण्याचे आव्हान दिले. त्यावेळी एका ग्रामस्थाने मंदिरातील दगडी नंदीला साकडे घातले की ‘आम्ही तुला चारा घालू. तू तो खा आणि सकाळी शेण देऊन या सैन्याला शिवाचे येथील अस्तित्व दाखवून दे.’ काही वेळातच या दगडी नंदीने चारा खाल्ला तसेच दुसऱ्या दिवशी शेणही दिले. त्यानंतर या आक्रमकांना महादेवाची महती पटली. असे सांगण्यात येते की ही बाब औरंगजेबाच्या कानावर आल्यावर तो स्वतः येथे आला आणि त्याने मंदिरातील मागच्या बाजूकडील भिंतीवर दोन मिनार उभारले. त्यावर चाँदही लावले. भविष्यात कोणीही हे मंदिर उद्ध्वस्त करू नये, अशी ताकीद देण्यासाठी मंदिर परिसरात आपल्या पंजाचे निशाण असलेला दगड त्याने रोवला. मंदिर परिसरात असलेल्या एका उपहारगृहानजीक औरंगजेबाने निशाण म्हणून रोवलेला दगड आहे. या दगडावर हाताचा पंजा कोरलेला आहे. त्याच्या खालील भागात ऊर्दू भाषेतील काही मजकूर कोरण्यात आला आहे. येथील महादेवाच्या नावाविषयी आख्यायिका अशी की या पुरातन मंदिराच्या आवारात पूर्वी खूप मोर येत असत. त्यावरून या महादेवास मोरेश्वर असे नाव पडले. या मंदिराची महती मोठी असून येथे गजानन महाराज, तुकडोजी महाराज, गाडगेबाबा आदींनीही येऊन दर्शन घेतले असल्याचे सांगण्यात येते. सरकारने या मंदिराला ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला आहे.
मंदिराभोवती असलेल्या तटबंदीतील किल्ल्यासदृश्य प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. दगडी फरसबंदी असलेल्या या प्रांगणात दोन मोठ्या दीपमाळा आहे. येथील एका चौथऱ्यावर मोठ्या आकाराचा त्रिशुळ तसेच नंदीच्या दोन मूर्ती आणि एक पिंडीही आहे. काळ्या दगडात बांधलेल्या या मंदिराच्या दर्शनी भागाचे बांधकाम काहीसे मशिदीसारखे आहे. मंदिराच्या छताच्या वरील भागांत चारही बाजूंना मिनार आहेत. मंदिराच्या गर्भगृहावर घुमटाकार शिखर आणि त्यावर द्विस्तरीय आमलक व कळस आहे. मंदिराच्या मागील बाजूला असलेल्या भिंतीनजीकही दोन मिनार आहेत. या मिनारावरील चाँद मंदिराच्या गर्भगृहात ठेवण्यात आले आहेत. हेच मिनार औरंगजेबाने उभारल्याचे सांगितले जाते.
उंच अधिष्ठानावर बांधलेल्या या मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळील एका दगडावर अनेक खड्डे दिसतात. पूर्वी नवस पूर्ण झाल्यावर अनेक भक्त या खड्ड्यांमध्ये चांदीची नाणी रोवत असत. त्यापैकी काही नाणी आजही पाहायला मिळतात. कमानीच्या आकाराच्या प्रवेशद्वारातून सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडपात चार दगडी स्तंभ आहेत. हे स्तंभ महिरपी कमानीने एकमेकांशी जोडलेले आहेत. येथील देवळ्यांमध्ये एक शिवपिंडी व गणेशाची मूर्ती आहे. सभामंडपात, गर्भगृहासमोर असलेल्या चौथऱ्यावर नंदीच्या पाच मूर्ती आहेत. त्यापैकी मध्यभागी नंदीची प्राचीन मूर्ती आहे. येथील अन्य नंदींच्या मूर्तींची प्रतिष्ठापना काही भाविकांनी नवस पूर्ण झाल्यावर केल्याचे सांगितले जाते. या दगडी मूर्तींवर पंचधातूंचे पत्रे बसवण्यात आले आहेत.
सभामंडपापासून चार ते पाच फूट खोलवर गर्भगृह आहे. चार पायऱ्या उतरून गर्भगृहात प्रवेश होतो. या गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर नवसाचे नारळ बांधलेले असतात. गर्भगृहात मोठ्या शाळुंकेमध्ये मोरेश्वर महादेवाचे स्वयंभू शिवलिंग आहे. त्यावर नागाने छत्र धरलेले आहे. या शिवलिंगावर तसेच शाळुंकेमध्ये चांदीचा पत्रा लावण्यात आलेला आहे. नजीकच असलेल्या अन्य एका गर्भगृहात दोन शिवलिंग आहेत. या मंदिर प्रांगणात विठ्ठल-रखुमाईचे मंदिर आणि नजीकच निंबाजी वाघ यांचे समाधी मंदिर आहे.
वर्षभरातील अनेक महत्त्वाचे सण व उत्सव येथे उत्साहात साजरे केले जातात. महाशिवरात्रीच्या दिवशी येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या दिवशी सायंकाळी मंदिरात शिव-पार्वतीच्या विवाहाची बोलणीही करण्यात येतात. चैत्र शुद्ध अष्टमी ते द्वादशी या पाच दिवसांत येथे मोठी यात्रा भरते. या यात्रेदरम्यान काही भाविक कावड घेऊन येथे येतात. हे गाव लाकडी व दगडी वस्तू घडवणाऱ्या कुशल कारागिरांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. हे कारागीरही या यात्रेत आपल्या वस्तू विक्रीसाठी ठेवतात. त्यात दीपमाळ, नंदी, शोभेच्या वस्तू आदींचा समावेश असतो.
यात्रेच्या पहिल्या दिवशी शिव-पार्वती विवाह सोहळा होतो. या दिवशी एका पालखीत शिव-पार्वतीचे मुखवटे विराजमान करण्यात येतात. त्यानंतर विधिवत विवाहसोहळा पार पडतो. त्यानंतर भाविक पालखीवर फुले, खारीक व खोबऱ्यांचे तुकडे उधळतात. यावेळी निघणाऱ्या मिरवणुकीत अनेक भाविक महादेवाच्या काठ्या नाचवतात. या यात्रेदरम्यान भाविक आपल्या शेतातील धान्य महादेवाला अर्पण करतात. हे धान्य मंदिरात होणाऱ्या महाभंडाऱ्यांच्या वेळी वापरले जाते. येथे नंदीचे महत्त्व मोठे आहे. त्यामुळे अनेक शेतकरी आपल्या बैलांसह येथे मंदिर प्रदक्षिणा करतात.