महागणपती मंदिर (अष्टविनायक क्षेत्र)

रांजणगाव, ता. शिरूर, जि. पुणे

अष्टविनायक यात्रा क्रमातील अंतिम स्थान मानले जाणारे रांजणगाव येथील श्रीमहागणपती मंदिर भाविकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे श्रद्धास्थान मानले जाते. अष्टविनायकातील आठ शक्तिपीठांमध्ये या स्थानाला विशेष स्थान आहे. येथे गणपतीने स्वतःच्या ‘महोत्कट’ या विशाल रूपात दर्शन दिले होते. हे मंदिर भक्ती, शक्ती आणि मुक्तीचा संगम दर्शवणारे एक पवित्र स्थान मानले जाते. या क्षेत्राचा महिमा संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेला आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक पटलावर अष्टविनायकांचे स्थान खूप महत्त्वाचे आहे. गणपती ही बुद्धीची देवता आणि सर्व कार्यांतील विघ्नहर्ता मानली जाते. यामुळे महाराष्ट्राच्या जनजीवनात या दैवताला अग्रपूजेचा मान आहे. अष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रातील आठ स्वयंभू गणपतींची मंदिरे आहेत. ही मंदिरे प्रामुख्याने पुणे, रायगड आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये आहेत. या सर्व मूर्ती ‘स्वयंभू’ मानल्या जातात. प्रत्येक ठिकाणच्या मूर्तीचा आकार आणि वैशिष्ट्ये वेगवेगळी असली, तरी त्या सर्वांचे मूळ स्वरूप गणेशाचेच आहे.

या आठ क्षेत्रांमध्ये मोरगावचा मयूरेश्वर, थेऊरचा चिंतामणी, सिद्धटेकचा सिद्धिविनायक, रांजणगावचा महागणपती, ओझरचा विघ्नेश्वर, लेण्याद्रीचा गिरिजात्मज, महडचा वरदविनायक आणि पालीचा बल्लाळेश्वर यांचा समावेश होतो. धार्मिक मान्यतेनुसार, या यात्रेची सुरुवात मोरगावच्या दर्शनाने होते आणि सर्व गणपतींचे दर्शन घेतल्यावर पुन्हा मोरगावला येऊनच यात्रेची सांगता होते. या मंदिरांचे महत्त्व पेशवे काळात अधिक वाढले. पेशवे घराणे हे गणपतीचे परमभक्त होते. त्यामुळे त्यांनी मंदिरांच्या दुरुस्तीसाठी आणि देखभालीसाठी मोठे योगदान दिले. त्यामुळे मंदिरांच्या वास्तूरचनेत पेशवेकालीन शैलीचा प्रभाव स्पष्टपणे दिसतो. ‘गणेश पुराण’ ग्रंथातील ‘उपासना खंडा’त प्रामुख्याने ४४, ४५ व ४६ व्या अध्यायात रांजणगावच्या महागणपतीचा सविस्तर उल्लेख आहे. त्यानुसार, प्राचीन काळी या क्षेत्राचे नाव मणिपूर असे होते. ऋषी गृत्समद यांच्या तपश्चर्येतून त्रिपुरासुराचा जन्म झाला. त्रिपुरासुराने श्रीगणेशाची कठोर आराधना करून लोखंड, चांदी आणि सोन्याची अशी तीन अभेद्य नगरे आणि अफाट शक्तीचे वरदान मिळवले होते. या शक्तीच्या जोरावर त्याने देवांना त्रास देण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने प्रत्यक्ष कैलास पर्वतावरही आपला अधिकार सांगण्याचा प्रयत्न केला. त्रिपुरासुराचा पराभव करण्यासाठी भगवान शिव युद्धाला निघाले, परंतु सुरुवातीला त्यांना यश आले नाही. तेव्हा नारद मुनींच्या सल्ल्यानुसार भगवान शिवांनी याच मणिपूर क्षेत्रात श्रीगणेशाची मनोभावे उपासना केली. भगवान शिवांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन गणेशाने त्यांना दर्शन दिले आणि त्रिपुरासुराचा वध करण्यासाठी विजय मिळवण्याचा वर दिला. त्यानंतर कार्तिक शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी भगवान शिवांनी एकाच बाणाने त्रिपुरासुराच्या तिन्ही नगरांचा नाश केला. या विजयानंतर ज्या ठिकाणी गणेशाने शिवाला दर्शन दिले, तिथेच स्वतः भगवान शिवांनी महागणपतीची स्थापना केली. यामुळेच या गणपतीला ‘त्रिपुरारी वरद महागणपती’ असे म्हटले जाते. रांजणगाव येथील मंदिराची मूळ उभारणी नवव्या ते दहाव्या शतकातील असावी, असा इतिहास अभ्यासकांचा दावा आहे. मंदिर परिसरात वेळोवेळी सापडलेल्या प्राचीन पाषाणमूर्ती आणि वैशिष्ट्यपूर्ण कोरीव शिळा या दाव्याची पुष्टी करतात. काळाच्या ओघात या मंदिराची अनेकदा डागडुजी झाली आणि त्याला नवे स्वरूप प्राप्त झाले. ऐतिहासिक नोंदींनुसार, मंदिराच्या मुख्य गर्भगृहाचे सध्याचे बांधकाम थोरले माधवराव पेशवे यांनी इसवी सन १७६४ मध्ये पूर्ण केले. पेशवे काळात या मंदिराला विशेष राजाश्रय लाभला होता. त्यांनी या देवस्थानाच्या दैनंदिन व्यवस्थेसाठी सनद दिली होती. मंदिराच्या दर्शनी भागातील कौलारू सभामंडपाचा जीर्णोद्धार इंदूरचे सरदार किबे यांनी स्वखर्चातून केला. सोबतच मंदिराच्या सभोवती असलेल्या ओवऱ्यांचे बांधकाम शिंदे व पवार या कर्तबगार मराठा सरदारांनी पूर्णत्वास नेले.

महागणपतीचे हे मंदिर सुमारे साडेसात एकर परिसरात वसले आहे. मंदिराभोवती असलेल्या तटबंदीमध्ये एक दुमजली महाद्वार आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूंना हत्तींची आकर्षक शिल्पे आहेत. प्रवेशद्वारासमोर भाविकांना बसण्यासाठी एक चौथरा आणि आसने आहेत. किल्ल्यासारख्या दिसणाऱ्या या महाद्वारात एकूण तीन प्रवेशद्वारे आहेत. या तिन्ही द्वारांवर महिरपी तोरणे कोरलेली आहेत. मुख्य प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूला पहारेकरी कक्ष आहेत. महाद्वाराच्या दुसऱ्या मजल्यावर नगारखाना आहे. या नगारखान्याच्या छतावर घुमटाकार शिखर आणि त्यावर कळस व ध्वजपताका आहे.

प्रवेशद्वारातून आत आल्यावर मंदिराच्या प्रशस्त प्रांगणात प्रवेश होतो. महाद्वारापासून मंदिराकडे येणाऱ्या वाटेवर दोन्ही बाजूंना पूजा साहित्य विक्रीची दुकाने आहेत. येथून काही पायऱ्या उतरल्यावर आपण मुख्य मंदिरासमोर पोहोचतो. मंदिरासमोर प्रांगणात चार नक्षीदार खांबांवर असलेले एक अर्धखुल्या स्वरूपाचे लहान मंदिर आहे. या मंदिरात वज्रपीठावर शिवपिंडी आणि शेंदूर लावलेले मुंजोबाचे पाषाण आहे. शिवपिंडीसमोर नंदीची मूर्ती आहे.

मुख्य मंदिराची रचना रांगमंडप, सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी आहे. रांगमंडपात भाविकांच्या रांगांचे नियोजन करण्यासाठी स्टेनलेस स्टीलचे कठडे आहेत. हा रांगमंडप पुढे सभामंडपाला जोडलेला आहे. सभामंडपात लाकडी खांबांच्या चार रांगा आहेत. प्रत्येक रांगेतील खांब एकमेकांना महिरपी कमानींनी जोडले आहेत. खांबांवरील लाकडी तुळयांवर लाकडी छत आहे आणि त्यावर कौले घातलेली आहेत. सभामंडपात अंतराळाच्या प्रवेशद्वारासमोर चांदीची मूषक मूर्ती आहे.

सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना द्वारपालांच्या चांदीच्या मूर्ती आहेत. अंतराळाच्या प्रवेशद्वारावर नक्षीकाम आहे आणि वरच्या बाजूला गणपतीची मूर्ती आहे. अंतराळातून बाहेर जाण्यासाठी उजव्या आणि डाव्या बाजूला आणखी दोन दरवाजे आहेत. पुढे गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. येथील द्वारशाखा व झडपांना चांदीच्या नक्षीदार पत्र्यांनी मढविले आहे. दरवाजाची उंची कमी असल्याने गर्भगृहात वाकून प्रवेश करावा लागतो. गर्भगृहात मागील भिंतीपाशी महागणपतीची शेंदूरचर्चित पाषाण मूर्ती आहे. गणपतीच्या शेजारी रिद्धी-सिद्धी यांच्या चांदीच्या मूर्ती आहेत. गर्भगृहाच्या आतील सर्व भिंतींना पाना-फुलांची नक्षी असलेले चांदीचे आवरण लावले आहे. उजव्या आणि डाव्या बाजूच्या भिंतींमध्ये देवकोष्टके आहेत. सभामंडपाच्या छतावर पायऱ्यांच्या रचनेचे चौकोनी शिखर आहे आणि शिखराच्या वरच्या भागात आमलक व कळस आहे. गर्भगृहाच्या छतावर पाच थरांचे चौकोनी शिखर आहे. शिखराच्या वरच्या भागात एकावर एक असे दोन आमलक, त्यावर कळस व ध्वजपताका आहे.

 

महागणपती मंदिराच्या जवळ महादेवाचे मंदिर आहे. या मंदिरात नंदी आणि गर्भगृहात शिवपिंडी आहे. महादेव मंदिराच्या बाजूला विठ्ठल-रखुमाईचे मंदिर आहे. पुढे गणपती आणि रिद्धी-सिद्धी यांच्या चांदीच्या मूर्ती असलेले आणखी एक छोटे मंदिर आहे. मंदिराच्या प्रांगणात दगडी बांधकामाची पेशवेकालीन बारव आहे. बारवेतील देवकोष्टकात शिवपिंडी आहे. प्रांगणात मंदिराच्या मागील बाजूस ध्यानमंदिर आहे. ध्यानमंदिरातील भिंतींवर मंदिराची माहिती देणारी चित्रे लावली आहेत. यात गणपतीची पूजा करणाऱ्या महादेवाचे चित्र आणि दहा तोंडे व वीस हात असलेल्या महागणपतीचे चित्र विशेष आहे. ध्यानमंदिरात मोरया गोसावी यांची प्रतिमा, चांदीच्या पादुका आणि हत्तींची शिल्पे आहेत. दुसऱ्या भिंतीवर अष्टविनायकांची शिल्पे आहेत.

मंदिराच्या डाव्या बाजूला पाषाणी बांधणीच्या ओवऱ्या आहेत. ओवऱ्यांच्या भिंतींवर मंदिराचा इतिहास चित्रांच्या माध्यमातून दाखवला आहे. मंदिराच्या प्रांगणात अन्नछत्राची मोठी इमारत आहे. या इमारतीच्या बाजूला दोन मजली भक्तनिवास आहे. येथे मोफत आरोग्य केंद्र चालवले जाते. मंदिराच्या तटबंदीबाहेर ‘स्वानंद उद्यान’ आहे. येथील तलावात कमळाची फुले असून उद्यानात विविध पशू-पक्ष्यांच्या प्रतिकृती तयार केल्या आहेत.

मंदिरात वर्षभरातील अनेक सण व उत्सव साजरे केले जातात. दरवर्षी भाद्रपद आणि माघ महिन्यात प्रतिपदेपासून षष्ठीपर्यंत गणेशोत्सव साजरा केला जातो. विशेष म्हणजे या काळात रांजणगावचे ग्रामस्थ आपापल्या घरी गणपतीची स्वतंत्र स्थापना न करता मुख्य मंदिरातच एकत्रितरीत्या पूजा करतात. ‘एक गाव एक गणपती’ ही परंपरा या क्षेत्राचे मुख्य वैशिष्ट्य मानली जाते. दिवाळीनंतर येणाऱ्या त्रिपुरारी पौर्णिमेला येथे विशेष महत्त्व आहे. या दिवशी संपूर्ण मंदिर दीपोत्सवाने उजळून निघते. देवस्थानतर्फे तयार करण्यात आलेला सोन्याच्या पत्र्यावरील ‘अथर्वशीर्षपट’ हे या मंदिराचे विशेष आकर्षण आहे.

उपयुक्त माहिती

  • शिरूरपासून २१ किमी अंतरावर
  • पुणे शहरापासून ५० किमी अंतरावर
  • पुणे व शिरूरहून रांजणगावसाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : मंदिर कार्यालय, दूरध्वनी : ०२१३८-२४३२००, २४३२०१
Back To Home