नदी तिरावर वा नदी पात्रात स्थापित शिवलिंग अनेक ठिकाणी पाहावयास मिळतात. भारतातील सर्वच नदी तिरांवर शिवमंदिरे अर्थात शिवलिंगे हजारो वर्षापासून स्थित आहेत. यापैकीच एक प्रसिद्ध लक्षेश्वर शिवमंदिर मूर्तीजापूर तालुक्यातील लाखपुरी येथे पूर्णा नदीच्या तिरावर आहे. अशी मान्यता आहे की प्रभू श्रीराम यांचा कनिष्ठ बंधू लक्ष्मणाने लक्षेश्वर महादेवाच्या लिंगाची येथे स्थापना केली होती. श्रीरामपूत्र लव याने याच परिसरात साडेअकरा ज्योतिर्लिंग असलेल्या शिवलिंगाची स्थापना करून शिवआराधना केली होती. त्यामुळेच हे क्षेत्र अर्धकाशी वा विदर्भाची काशी म्हणून प्रसिद्ध आहे.
पौराणिक कथांनुसार, वनवासात असताना श्रीरामांच्या आज्ञेने आपल्यातील शक्ती जागृत करण्यासाठी लक्ष्मण दंडकारण्यातून पूर्णा नदीच्या तीरावर या ठिकाणी आला. त्याने येथे शिवलिंगाची प्रतिष्ठापना करून शिवउपासना केली. कालांतराने श्रीराम यांचे दोन्ही पुत्र लव आणि कुश तिर्थाटन करता करता या ठिकाणी आले व त्यांनी या परिसरात साडेअकरा ज्योतिर्लिंग असलेल्या शिवलिंगांची स्थापना केली. उरलेले अर्धे ज्योतिर्लिंग नदीच्या पैलतीरी असल्याचे सांगण्यात येते.
सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात पैठणहून ऋद्धिपूरला जात असताना येळवणहून लाखपुरीला आले होते व त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. येथून ते शिंगणापूराला गेले, असा उल्लेख म्हाइंभट
संकलित ‘लीळाचरित्रा’तील पोथी क्रमांक १७९ मध्ये आहे. त्यामुळे महानुभाव पंथाच्या अनुयायांमध्येही या स्थानाला मोठे महत्त्व आहे. पूर्वी दगडी बांधकाम असलेल्या या मंदिराचा काही वर्षांपूर्वी झालेल्या जीर्णोद्धारानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप प्राप्त झालेले आहे. जुन्या मंदिराचे अवशेष मंदिर परिसरात पाहावयास मिळतात.
अकोला आणि अमरावती या जिल्ह्यांच्या सीमेवर पूर्णा नदीच्या काठाजवळ वसलेल्या लाखपुरी या गावाचे नाव पौराणिक काळात ‘लक्ष्मणपुरी’ असे होते. कालांतराने ते ‘लाखपुरी’ झाले. मंदिराचा परिसर शांत व प्रसन्न आहे. वाहनतळापासून उंचावर असलेल्या मंदिराच्या आकर्षक प्रवेश कमानीच्या डावीकडे संत गाडगेबाबा आणि उजवीकडे तुकडोजी महाराज यांच्या मोठ्या मूर्ती आहेत. या कमानीतून आत आल्यावर पेव्हरब्लॉकची फरसबंदी असलेल्या प्रांगणात प्रवेश होतो.
मंदिरासमोरील तुळशीवृंदावनाजवळील एका शिळेवर दोन मूर्ती तसेच सूर्य व चंद्र कोरण्यात आले आहेत. या शिळेच्या खालील बाजूस पंजा कोरलेला दिसतो. या शिळेला ‘स्मृतिशिळा’ असे म्हणतात. प्रांगणातून आठ पायऱ्या चढून उंच अधिष्ठानावर असलेल्या या मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ येता येते. या मंदिराला लागून उजवीकडे शितला माता व डावीकडे श्रीदत्त यांची मंदिरे आहे. मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या स्तंभशाखांवर दीपकोष्टके व ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे. या प्रवेशद्वारातून मंदिराच्या बंदिस्त सभामंडपात प्रवेश होतो. संगमरवरी फरसबंदी असलेल्या या सभामंडपात नक्षीदार पाषाणी स्तंभ आहेत. या स्तंभांवर कीर्तिमुख, पशू, पक्षी तसेच काही प्रसंगही कोरलेले आहेत. सभामंडपात पुढील बाजूस मध्यभागी एका चौथऱ्यावर नंदीची मूर्ती आहे.
सभामंडपात गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीतील देवळीत डावीकडे ब्रह्मदेवांची पाषाणात कोरलेली मूर्ती आहे.
उजवीकडील देवळीत विष्णूंची पाषाणात कोरलेली मूर्ती आहे. या मूर्तीच्या हातात शंख, चक्र व पद्म आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना हनुमानाच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. या प्रवेशद्वाराच्या द्वारपट्टीच्या वरच्या भागात गणेशाची मूर्ती आहे. गर्भगृहात जमिनीवर मध्यभागी अखंड पाषाणातील शिवपिंडी आहे. या गर्भगृहात पार्वतीमातेचेही स्थान आहे.
मंदिर परिसरात समुद्रमंथन शिवमंदिर, सूर्यमुखी शिवमंदिरासह अनेक छोटी शिवमंदिरे आहेत. त्यापैकी एका मंदिरात रामपुत्र लव याने स्थापन केलेल्या साडेअकरा ज्योतिर्लिंगांचे दर्शन होते. येथे उघड्यावरही काही शिवलिंग आहेत. परिसरात असलेल्या भक्तनिवासात बाहेरगावावरून येणाऱ्या भाविकांच्या निवासाची सोय होते.
शिवशंकरांचे हे जागृत स्थान असल्याची मान्यता असल्याने दररोज शेकडो भाविक येथे दर्शनासाठी येतात. सोमवती अमावस्येला येथे भाविकांची मोठी गर्दी असते. येथे दत्तजयंती, आषाढी एकादशी, नवरात्रोत्सवासह विविध सण-उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. महाशिवरात्रीनिमित्त येथे नऊ दिवस शिवमहापुराण, भजन, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त होते. श्रावण महिन्यात असंख्य भाविक येथे दर्शनासाठी येतात. या महिन्यातील प्रत्येक सोमवारी परिसर भाविकांच्या गर्दीने गजबजून जातो. या महिन्यात येथे अखंड भागवत सप्ताहासह अनेक धार्मिक विधी केले जातात.
श्रावण महिन्यातील अखेरच्या सोमवारी येथे होणाऱ्या कावड यात्रेदरम्यान परिसर ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने दुमदुमून जातो. या कावड यात्रेदरम्यान शेकडो कावडधारी लक्षेश्वर महादेवावर पूर्णा नदीच्या पवित्र जलाने अभिषेक करतात. त्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले जाते. यावेळी शेकडो कावडधारी पूर्णा नदीचे जल आपापल्या गावांमध्ये नेऊन त्या जलाने गावांतील शिवमंदिरांमध्ये अभिषेक करतात. येथील पूर्णा नदीच्या तीरावर नारायण नागबळी, कालसर्पयोग निवारण, पितृदोष निवारण तसेच पिंडदान आदी धार्मिक विधी करण्यासाठीही अनेक भाविक येतात. दररोज सकाळी ५.३० वाजल्यापासून रात्री ८.३० वाजेपर्यंत भाविक या मंदिरात दर्शन घेऊ शकतात.