कसबा गणपती मंदिर

कसबा पेठ, शनिवार वाड्याजवळ, पुणे

पुण्यातील कसबा पेठेतील कसबा गणपती मंदिराला शहराचे ग्रामदैवत म्हणून अनन्यसाधारण महत्त्व आहे. सार्वजनिक गणेशोत्सवातील मानाचा पहिला गणपती म्हणूनही हे मंदिर सर्वपरिचित आहे. १७व्या शतकाच्या सुरुवातीला राजमाता जिजाऊंनी या स्वयंभू मूर्तीची स्थापना केली. त्यांनी स्वराज्याच्या पायाभरणीचा श्रीगणेश याच पवित्र ठिकाणी केला. छत्रपती शिवाजी महाराज कोणत्याही मोहिमेवर जाण्यापूर्वी या गणपतीचे दर्शन घेत असत. तांदळा स्वरूपातील ही प्राचीन मूर्ती पुण्याच्या वैभवशाली वारशाची साक्ष देते. आजही पुण्यात कोणत्याही मंगलकार्याची पहिली पत्रिका या देवाच्या चरणी अर्पण करण्याची परंपरा मोठ्या श्रद्धेने पाळली जाते.

भौगोलिकदृष्ट्या हे मंदिर पुण्याच्या मध्यवर्ती भागात स्थित आहे. येथूनच शहराच्या मूळ वस्तीला ऐतिहासिक काळात प्रारंभ झाला. या वस्तीला ‘कसबे पुणे’ असे म्हटले जाते. १७व्या शतकाच्या सुरुवातीला पुण्याचा प्रदेश विजापूरच्या आदिलशाहीच्या नियंत्रणाखाली होता. १६३० च्या सुमारास सरदार मुरार जगदेव याने शहरावर स्वारी केली. त्याने संपूर्ण वस्ती उद्ध्वस्त केली होती. ऐतिहासिक कागदपत्रांनुसार या विनाशाचे वर्णन ‘गाढवाचा नांगर फिरवणे’ असे केले आहे. तो पूर्णतः अशुभाचा संकेत मानला जात असे. अशा भयावह परिस्थितीत राजमाता जिजाऊ आणि बाल शिवराय पुण्यात आले. त्यांनी शहराच्या पुनरुज्जीवनाची प्रक्रिया सुरू केली. जिजाऊंनी प्रजेचा आत्मसन्मान जागृत करण्यासाठी सोन्याचा नांगर फिरवला. त्यांनी या क्षेत्राची पुन्हा पायाभरणी केली. याच काळात कसबा गणपती मंदिराची पुनर्बांधणी करण्यात आला.

कसबा गणपती मंदिराच्या स्थापनेचा इतिहास आठ ब्राह्मण कुटुंबांशी निगडित आहे. ही कुटुंबे विजापूर जिल्ह्यातील इंडी गावातून पुण्यात स्थलांतरित झाली होती. यामध्ये ठकार, ढेरे, कानडे, वैद्य, शाळीग्राम, कवलंगे, निलंगे आणि भराईत यांचा समावेश होता. विनायक भट ठकार यांच्याकडे त्यांच्या कुलदैवताची गणेशमूर्ती होती. एका स्वप्नदृष्टान्तानुसार त्यांना विशिष्ट जागी खोदकाम करताना ही स्वयंभू मूर्ती मिळाली. ही महत्त्वाची माहिती तत्कालीन कारभारी दादोजी कोंडदेव यांनी राजमाता जिजाऊंना दिली. जिजाऊंनी या घटनेला शुभसंकेत मानले. त्यांनी १६३६ ते १६३९ या कालखंडात येथे दगडी मंदिर बांधले. तेव्हापासून आजही ठकार घराणे या मंदिराची व्यवस्था वंशपरंपरेने सांभाळत आहे. हे घराणे शिवकाळापासून मंदिराची सेवा करत आहे. ही परंपरा आजही अखंड सुरू आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण मंदिराजवळच असलेल्या लाल महालात गेले. त्यामुळे त्यांचा या दैवताशी अत्यंत निकटचा संबंध होता. महाराज कोणत्याही लष्करी मोहिमेवर जाण्यापूर्वी कसबा गणपतीचे दर्शन घेत असत. विजयाची खात्री देणारे दैवत म्हणून या गणपतीला ‘जयती गणपती’ असेही संबोधले जाते. या मंदिराचा ऐतिहासिक पुरावा म्हणजे छत्रपतींनी स्वतः लिहिलेले १९ मार्च १६४७ चे मोडी पत्र होय. या पत्रात महाराजांनी नंदादीपासाठी रोज अर्धा शेर तेल देण्याचा स्पष्ट आदेश दिला होता. हे तेल पुणे परगण्यातील तर्फे माणमधील गावातून देण्याचे निश्चित केले होते. याहीपेक्षा जुना उल्लेख निजामशाहीतील १ जानेवारी १६१९ च्या फर्मानात आढळतो. हे फर्मान द्वैभाषिक स्वरूपाचे आहे. यावरून हे मंदिर शिवकाळापूर्वीही अस्तित्वात असल्याचे सिद्ध होते.

मंदिराची वास्तू मराठा आणि पेशवेकालीन स्थापत्यशैलीचा उत्कृष्ट मिलाफ आहे. यामध्ये प्रामुख्याने दगड आणि सागवानी लाकडाचा वापर केला आहे. दगडी गाभारा राजमाता जिजाऊंनी बांधला आहे. पेशवे काळात गजाननराव सदाशिव दीक्षित यांनी त्यापुढे लाकडी सभामंडप उभारला. या सभामंडपात सुबक कोरीव काम केलेले आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर चांदीची सुंदर महिरप आहे. ही महिरप रावबहाद्दर गणपतराव महादेव केंजळे यांनी अर्पण केली होती. ‘लॉइड ब्रिज’ बांधताना आलेल्या अडचणी दूर झाल्यामुळे त्यांनी हा नवस पूर्ण केला. या पुलाला आज शिवाजी पूल म्हणून ओळखले जाते. हे मंदिर शनिवारवाड्याच्या अगदी जवळ आहे. पेशवे काळातही हे मंदिर त्यांच्या प्रशासकीय श्रद्धेचा अविभाज्य भाग होते. ते त्यांच्या दैनंदिन भक्तीचे महत्त्वाचे केंद्र होते.

१८९३ मध्ये लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. त्यावेळी मिरवणुकीतील अग्रक्रमावरून काही वाद निर्माण झाले होते. हे वाद मिटवण्यासाठी टिळकांनी कसबा गणपतीला ‘मानाचा पहिला गणपती’ हा बहुमान दिला. हे मंदिर पुण्याचे ग्रामदैवत आहे. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीत पहिला मान याच मंडळाचा असावा, असा सुज्ञ निर्णय टिळकांनी घेतला. तेव्हापासून पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ कसबा गणपतीच्या मिरवणुकीनेच होतो. त्यानंतर तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा या मंडळांच्या मिरवणुका सहभागी होतात. या सर्व मानाच्या पालख्या भव्य असतात. पारंपरिक वेशभूषेत आणि ढोल-ताशांच्या गजरात निघणारी ही मिरवणूक पुण्याच्या सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडवते.

कसबा पेठेत मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर राजस्थानी धोलपुरी दगडात बांधलेली स्वागत कमान आहे. या कमानीच्या सज्जावर मंगलकलशाची नक्षी कोरलेली आहे. मंदिरासमोर प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस सुमारे १५ फूट उंच पितळी स्तंभ आहेत. या स्तंभांच्या शीर्षभागी पितळी तुळशीवृंदावने बसवलेली आहेत. प्रवेशद्वाराजवळ पूजा साहित्याची काही दुकाने आहेत. या मंदिराला मजबूत तटबंदी आहे व त्यात तीन मजली प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वाराला नक्षीदार द्वारशाखा आहेत. ललाटबिंबावर गणपतीचे शिल्प व प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस दर्शनी भिंतीवर द्वारपालांची चित्रे आहेत. प्रांगणात तटबंदीला लागून काही महत्त्वाचे कक्ष आणि ओवऱ्या आहेत. लाकडी स्तंभ असलेल्या या ओवऱ्यांवर जाण्यासाठी लाकडी जीने आहेत. मंदिराचा हा परिसर अतिशय शांत आणि प्रसन्न आहे.

सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. दुमजली सभामंडपात नक्षीदार कमानींनी जोडलेले लाकडी स्तंभ आहेत. या स्तंभांवरील तुळईवर लाकडी तख्तपोशी आहे. यावर दुसऱ्या मजल्याचा सुंदर सज्जा आहे. सभामंडपाच्या दुसऱ्या मजल्यावरील स्तंभांवर लाकडी छत आहे. येथील दर्शनी भागात अष्टविनायकांच्या तसबिरी लावलेल्या आहेत. अंतराळ आणि गर्भगृह यांचे बांधकाम कोरीव पाषाणात आहे. हे बांधकाम शिवकाळातील ऐतिहासिक वारसा दर्शवते. अंतराळाच्या प्रवेशद्वारावर पानाफुलांची नक्षी कोरलेली आहे. येथील स्तंभांवर वरच्या बाजूला नागशिल्पे आहेत. देवकोष्टकांत गणपती, लक्ष्मी, विठोबा-रखुमाई व पंचमुखी हनुमाना यांच्या मूर्ती आहेत. येथेच जमिनीवर शिवपिंडी आणि नंदीची मूर्ती आहे.

गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराजवळ गणपतीची उत्सवमूर्ती आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर चांदीच्या पत्र्याचे आच्छादन आहे. गर्भगृहात वज्रपीठावर गणपतीची तांदळा स्वरूपातील पाषाण मूर्ती आहे. ही मूर्ती शेंदूरचर्चित असून तिची उंची साडेतीन फूट आहे. मूर्तीच्या डोळ्यांमध्ये हिरे आणि नाभीस्थानी माणिक बसवलेले आहेत. मंदिराच्या इतिहासात ५ ऑगस्ट २०२४ हा दिवस अतिशय महत्त्वाचा ठरला. या दिवशी मूर्तीवरील शेंदूर कवच काढण्याची वैज्ञानिक प्रक्रिया राबवण्यात आली. या मोहिमेत साधारण ६० किलो शेंदूर काढला गेला. त्यानंतर गणपतीचे मूळ आणि चतुर्भुज रूप प्रकट झाले. संशोधकांच्या मते हे रूप १५व्या किंवा १६व्या शतकातील असावे. गर्भगृहाच्या भिंतींवर नक्षीदार रजतपटल आच्छादन आहे. शिखराच्या पहिल्या थरात अष्टविनायक शिल्पे आहेत. शिखराच्या शीर्षभागी आमलक असून त्यावर कळस आणि ध्वजपताका आहे.

वर्षातून तीन वेळा येथे मोठ्या उत्साहात जन्मोत्सव साजरे केले जातात. हे उत्सव ज्येष्ठ, भाद्रपद आणि माघ महिन्यात असतात. भाद्रपद महिन्यात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होतो. यावेळी मंदिरात पार्थिव गणेशाची स्थापना केली जाते. यावेळी गणेशाची विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी हजारो भाविक येतात. १८९३ साली हा सार्वजनिक उत्सव सुरू झाला. परीक्षेच्या काळात आशीर्वाद घेण्यासाठी विद्यार्थ्यांची येथे मोठी रांग लागते. पुणेकरांच्या जीवनात या मंदिराचे स्थान अढळ आहे. कोणत्याही मंगलकार्याची पहिली पत्रिका देवाचरणी ठेवण्याची प्रथा आहे. प्रसिद्ध नाटककार राम गणेश गडकरी यांनी आपली नाटके येथेच अर्पण केली होती.

उपयुक्त माहिती

  • पुणे रेल्वे स्थानक व बस स्थानकापासून १.७ किमी अंतरावर
  • स्वारगेट एसटी स्थानकापासून ४ किमी अंतरावर
  • देशभरातील अनेक शहरांतून येथे येण्यासाठी विमान, रेल्वे व बस सेवा उपब्लध
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ९८८१९०७१५०
Back To Home