शिवछत्रपतींच्या घराण्याचे कुलदैवत असलेल्या शिखर शिंगणापूरच्या डोंगराच्या पायथ्याशी नातेपुते हे गाव वसलेले आहे. चौदाव्या शतकापर्यंतचा इतिहास असलेल्या या गावास प्राचीन काळी ‘शंकरापठण’ या नावाने ओळखले जाई. या गावामध्ये गिरिजापतीचे सुमारे पावणेसातशे वर्षांपूर्वीचे मंदिर आहे. गिरिजापतीस गिरिजाशंकर वा गौरीहर या नावांनीही संबोधले जाते. गिरिजापती हे मराठवाड्यातील मराठा समाजातील अनेकांचे कुलदैवत आहे. चैत्र शुद्ध पंचमी ते अष्टमी या काळात येथे मोठा उत्सव असतो. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी येथे हजारोंच्या संख्येने भाविक येतात.
सोलापूर, सातारा व पुणे या जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेले नातेपुते हे प्राचीन काळी एक छोटेसे खेडे होते. सोलापूर गॅझेटियरमधील नोंदीनुसार, बहामनी राजवटीतील (इ.स. १३४२ ते १४९०) एक मंत्री मलिक सुंदर याने या गावास आकार दिला. त्याच्या कार्यकाळात या गावास एका व्यापारी पेठेचे रूप आले. असे सांगितले जाते की औरंगजेबाने स्वराज्यावर स्वारी केली, त्या काळात त्याचा पुत्र शाहजादा अंजुमशाह याने शिखर शिंगणापूरचे मंदिर उद्ध्वस्त केले. त्यानंतर त्या डोंगरावर भरणारी शंभूमहादेवाची यात्रा साधारणतः इ.स. १७३५ पर्यंत नातेपुते या गावात भरत असे. असा इतिहास असलेल्या नातेपुतेमध्ये गिरिजापतीचे प्राचीन मंदिर स्थित आहे. हे मंदिर बहामनी काळात, इ.स. १३५० मध्ये उभारण्यात आल्याचे सांगण्यात येते.
नातेपुते गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले गिरिजापती मंदिर येथील तटबंदीमुळे एखाद्या किल्ल्यासारखे भासते. जमिनीपासून सुमारे २० फूट उंचीच्या येथील दगडी तटबंदीच्या वरील भागात बाशिंगी कठडा आहे. जमिनीपासून सुमारे १५ पायऱ्या चढून तटबंदीतील प्रवेशद्वाराजवळ असलेल्या मुखमंडपात प्रवेश होतो. या दुमजली मुखमंडपात दगडी स्तंभ व भाविकांना बसण्यासाठी दगडी कक्षासने आहेत. मुखमंडपाच्या वरील मजल्यावर नगारखाना आहे. दररोज पहाटे ५.३० च्या सुमारास येथे नगारावादन होते. येथील प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रशस्त प्रांगणात प्रवेश होतो. या प्रांगणात तटबंदीनजीक तीन प्राचीन उंच दिपमाळा आहेत. अमावस्या, पौर्णिमा आणि दर सोमवारी या दीपमाळांत दिवे लावले जातात. असे सांगितले जाते की शिखर शिंगणापूरच्या डोंगरावरूनही या दीपमाळा दिसतात.
मुख्य मंदिरासमोर स्थानिक देवतेचे पाषाण असलेले एक मंदिर आहे. तीन मुखमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. मंदिराच्या दर्शनी मुखमंडपात एका मोठ्या चौथऱ्यावर तीन पाषाणी नंदी आहेत. यापैकी मध्यभागी असणाऱ्या नंदीच्या मूर्तीमध्ये शिवपिंडी कोरलेली आहे. हा नंदी आकाराने मोठा तर इतर दोन त्या तुलनेत काहीसे लहान आहेत. येथील सभामंडप अर्धखुल्या स्वरुपाचा आहे व त्यात भाविकांना बसण्यासाठी दगडी कक्षासने आहेत. सभामंडपात अंतराळाच्या दर्शनी भिंतीवर उजवीकडील चौथऱ्यावर प्राचीन गणेशमूर्ती आहे. या गणेशमूर्तीच्या समोरील बाजूस धुनी आहे. उत्सवकाळात ही धुनी सतत पेटती असते. अंतराळाच्या प्रवेशद्वाराजवळ चार दगडी स्तंभ महिरपी कमानीने एकमेकांशी जोडलेले आहेत. गर्भगृहात मध्यभागी चौकोनी स्वयंभू शिवपिंडीवर तीन उंचवटे आहेत. असे सांगितले जाते की ही तीन लिंगे शंकर, पार्वती व गणपती यांची प्रतिके आहेत.
गिरीजापती मंदिरावरील कळसाचे काही वर्षांपूर्वी नुतनीकरण करण्यात आलेले आहे. पाच थर असलेल्या या कळसाच्या प्रत्येक स्तरावरील देवकोष्टकांमध्ये विविध देवतांच्या सुंदर रंगकाम केलेल्या मूर्ती आहेत. याशिवाय अनेक लहान लहान कळसांच्या प्रतिकृती आहेत. शिखराच्या अग्रभागी एक आमलक व त्यावर कळस आहे. असे सांगितले जाते की पूर्वी या मंदिराला शिखर नसल्यामुळे गावात कोणीही दुमजली बांधकाम करीत नव्हते. कोणी तसा प्रयत्न केला तरी त्यात ते यशस्वी होत नसत. मागील काही वर्षांत या मंदिरावर उंच शिखर बांधल्यानंतर या परिसरात दुमजली घरे बांधण्यास सुरूवात झाली.
गिरीजापती मंदिरासमोर विस्तीर्ण व उत्तम बांधणीचा तलाव आहे. पूर्वी उन्हाळ्यात या ठिकाणी यात्रा भरत असे. ऐतिहासिक नोंदींनुसार शाहू महाराजांचे आध्यात्मिक गुरू ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर यांनी हा तलाव यात्रेकरूंच्या सोयीसाठी बांधला होता. येथे चैत्र शुद्ध पंचमी ते अष्टमी या काळात मोठा उत्सव असतो. यावेळी परिसरातील गावांतून मानाच्या काठ्या व देवाला पाण्याने अभिषेक घालण्यासाठी कावडी आणल्या जातात. शिखर शिंगणापूर येथे होणाऱ्या शिव–पार्वती विवाहासाठी मराठवाड्यातील भातंगडी गावाच्या ‘भातंगडी काठी’चा मान असतो. भातगंडी काठी म्हणजे पाण्याची कावड गिरिजापतीला वाहिली जाते. पुढे ती काठी शिखर शिंगणापूरला नेली जाते. ती प्रथा आजही चालू आहे. या प्रतिकात्मक लग्नसोहळ्यातील नवरदेवाचा मान धनगर समाजातील माळशिरसच्या वाघमोडे पाटलांकडे असतो, तर नवरीचा मान नातेपुत्याच्या पांढरे–पाटील घराण्याकडे असतो.
श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी गिरीजापती मंदिरात गावकऱ्यांच्या वतीने महाप्रसाद भंडाऱ्याचे (अन्नदान) व सायंकाळी महादेव आखाड्यात महाराष्ट्रातील नामवंत मल्लांच्या कुस्त्यांचे आयोजन केले जाते. साताऱ्याच्या संस्थानाकडून लिलाव पद्धतीने दर वर्षी दैनंदिन पूजाअर्चा व व्यवस्थेचे नियोजन केले जाते. येथे आषाढी वारीच्या पालखी सोहळ्याचाही मुक्काम असतो. हे मंदिर व परिसर साताऱ्याचे राजे भोसले कुटुंबीयांच्या खासगी मालकीचे आहे. दररोज सकाळी ६.०५, दुपारी १२.०५ व सायंकाळी ६.४५ वाजता मंदिरात आरती होते. यावेळी गावातील अनेक भाविक मंदिरात उपस्थित असतात. सकाळी ५.३० ते दुपारी १२.३० व सायंकाळी ४ ते रात्री ८ वाजेपर्यंत भाविकांना गिरीजापती महादेवाचे दर्शन घेता येते.