‘नवनाथ भक्तिसार’मध्ये ‘विटा ग्रामी मान देशात। तेथे राहिले रेवणनाथ।’ अशी नोंद असलेल्या विटा शहराला मोठा इतिहास आहे. रामायणात अंबिका प्रांत म्हणून उल्लेख असलेल्या माणदेशात विट्याचा अंतर्भाव होतो. या परिसरावर मौर्य, सातवाहन, राष्ट्रकूट, चालुक्य, कलचुरी, शिलाहार, यादव या राजवंशांनी राज्य केले. हे सत्ताबदल होत असताना या भूभागावर इतिहासाच्या खुणा उमटत राहिल्या. या भागात प्राचीन मंदिरे त्या–त्या काळच्या स्थापत्यकलेची साक्ष देत आहेत. लाकडी खांबावर उभे असलेले येथील भैरवनाथ मंदिर हे त्यांपैकीच एक.
भैरवनाथ हे ‘प्रतिनिधींचे विटे’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहराचे ग्रामदैवत आहे. या मंदिराबाबत आख्यायिका अशी की भैरवनाथ हे विट्यानजीकच्या वासूबे गावचे दैवत होते. ते अनेकदा येथील कुलकर्ण्यांच्या घरी मुक्कामास येत असत. पुढे ते विट्याचेच ग्रामदैवत होऊन येथे स्थापित झाले. यानंतर, सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वी विट्यातील एक मातब्बर असामी असलेल्या विठ्ठल बाबासाहेब पाटील यांनी गावकऱ्यांच्या साह्याने हे मंदिर बांधले. ‘सांगली गॅझेटियर’मध्ये या मंदिराबाबत अशी नोंद आढळते की या मंदिराचा अलीकडेच लोकवर्गणीतून जीर्णोद्धार करण्यात आला आहे. १९६९ मध्ये या गॅझेटियरची रचना नव्याने करण्यात आली आहे. यावरून त्यापूर्वी सुमारे ५० ते ५५ वर्षांपूर्वी या मंदिराचा जीर्णोद्धार झाल्याचे स्पष्ट होते.
आज शहराच्या मध्यवर्ती असलेला हा भाग पूर्वी गावाची ‘पांढरी’ म्हणून ओळखला जात असे. यामुळे सिद्धनाथाला ‘पांढरीचा देव’ म्हणूनही संबोधले जाते. पांढरीचे देव म्हणून ओळखली जाणारी दैवते ही सहसा त्या गावातील वस्तीच्या स्थापनेच्या सुमारासच स्थापित केली जातात. यावरून येथील भैरवनाथाचे प्राचीनत्व स्पष्ट होते. रस्त्यालगत असलेल्या या मंदिरास समोरील बाजूला कोरीव पाषाणात बांधलेली भक्कम तटबंदी आहे. तटबंदीत दुमजली प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला चौथरे व त्यावर दंडधारी द्विभूज द्वारपाल शिल्पे आहेत. मंदिराचे फरसबंदी प्रांगण उंचावर असल्यामुळे प्रवेशद्वारास तीन पायऱ्या आहेत. प्रवेशद्वारास लोखंडी जाळीदार झडपा व दोन्ही बाजूला पहारेकरी कक्ष आहेत. पहारेकरी कक्षातून प्रवेशद्वाराच्या वरील मजल्यावर असलेल्या नगारखान्याकडे जाण्यासाठी पायऱ्या आहेत. नगारखान्यात हवा येण्यासाठी चारही बाजूंनी खिडक्या आहेत. नगारखान्याचे कौलारू छत वर खाली असे दोन भागांत विभागलेले आहे. छताच्या वरील भागावर डाव्या व उजव्या बाजूला दोन कळस आहेत. प्रवेशद्वाराच्या छतावर एकूण सहा कळस आहेत.
सभामंडप व गर्भगृह अशी या दुमजली मंदिराची संरचना आहे. सभामंडपाच्या तिन्ही बाह्य बाजूंना सुमारे २४ चौकोनी लाकडी स्तंभांवर उतरते छत आहे. हे स्तंभ पाषाणी स्तंभपादावर उभे आहेत. प्रांगणापेक्षा काही इंच उंचावर असलेला सभामंडप खुल्या स्वरूपाचा आहे. यात दोन्ही बाजूला प्रत्येकी चार लाकडी स्तंभ आहेत. सर्व स्तंभ नक्षीदार लाकडी महिरपी कमानीने एकमेकांशी जोडलेले आहेत. प्रत्येक कमानीच्या दोन्ही टोकांस लाकडी झुंबर आहेत. स्तंभांवर तुळया व तुळयांवर लाकडी तख्तपोशी आहे. तख्तपोशीस पितळी घंटा टांगलेली आहे. तख्तपोशीचा मधील भाग खुला व त्यावर वरील मजल्याच्या सज्जाचे कठडे आहेत. सभामंडपातील स्तंभ व तुळयांवर कलात्मक नक्षीकाम केलेले आहे. सभामंडपात जमिनीवर कासव शिल्प आहे.
सभामंडपापेक्षा येथील गर्भगृह उंच आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना चार नक्षीदार लाकडी स्तंभ आहेत. गर्भगृहात मध्यभागी चार नक्षीदार लाकडी स्तंभांच्या मखरात वज्रपीठावर भैरवनाथ देवाची सुमारे चार फूट उंचीची मूर्ती आहे. देवाच्या हातात खड्ग, त्रिशूल, डमरू व अमृतपात्र आणि अंगावर उंची वस्त्रे व अलंकार आहेत. डोक्याला फेटा आहे. अश्वारूढ देवाच्या पाठशिळेवर मध्यभागी कीर्तिमुख व दोन्ही बाजूंस पानाफुलांच्या नक्षी आहेत. देवाच्या उजव्या बाजूला शक्तीची मूर्ती आहे. गर्भगृहाचे लाकडी स्तंभांवर तोललेले छत व मध्यभागी मखराची रचना यामुळे मखराभोवतीने प्रदक्षिणा मार्ग तयार झालेला आहे.
मंदिराच्या बाह्य बाजूला भिंतीस लागून प्राचीन वीरगळ आहेत. मंदिरावर खाली व वर अशा दोन भागांत विभागलेले कौलारू छत आहे. छताच्या खालील भागात तीन दिशेला तीन खिडक्यांवर त्रिकोणी रचना व त्यावर कळस आहेत. छताचा वरील भाग डाव्या आणि उजव्या बाजूला उतरता आहे. यावर मागे व पुढे दोन कळस आहेत. मंदिराच्या छतावर एकूण पाच कळस आहेत.
चैत्र महिन्यात देवाचा मुख्य वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. चैत्र वद्य अष्टमीला नाथांचा जन्मोत्सव साजरा केला जातो. नवमीला देवाची पालखी निघते. पालखी सोहळ्यात पाच पालख्या सहभागी होऊन पालखी शर्यत होते. रात्री शोभेची दारू उडवून प्रकाशोत्सव साजरा केला जातो. हजारो भाविकांचा मेळा या पालखी उत्सवात सहभागी होतो. ढोल–ताशांच्या गजरात गुलाल उधळीत पालखी मिरवणूक निघते. पालखीत हत्ती व घोडे नाचवण्याची परंपरा आजही कायम आहे.
मंदिरात नवरात्रौत्सव भक्तीभावाने साजरा केला जातो. नऊ दिवस देवाची वेगवेगळ्या रूपांत पूजा बांधली जाते. दसऱ्याच्या दिवशी पाच पालख्या निघतात. यात गावातील गायकवाड, शितोळे, पाटील या मानकऱ्यांच्या तीन व दोन सिद्धांच्या पालख्या सहभागी होतात. सिध्दांच्या पालख्यांची शर्यत होते. हा पालखी सोहळा बघण्यासाठी व त्यात सामील होण्यासाठी हजारोंच्या संख्येने भाविक येतात. येथून निघालेल्या पालख्या गावातील चावडी चौक येथील मशिदीपर्यत जातात. यावेळी पालखी सोहळ्यात हिंदू–मुस्लिम बांधव सहभागी होतात.
दर गुरुवारी देवाला कौल लावून भाविक आपल्या कार्यात देवाचे पाठबळ असल्याची खात्री करून घेतात. सोमवार, पौर्णिमा, अमावस्या, आदी दिवशी मंदिरात भाविकांची गर्दी असते.