पुणे शहराच्या नैऋत्य भागात नन्हे-आंबेगाव रस्त्यावर वसलेले बीएपीएस श्री स्वामीनारायण मंदिर हे आधुनिक वास्तुकलेचे एक महत्त्वाचे केंद्र मानले जाते. फेब्रुवारी २०१७ मध्ये सार्वजनिक दर्शनासाठी खुले झालेले हे मंदिर राजस्थानमधील वैशिष्ट्यपूर्ण गुलाबी वालुकाश्मातून साकारले गेले. नागर शैलीवर आधारित या वास्तूची रचना भव्य व विस्तृत आहे. या मंदिर संकुलात भगवान स्वामीनारायण यांच्यासह विविध हिंदू देवतांच्या मूर्ती प्रतिष्ठापित आहेत. आंबेगाव डोंगराच्या पायथ्याशी असलेली ही वास्तू पुण्याच्या सांस्कृतिक वैभवात मोलाची भर घालते.
बीएपीएस ही प्रसिद्ध धार्मिक संस्था आहे. या संप्रदायाचे अनुयायी भगवान स्वामीनारायण यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी गुजरातमध्ये स्वामीनारायण भक्त संप्रदायाची स्थापना केली.
या संप्रदायाच्या गुरु-शिष्य परंपरेतील तिसरे गुरू ब्रह्मस्वरूप शास्त्रीजी महाराज यांनी पुढे गुजरातमधील बोचासन शहरात या संप्रदायाची पुनर्स्थापना करण्याचे कार्य केले. या ऐतिहासिक पुनरुत्थानामुळे या संस्थेला ‘बोचासनवासी श्री अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था’ किंवा ‘बीएपीएस’ असे नाव मिळाले. मागील शंभर वर्षांच्या कालावधीत या संप्रदायाचा जगभर मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला. सध्या जगभरात या संप्रदायाचे पन्नास हजारांहून अधिक स्वयंसेवक व दहा लाखांच्या आसपास भक्तगण कार्यरत आहेत. या संस्थेने जगभरात विविध ठिकाणी सांस्कृतिक मूल्यांचे जतन करणारी भव्य मंदिरे उभारली आहेत.
पुणे शहराच्या नैऋत्य दिशेला, मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर, आंबेगाव डोंगराच्या पायथ्याशी हे मंदिर आहे.
ऐतिहासिक वारसा लाभलेल्या पुणे शहराच्या सांस्कृतिक वैभवात या आधुनिक मंदिराने मोलाची भर घातली आहे. राजस्थानी गुलाबी रंगाच्या वैशिष्ट्यपूर्ण वालुकाश्मातून या भव्य मंदिराची उभारणी करण्यात आली. या मंदिराच्या बांधकामाचे वैशिष्ट्य म्हणजे यात पोलादाचा किंवा लोखंडाचा वापर केलेला नाही. प्राचीन भारतीय वास्तुशास्त्राच्या नियमांचे तंतोतंत पालन करून हे मंदिर केवळ पाषाणांची एकमेकांत गुंफण करून उभे केले आहे.
राजस्थानमधील कुशल सोमपुरा कारागिरांनी प्रत्येक दगडावर अत्यंत बारकाईने हाताने कोरीव काम केले. राजस्थानात कोरलेले दगड येथे आणून एकमेकांत कौशल्याने बसवले आहेत. मंदिराच्या महाद्वारावर असलेल्या राजस्थानी तोरण शैलीतील भव्य कमानींवर हत्ती व मोर यांसह विविध देवतांची शिल्पे कोरलेली आहेत. या महाद्वारातून मंदिराच्या प्रशस्त प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणात मंदिराच्या मुख्य वास्तूभोवती सुशोभित उद्याने आणि कारंजी आहेत. मुख्य मंदिरासमोर प्रांगणात गणेश व हनुमान यांच्या मूर्ती आहेत.
मुखमंडप, सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. प्रांगणातून काही पायऱ्या चढून मंदिराच्या खांबांवर आधारलेल्या मुखमंडपात प्रवेश होतो. मुखमंडपाच्या छतावर वैशिष्ट्यपूर्ण नक्षीकाम केलेले आहे. मुखमंडपाच्या पुढे प्रशस्त सभामंडप आहे. येथील तब्बल १४० कोरीव स्तंभांवर नर्तकी आणि वादक यांसह पौराणिक कथांमधील विविध प्रसंग कोरलेले आहेत. या सभामंडपाचे छत आतून घुमटाकार आहे. या जागेवर एक देखणे झुंबर टांगलेले आहे. गर्भगृहाच्या दरवाजांवर उत्कृष्ट लाकडी कोरीव काम व त्यावर चांदीच्या पत्र्याचे आवरण आहे. गर्भगृहात भगवान स्वामीनारायण आणि त्यांचे प्रथम आध्यात्मिक उत्तराधिकारी अक्षरब्रह्म गुणातीतानंद स्वामी यांच्या वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती आहेत. या मुख्य मूर्तीसोबतच येथे संप्रदायाच्या गुरुपरंपरेतील इतर प्रमुख गुरूंच्या मूर्तीही आहेत.
मंदिर संकुलात श्री लक्ष्मी-नारायण व राधा-कृष्ण, श्री बालाजी, विठ्ठल-रुक्मिणी आणि शंकर-पार्वती यांची मंदिरे आहेत. याशिवाय संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ आणि संत नामदेव यांसारख्या महाराष्ट्रातील थोर संतांच्या मूर्ती येथे आहेत.
मंदिरावर नागर शैलीतील मोठी व उंच शिखरे आहेत. मुख्य गर्भगृहाच्या वर असलेल्या सर्वात उंच शिखराभोवती इतर लहान उप-शिखरांची रचना आहे. त्या सर्वांवर सोन्याचा मुलामा दिलेले कळस आहे. तब्बल ७४ फूट उंचीचे हे शिखर दूरूनही लक्ष वेधून घेते. रात्रीच्या वेळी मंदिरावर केलेल्या रोषणाईमुळे शिखरांचे व कळसांचे सौंदर्य अधिक खुलून दिसते.
मंदिरातील दैनंदिन विधी हे प्राचीन परंपरेनुसार आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडले जातात. येथे दररोज पाच वेळा आरती केली जाते. सकाळी सहा वाजता होणाऱ्या मंगल आरतीने दिवसाची सुरुवात होते. त्यानंतर साडेसात वाजता श्रृंगार आरती व सव्वा अकरा वाजता राजभोग आरती होते. सायंकाळी सात वाजता होणाऱ्या संध्या आरतीसाठी येथे शेकडो भाविक उपस्थित असतात. रात्री साडेआठ वाजता शयन आरती झाल्यानंतर देवांच्या विश्रांतीसाठी पट बंद केले जातात.
‘अन्नकूट’ हा या मंदिरातील सर्वात मोठा उत्सव आहे. हा उत्सव दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच कार्तिक शुद्ध प्रतिपदेला साजरा करतात. या दिवशी विविध प्रकारचे शुद्ध शाकाहारी पदार्थ तयार करून ते देवाला महानैवेद्य म्हणून अर्पण करण्याची प्रथा आहे. भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून इंद्राच्या कोपापासून गोकुळवासीयांचे रक्षण केल्याच्या स्मरणार्थ ही पूजा केली जाते. या वेळी मंदिरात शेकडो पदार्थांची कलात्मक मांडणी केली जाते. अन्नाच्या या डोंगरासारख्या राशीलाच ‘अन्नकूट’ असे संबोधले जाते. याशिवाय जन्माष्टमी व स्वामीनारायण जयंती यांसारखे सण मोठ्या उत्साहात साजरे होतात. धार्मिक कार्यासोबतच या मंदिरातर्फे रक्तदान शिबिरे आणि आपत्ती व्यवस्थापन यांसारखी सामाजिक कार्येही केली जातात. दररोज सकाळी साडेसात ते दुपारी बारा आणि सायंकाळी चार ते रात्री नऊ या वेळेत भाविक येथे दर्शन घेऊ शकतात.