‘सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही’ ही शिकवण देणारे स्वामी समर्थ हे श्रीदत्ताचे तिसरे अवतार मानले जातात. १८०० ते १८०९ या काळात गोदावरी परिक्रमा करताना स्वामी त्र्यंबकेश्वरमधील ज्या वटवृक्षाखाली विश्रांतीसाठी थांबले होते, त्या जागेवर आज भव्य असे श्री स्वामी समर्थांचे मंदिर व गुरुपीठ उभे आहे.
असे सांगितले जाते की मानव कल्याणासाठी श्रीदत्ताने तीन अवतार घेतले. श्रीपाद वल्लभ रूपात त्यांनी जनसामान्यांची अंधश्रद्धा दूर करण्यासाठी खऱ्या देवाचा जगाला परिचय करून दिला. नृसिंह सरस्वती अवतारात त्यांनी धर्मजागृती केली आणि श्री स्वामी समर्थ अवतारात त्यांनी धर्मजागृतीसह माणसाच्या अंतरंग परिवर्तनावर भर दिला. ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’ या त्यांच्या धीराच्या बोलाने भक्तांमधील आत्मविश्वास जागवला.
सह्याद्री व ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी वसलेल्या त्र्यंबकेश्वराची महत्त्वाचे धार्मिक तीर्थक्षेत्र म्हणून संपूर्ण देशात ख्याती आहे. येथे ब्रह्मा, विष्णू आणि महेशाचे स्थान आहे. हे तीनही रूपे म्हणजेच श्री दत्तात्रेय समजले जातात. याशिवाय गोदावरीचे उगमस्थान, कुशावर्त तीर्थ, गौतम ऋषींची शेती संशोधन भूमी, निवृत्तीनाथांची समाधी, पिठले महाराजांची तपोभूमी असलेल्या या पावनभूमीचे सौंदर्य वाढविणारे श्री स्वामी समर्थांचे मंदिर व गुरुपीठ त्र्यंबकेश्वर गावाच्या पूर्वेला ब्रह्मगिरी पर्वताच्या उतारावर आहे.
गुरुपीठाचे बांधकाम हे शास्त्रशुद्ध व वास्तुशास्त्रानुसार करण्यात आलेले आहे. हे बांधकाम पूर्वेकडून पश्चिमेकडे असे करण्यात आले. गुरुपीठाच्या कळसावर प्राचीन वास्तुशास्त्राप्रमाणे श्रीयंत्र बसवविण्यात आलेले आहे. श्रीयंत्रामुळे धन, धान्य, ज्ञान, श्रद्धा, भक्ती, सेवा या सर्वांचा अखंड वास असतो, अशी धारणा आहे. (धर्मग्रंथांनुसार असे मानले जाते की श्रीयंत्र हा देवी लक्ष्मीचा अंश आहे, त्यात महालक्ष्मी वास करते. श्रीयंत्र ज्या ठिकाणी ठेवले जाते, तेथील वातावरण पवित्र आणि शुद्ध होते) दोन दिशांना दशमहाविद्या यंत्र आणि अष्टभैरव यंत्राची स्थापना करण्यात आली आहे. शाक्तसंप्रदायात ज्या दहा प्रधान रूपांनी देवीची उपासना केली जाते, त्या देवता समूहाला दशमहाविद्या असे म्हणतात. त्यामध्ये महाकाली, उग्रतारा, षोडशी, भुवनेश्वरी, छिन्नमस्ता, भैरवी, धूमावती, बगलामुखी, मातंगी व कमला यांचा समावेश आहे, तर अष्ट भैरव हे कालभैरवाचे आठ प्रकटीकरण आहेत. ते आठ दिशांचे पालक आणि नियंत्रक आहेत. त्यामध्ये असीथंगा भैरव, उन्माथा भैरव, भीषण भैरव, चंदा भैरव, रुरू भैरव, क्रोधा भैरव, समारा भैरव आणि कपाला भैरव यांचा समावेश आहे. गुरुपीठ उभारणीसाठी अनेक सेवेकऱ्यांनी श्रमदानही केलेले आहे.
श्री स्वामी समर्थ गुरुपीठ हे अध्यात्म आणि मानवी संस्कारांचे उत्तम केंद्र मानले जाते. भारतीय संस्कृती व मराठी अस्मिता, गर्भसंस्कार व पालकत्व, बालसंस्कार, कृषी, युवा प्रबोधन, विवाह संस्कार, वास्तुशास्त्र, वेद संशोधन, स्वयंरोजगार, पर्यावरण आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी येथे स्वतंत्र विभाग तयार करण्यात आले आहेत. येथे असलेल्या प्रश्नोत्तरे विभागाची एक वेगळी ओळख आहे. समस्याग्रस्त व पीडित व्यक्तींच्या समस्या जाणून आध्यात्मिक मार्गदर्शनाद्वारे त्या सोडविण्याचे कार्य या विभागाकडून विनामूल्य केले जाते. भव्य प्रसादालय, धर्मादाय रुग्णालय, दुर्मिळ पुस्तकांचे ग्रंथालय, सुसज्ज भक्तनिवास व प्रशस्त वाहनतळ येथे आहे. त्यामुळे धर्म आणि विज्ञानाचा सुरेख संगम येथे पाहायला मिळतो.
गुरुपीठात प्रवेश करण्यापूर्वी पाय धुऊन औदुंबराला प्रदक्षिणा घालून स्वामी भक्तांना प्रवेश दिला जातो. प्रशस्त अशा या गुरुपीठाच्या पूर्वाभिमुख महाद्वारातून स्वामी समर्थांच्या मुख्य दरबारात प्रवेश करता येतो. स्वामी समर्थांचे मुख्य स्थान दरबाराच्या मध्यभागी आहे. याठिकाणी चांदीच्या देव्हाऱ्यात मयूरासनावरील स्वामींची मूर्ती आहे. याशिवाय दरबारात काळभैरवाची काळ्या पाषाणाची मूर्ती, श्री हनुमान, रेणुका माता, महालक्ष्मी, तुळजाभवानी व सप्तशृंगी माता या देवतांच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या प्रांगणात गोदावरी परिक्रमा करीत असताना स्वामी ज्या ठिकाणी थांबले होते तेथे वटवृक्ष मंदिर आहे. यासोबतच पिठले महाराजांचे स्मृतिस्थान, मोरेदादांचे स्मृतिस्थान व यज्ञभूमी आहे.
चैत्र वैद्य त्रयोदशीला स्वामी समर्थांची पुण्यतिथी व दत्त जयंतीनिमित्त येथे अखंड नामजप व गुरुचरित्र पारायण सोहळा होतो. याशिवाय दर महिन्याच्या चौथ्या शनिवारी देश–विदेशातून येणाऱ्या सेवेकरी, सेवा केंद्रांचे प्रतिनिधी व भाविकांना येथे मार्गदर्शन केले जाते. दररोज दुपारी व सायंकाळी भाविकांना माफक दरात महाप्रसाद देण्यात येतो. याशिवाय भाविकांना येथील भक्तनिवासात वास्तव्याची सुविधा आहे. सकाळी ६ ते सायंकाळी ८ पर्यंत भाविक मंदिरात स्वामी समर्थांचे दर्शन घेऊ शकतात.