पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात कारंजे गावात सोमेश्वर महादेवाचे प्राचीन व प्रसिद्ध मंदिर आहे. जेजुरी व मोरगावपासून जवळ असलेल्या या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथील सोमेश्वर महादेव जिवंत सापाच्या रूपात मंदिरात येऊन भाविकांना दर्शन देतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. हे स्थान जागृत असल्याचे सांगितले जाते.
मंदिराची आख्यायिका अशी की कारंजे गावात महादू गवळी याचे कुटुंब राहत असे. त्याची पत्नी मालू हिला अपत्य नसल्याने सासू व नणंदेकडून तिचा छळ होत असे. असे असले तरी मालू वेळ मिळेल तेव्हा देवपूजेत रमत असे. एके दिवशी दारात आलेल्या साधूने तिला शिवोपासना करण्यास सांगितले. त्यानुसार तिने तब्बल १२ वर्षे उपासना केल्यानंतर महादेवाने स्वप्नदृष्टांत देऊन सौराष्ट्रातील सोरटी सोमनाथ येथे येऊन माझी पूजा कर, असे तिला सांगितले. त्यासाठी दररोज मध्यरात्री तिला घेण्यासाठी सौराष्ट्रातून कारंजे गावात महादेव विमान पाठवत असत. दररोज ती मध्यरात्री त्या विमानातून जाऊन सोरटी सोमनाथाची पूजा करत असे व पहाटे परतत असे.
मालूचा हा दिनक्रम सुरू असताना एकेदिवशी पती महादू गवळी याने तिचा पाठलाग करण्याचे ठरविले. त्यानुसार तिला घेण्यासाठी आलेल्या विमानात तिच्या नकळत बसून तो सौराष्ट्रात गेला. तिच्यासाठी मध्यरात्री सोरटी सोमनाथ मंदिराचे दरवाजे आपसूक उघडले गेल्याचे त्याने पाहिल्यावर आपल्या पत्नीच्या भक्तीची त्याला कल्पना आली, परंतु परतीच्या विमानात त्याला बसता न आल्याने तो तेथेच राहिला. इकडे कारंजे गावात महादू गायब झाल्याची चर्चा सुरू झाली व मालूनेच त्याला गायब केले, असा तिच्यावर आळ घेतला गेला. मग महादेवांनी तिला स्वप्नदृष्टांत देऊन ‘तू आता सौराष्ट्रात येण्याची गरज नाही, मी तुझ्या गावातच तुला सर्परूपाने गायीच्या कासेला पिताना दिसेन, त्यावेळी तू माझे दर्शन कर’, असे सांगितले. या गावातील खोमणे गुराख्याला गायीच्या अंगावर साप दिसला व त्याने सापावर कुऱ्हाडीने घाव घालण्याचा प्रयत्न केला. मालूच्या हे लक्षात आल्यावर तिने महादेवाची माफी मागितली. त्यानंतर महादेवांनी मी तुझ्या गावात लिंगरूपात प्रगट होईन, असा स्वप्नदृष्टांत दिला.
इकडे महादू गवळी परत न आल्याने सर्व गावकऱ्यांनी शिक्षा म्हणून मालूला जाळून मारण्याचे ठरविले. मात्र, आपल्याला महादेवाने जो स्वप्नदृष्टांत दिला आहे ती अखेरची इच्छा म्हणून मान्य करावी, असे तिने गावकऱ्यांना विनविले. तिने सांगितल्यानुसार गावकऱ्यांनी खोदकाम केले असता तेथून पाण्याची धार आली व तेथेच शिवलिंगही सापडले. दरम्यान, हा प्रकार सुरू असताना महादू गवळी गावात आला व त्याने महादेवाकडून मालूसाठी येत असलेले विमान, सौराष्ट्रातील सोरटी सोमनाथाचे वर्णन व पत्नीच्या भक्तीचा महिमा गावकऱ्यांना सांगितला. ते ऐकून गावकरी खजिल झाले.
तेव्हापासून या मंदिरात जाताना आधी मालूबाईचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. तसेच जेथे पाण्याची धार निघाली ती विहीर ‘तीर्थाची विहीर’ समजली जाते. आजही तेथे खऱ्या–खोट्याची शपथ घेतली जाते. श्रावणातील तिसऱ्या सोमवारी निघणाऱ्या पालखीमध्ये कुऱ्हाडीचा वार करणाऱ्या खोमण्याला पहिले महादेवाचे दर्शन झाले म्हणून येथील खोमणे आडनावाच्या गुराख्याला दर्शनाचा मान पहिला दिला जातो.
हा परिसर ‘सोमायचे कारंजे’ म्हणूनही प्रसिद्ध आहे. या मंदिराचा मधल्या काळात जीर्णोद्धार झाल्यानंतर त्याला सध्याचे हे स्वरूप आले आहे. मंदिराचा परिसर प्रशस्त आहे. त्यात दगडी दीपमाळ, तुळशी वृंदावन व अनेक मोठे वृक्ष पाहायला मिळतात. मंदिराच्या मुख्य दरवाजाच्या समोर असलेल्या पुष्करणीमधील (बारव) पाणी भाविक तीर्थ म्हणून प्राशन करतात.
हे मंदिर द्वापार युगातील असल्याचे सांगितले जाते. सभामंडपात एका चौथऱ्यावर ३ नंदींचे दर्शन होते. असे नंदी अपवादानेच पाहायला मिळतात. या नंदींच्या समोर सभामंडपात एक शिवलिंग आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर दगडातील कोरीव काम आहे. त्यामध्ये अनेक लहान–मोठी शिल्पे कोरलेली दिसतात. गर्भगृहात महादेवाची स्वयंभू पिंड आहे. मंदिराजवळ तटबंदीमध्ये एक ‘चाफ्याची आळी’ आहे. भाविकांना दर्शन देण्यासाठी आलेल्या सापाची पूजा–अर्चा करून या जागेवर सोडण्यात येते. मंदिरापासून ३ किमी अंतरावर मालूबाईचे मंदिर आहे. असे सांगितले जाते की याच ठिकाणाहून मालू सौराष्ट्रातील सोरटी सोमनाथ मंदिरात जात असे. येथेच तिला नेण्यासाठी येणाऱ्या विमानाची जागाही दाखविण्यात येते.
महाशिवरात्री व प्रत्येक श्रावणी सोमवारी तेथे मोठी जत्रा भरते. असे सांगितले जाते की श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी येथे सर्परूपी महादेव भाविकांना दर्शन देतात. त्याला येथे ‘स्वारी येणे’ असे म्हटले जाते. सौराष्ट्रातील सोरटी सोमनाथ येथून प्रत्यक्ष महादेवच सापाच्या रूपात इथे येतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. या सापाचा रंग, आकार, अवतरण्याची वेळ ही प्रत्येक वेळी वेगळी असते. या सापाच्या रंग व आकारावरून येथील ज्येष्ठांकडून हवामानाचे अंदाजही वर्तविण्यात येतात. चिंचेच्या वनातील विस्तीर्ण परिसरात असलेल्या हेमाडपंती शैलीतील या मंदिराला राज्य सरकारकडून तीर्थक्षेत्राचा ‘ब’ दर्जा देण्यात आला आहे. (ज्या देवस्थानाच्या दर्शनासाठी वर्षाला ४ लाखांहून अधिक भाविक येतात, अशा देवस्थानाला राज्य सरकारकडून तीर्थक्षेत्राचा ‘ब’ दर्जा प्राप्त होतो. त्या दर्जानुसार येथे येणाऱ्या भाविकांच्या सोयीसुविधांसाठी वेळोवेळी शासनाकडून निधी उपलब्ध होतो.