जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात असलेल्या गुंज येथील सुंदरेश्वर महादेव मंदिराला मोठा ऐतिहासिक वारसा आहे. इ.स. १२७० मध्ये निंबाळकर घराण्याचे मूळ पुरुष निंबराज परमार यांनी फलटण जवळील जंगलात मुक्काम केला होता. त्यांच्या नावावरून या परिसराला आणि जंगलाला निंबळज असे नाव पडले. यावरूनच हे घराणे निंबाळकर या नावाने ओळखले जाऊ लागले. त्यांनी अनेक राजांच्या पदरी सरदारकी केली. याच निंबाळकर घराण्यातील कर्तबगार पुरुषांनी महाराष्ट्रात अनेक मंदिरे बांधली. यांपैकी एक मंदिर जालना जिल्ह्यातील गुंज गावात आहे. या मंदिरात भाविकांना आध्यात्मिक शांतता लाभते अशी सर्वसामान्य मान्यता आहे.
‘सुंदरेश्वर’ या नावाचा अर्थ ‘अतिशय सुंदर असलेला ईश्वर’ असा होतो. भारतीय पुराण साहित्यात भगवान शिवाचे सामान्यतः वैरागी, भस्मधारी आणि जटाधारी रूप आढळते. मात्र, शिव महापुराण आणि इतर ग्रंथांमध्ये त्यांच्या सौम्य, कल्याणकारी व देखण्या रूपाचा उल्लेख येतो. शिवाच्या याच सुंदर रूपाला ‘सुंदरेश्वर’ किंवा ‘सुंदरमूर्ती’ म्हटले गेले आहे. या नावाचा मुख्य संदर्भ स्कंद पुराणातील ‘हाळास्य माहात्म्य’ या भागात सापडतो. या ग्रंथातील कथेनुसार, दक्षिण भारतातील मदुराई परिसरातील राजा मलयध्वज आणि राणी कांचनमाला यांच्या पोटी देवी पार्वतीचा अंशावतार असलेली कन्या जन्माला आली आणि तिचे नाव ‘तडादकई’ म्हणजेच मीनाक्षी असे ठेवले गेले. तिने पराक्रमाने तिन्ही लोकांवर विजय मिळवला होता.
शेवटी जेव्हा ती कैलास पर्वतावर भगवान शिवाशी युद्ध करण्यासाठी पोहोचली, तेव्हा शिवाला पाहताच तिची युद्धाची भावना संपली आणि तिने शिवाला आपले पती मानले. भगवान शिवाने मीनाक्षीशी विवाह करण्यासाठी सुंदर रूप धारण केले. मदुराई येथे झालेल्या या विवाहाच्या वेळी शिवाच्या या रूपाला ‘सुंदर पांड्यन’ किंवा ‘सुंदरेश्वर’ असे नाव मिळाले. स्कंद पुराणात या विवाहाचे आणि शिवाच्या सुंदर रूपाचे विस्तृत वर्णन आहे. शिव महापुराणाच्या ‘रुद्र संहिते’नुसार शिवाचे हे रूप सृष्टीच्या निर्मितीचे व सौंदर्याचे प्रतीक मानले जाते.
हे मंदिर सुमारे तीनशे वर्षे प्राचीन आहे. ते इ.स १६९२ मध्ये सुलतानजी निंबाळकर, त्यांची पत्नी आणि मुलगा हनुमंत निंबाळकर यांनी बांधल्याचा ऐतिहासिक शिलालेख मंदिराच्या भिंतीवर आहे. हा उठाव शैलीतील शिलालेख अंतराळाच्या डाव्या बाजूच्या भिंतीवर आहे. शके १६१४, अंगिरा संवत्सरात, हेमंत ऋतूत मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पंचमीला हे मंदिर पूर्ण झाले. दहा हात आणि पाच मुखे असलेल्या महादेवाच्या चरणी सेवा रुजू करून हे मंदिर उभारल्याचा उल्लेख असलेला हा शिलालेख आजही स्पष्ट वाचता येतो.
निंबाळकरांनी अहमदनगरची निजामशाही आणि विजापूरची आदिलशाही पराक्रमाने गाजवली. त्यामुळे या घराण्याला ‘नाईक’ ही पदवी मिळाल्याने ‘नाईक निंबाळकर’ हे नाव रूढ झाले. पुढे निंबाळकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांची सेवा स्वीकारली. हे घराणे अनेक पिढ्या छत्रपतींचे निष्ठावान सेवक आणि सरलष्कर होते. तत्कालीन मराठवाडा प्रांत त्यांच्या जहागिरीचा भाग होता.
गावापाशी नदीतीरावरील मंदिरापर्यंत जाण्यासाठी पक्का रस्ता आहे. मंदिरासमोर प्रशस्त वाहनतळ आहे. प्राचीन काळी मंदिराकडे जाण्यासाठी प्रामुख्याने जलमार्ग वापरला जात असावा, असा अंदाज वर्तवला जातो. मंदिराची तटबंदी पायापासून कोरीव दगडांची आहे आणि वरील भिंती जुन्या विटांच्या आहेत. या तटबंदीतील दोन प्रवेशद्वारांपैकी पूर्व दिशेचे प्रवेशद्वार दुमजली आहे. या प्रवेशद्वाराच्या वरील मजल्यावर नगारखाना आहे. पेव्हरब्लॉक बसवलेल्या मंदिराच्या प्रांगणात अनेक जुने वृक्ष आहेत आणि या वृक्षांखाली बसण्यासाठी आसने तयार केली आहेत.
मंदिरासमोर कोरीव दगडातील नंदीमंडप सुमारे चार फूट उंच चौथऱ्यावर आहे. या चौथऱ्याच्या चारही भिंतींवर कमळपुष्पांचे कोरीव काम आहे. चौथऱ्यावर चढण्यासाठी चार पायऱ्या आहेत. त्याच्या मध्यभागी वज्रपीठावर काळ्या दगडातील नंदीमूर्ती प्रस्थापित आहे. त्याच्या चार कोनांवर चार नक्षीदार स्तंभ आहेत. मंडपाच्या छतावर तीन थरांचे शिखर आहे. शिखराच्या पहिल्या चौकोनी थराखालील पट्टिकेत नागफणीमंडल आहे. शिखराच्या चारही दिशांच्या दर्शनी भिंतींवर देवकोष्टके आहेत. त्यांमध्ये देवमूर्ती आहेत. प्रत्येक कोष्टकाच्या डाव्या आणि उजव्या बाजूला दोन देवमूर्ती असल्याने पहिल्या थरात एकूण बारा देवमूर्ती दिसतात. शिखराच्या दुसऱ्या थरात चार कोनांवर प्रत्येकी दोन देवमूर्ती आहेत. शिखराचा दुसरा थर घुमटाकार आहे. शिखराच्या शीर्षभागावर आमलक, कळस आणि ध्वजपताका आहेत.
सभामंडप आणि गर्भगृह रचना असलेले हे मंदिर उंच चौथऱ्यावर आहे. या चौथऱ्याला पायऱ्या आहेत. सभामंडप समोरून अर्धखुल्या स्वरूपाचा आहे. सभामंडपात चौकोनी स्तंभपादावर उभारलेल्या नक्षीदार स्तंभांच्या चार रांगा आहेत आणि प्रत्येक रांगेत तीन स्तंभ आहेत. स्तंभदंडात चौकोन, षटकोन, अष्टकोन आणि वर्तुळ असे विविध आकार कोरलेले आहेत. स्तंभांच्या वरच्या भागातील कणीवर हस्त आहेत. प्रत्येक स्तंभावरील हस्तांवर यक्ष, नाग, वादक आणि पशू शिल्पे कोरलेली आहेत. या हस्तांवर तुळया आणि छत आहे. प्रत्येक चार स्तंभांच्या मधील अष्टकोनी वितानावर (छतावर) चक्राकार नक्षी आहे. सभामंडपाच्या जमिनीवर कासवाचे शिल्प आहे. पुढे गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. गर्भगृहाच्या द्वारशाखांवर वेलबुट्टीची नक्षी, ललाटबिंबावर गणेशशिल्प आणि ललाटपट्टीवर पत्रपुष्पांची नक्षी आहे.
व मन्दारकावर कीर्तिमुख आहे. गर्भगृहात जमिनीवर शिवपिंड आहे. शिवपिंडीवर पितळी नाग आहे आणि त्यावर अभिषेक करण्यासाठी छताला पात्र टांगले आहे. गर्भगृहाच्या मागील भिंतीतील देवकोष्टकात पार्वतीची मूर्ती बसवली आहे. गर्भगृहाचे घुमटाकार छत भिंतींवर तोललेले आहे. वितानाच्या मध्यभागी चक्राकार नक्षी आहे.
मंदिराच्या मंडोवरावर भैरवाचे शिल्प आहे. डाव्या बाजूच्या भिंतीवरील गोमुखातून शिवपिंडीवर वाहिलेले पाणी बाहेर पडते. गोमुखाखाली तीर्थकुंड आहे. मंदिराच्या छताच्या चारही कोपऱ्यांवर नंदीशिल्पे आहेत. गर्भगृहाच्या छतावर सहा थरांचे चौकोनी शिखर आहे. शिखराच्या खालच्या भागातील चारही भिंतींवर प्रत्येकी पाच देवकोष्टके आहेत आणि त्यांमध्ये देवमूर्ती प्रस्थापित आहेत. शिखराच्या प्रत्येक थरावरील चारही भिंतींवर चार देवकोष्टके आहेत आणि त्यांमध्ये देवमूर्ती आहेत. प्रत्येक कोष्टकाच्या डाव्या आणि उजव्या बाजूला मिळून एकूण सहा देवमूर्ती आहेत. शिखराचा सहावा थर घुमटाकार आहे. शिखराच्या शीर्षभागावर आमलक, कळस आणि ध्वजपताका आहेत.
येथे महाशिवरात्री हा मुख्य वार्षिक उत्सव असतो. याशिवाय श्रावणातील प्रत्येक सोमवारी भाविक दर्शनासाठी येतात. नागपंचमीला मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. मंदिरात आवळी बारस (आमली बारस) साजरी केली जाते. उत्सवांच्या काळात मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रम, जिल्ह्यातील प्रसिद्ध कीर्तनकारांची कीर्तने आणि परिसरातील गायकांचे भजनाचे कार्यक्रम होतात. उत्सवानिमित्त भाविकांसाठी मंदिर समिती महाप्रसादाची व्यवस्था करते. सोमवार, प्रदोष, पौर्णिमा, अमावस्या आणि इतर सण-उत्सवांच्या वेळी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते.