मराठवाड्याच्या भूमीवर लातूर शहराने ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेची मोहोर उमटविलेली आहे. या शहराच्या मध्यवर्ती भागात विसावलेले ‘गंज गोलाई’ आणि त्यामधील जगदंबा माता मंदिर हे मराठवाड्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. गंज गोलाईच्या इमारतीपासून सोळा रस्ते सूर्याच्या किरणांप्रमाणे बाहेर पडतात. शहराच्या कोणत्याही कोपऱ्यातून किंवा या सोळा रस्त्यांवरून पाहिले असता मंदिराचा कळस आणि घुमट सहज दृष्टीस पडतो, हे येथील वैशिष्ट्य आहे. विसाव्या शतकात अस्तित्वात आलेल्या या मंदिरातील जगदंबा मातेवर लातूरकरांची गाढ श्रद्धा आहे. ती या शहराची रक्षक देवता मानली जाते.
लातूरचा इतिहास इसवी सनाच्या अनेक शतकांपूर्वीचा आहे. प्राचीन कोरीव लेख आणि ताम्रपटांनुसार हे शहर राष्ट्रकूट राजवंशाचे उगमस्थान म्हणजेच लत्तलूर म्हणून ओळखले जात असे. राष्ट्रकूट राजे हे कला आणि स्थापत्यशास्त्राचे भोक्ते होते. ते शिव-शक्तीचे उपासक असल्याने, त्यांनी आपल्या राजधानीच्या मध्यभागी कुलदेवतेची स्थापना केली असावी, असे मानले जाते. काळाच्या ओघात या शहराची रचना बदलली असली, तरी जगदंबा मातेचे महत्त्व आजही तितकेच अढळ आहे.
विसाव्या शतकाच्या सुरुवातीला, जेव्हा लातूर हैदराबाद निझामाच्या संस्थानाचा भाग होते, तेव्हा शहराच्या वाढत्या व्यापाराला शिस्तबद्ध रूप देण्यासाठी एका मध्यवर्ती बाजारपेठेची संकल्पना पुढे आली. १९१७ च्या सुमारास या महत्त्वाकांक्षी गंज गोलाई प्रकल्पाची पायाभरणी झाली. त्याचे शिल्पकार श्री. फैयाझुद्दीन हे होते. त्यांनी या वास्तूची रचना करताना युरोपातील ‘रेडियल प्लॅनिंग’ आणि भारतीय वैदिक ‘कार्मुक’ पद्धतीचा सुरेख संगम साधला. धनुष्यासारखी किंवा गोलाकार असणारी ही रचना अशा प्रकारे केली गेली की शहराच्या मध्यबिंदूवर म्हणजेच ब्रह्मस्थानी देवीच्या मंदिराची जागा निश्चित करण्यात आली.
जगदंबा मातेला महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजापूरच्या भवानी मातेचाच एक अंश मानले जाते. एका प्रचलित आख्यायिकेनुसार, जेव्हा १९१७ मध्ये गंज गोलाईचे बांधकाम सुरू झाले, तेव्हा त्या ठिकाणी देवीचे एक प्राचीन मूळ स्थान होते. असे म्हटले जाते की तत्कालीन निझाम प्रशासनाला स्वप्नात देवीचा दृष्टांत झाला आणि त्यांनी या स्थानाला धक्का न लावता, त्याला केंद्रस्थानी ठेवूनच संपूर्ण बाजारपेठेची भव्य इमारत उभारली. गंज गोलाईपासून निघणारे १६ रस्ते हे लातूरच्या अर्थव्यवस्थेच्या धमन्या समजल्या जातात. सराफ लाईन, कापड लाईन,
लोखंड लाईन, भुसार लाईन अशा विविध व्यापारी केंद्रांचे जाळे शेवटी जगदंबा मातेच्या चरणी येऊन विसावते. येथील व्यापाऱ्यांची देवीवर असीम श्रद्धा आहे; त्यामुळेच नवीन व्यवहाराची सुरुवात आईच्या दर्शनानेच होते.
गंज गोलाईच्या मध्यभागी एक गोलाकार इमारत आहे. त्या इमारतीतून गोलाईच्या मध्यभागी असलेल्या मंदिराकडे येण्यासाठी चार मुख्य दरवाजे आहेत. या इमारतीभोवती असलेला गोल रस्ता आणि तिच्या आतल्या बाजूला असलेले मंदिर, अशा दोन्ही दिशांना या इमारतीत दुकाने आहेत. ही वास्तू दुमजली आहे आणि वरच्या मजल्यावरही दुकाने व कार्यालये आहेत. या इमारतीला चार दगडी प्रवेशद्वारे आहेत. त्यातील मुख्य प्रवेशद्वार अर्थातच पूर्वेला, म्हणजेच आतल्या मंदिर वास्तूच्या मुख्य दरवाजाच्या समोर आहे. या दरवाजातून आत प्रवेश केल्यानंतर शिखराकृती रचनेची मंदिराची तीनमजली मुख्य वास्तू दिसते. मंदिराभोवती असलेला प्रदक्षिणा मार्ग एका बाजूला लोखंडी ग्रील लावून बंदिस्त करण्यात आला आहे.
त्यातच असलेल्या लोखंडी दरवाजातून देवीच्या गर्भगृहासमोर प्रवेश होतो. या प्रदक्षिणा मार्गाच्या छतावर सुंदर सजावट आहे. चांदीच्या पत्र्याने मढविलेल्या गर्भगृहाच्या दरवाजाच्या ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे. या दरवाजाच्या वरही गणपतीची आणखी एक मोठी मूर्ती आहे. तिच्या दोन्ही बाजूला गजांत लक्ष्मीच्या बाजूला असतात तशा अभिवादन करणाऱ्या हत्तीच्या मूर्ती आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारातूनच समोर असलेली जगदंबा मातेची काळ्या पाषाणातील मूर्ती दिसते. मूर्तीभोवती चांदीची महिरप आहे. या महिरपीच्या बाहेर कोरीवकाम असलेला लाकडी मखर आहे. या देवीसमोर देवीचे वाहन असलेल्या सिंहाची काळ्या पाषाणात घडवलेली मूर्ती व तिच्या मागेच एक कासव मूर्तीही आहे. असे सांगितले जाते की पूर्वी या गर्भगृहात देवीची छोटी मूर्ती होती. त्या जागेवर ऑक्टोबर १९८९ मध्ये काळ्या पाषाणात घडवलेली ही देवीची आठ फूट उंचीची मूर्ती स्थापित करण्यात आली. प्रदक्षिणा मार्गावर अनेक लहान लहान देवकोष्टके आहेत. त्यात दत्तात्रेय, राधाकृष्ण, विठ्ठल-रखुमाई, रवी, चंद्र, शंकर, मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू, केतू, हनुमान, गणपती अशा देवता व ग्रहदेवतांच्या काळ्या पाषाणात घडवलेल्या सुंदर मूर्ती आहेत.
या देवीच्या मंदिरात साजरा केला जाणारा मुख्य उत्सव म्हणजे शारदीय नवरात्र. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून विजयादशमीपर्यंत चालणाऱ्या या सोहळ्यादरम्यान केल्या जाणाऱ्या सजावटीमुळे मंदिराचे रूपच पालटून जाते. संपूर्ण गंज गोलाई परिसर रोषणाईने सजतो. या नऊ दिवसांत देवीच्या मूर्तीची विविध स्वरूपात पूजा केली जाते. विविध अलंकारांनी देवी सजते. दररोज भजन-कीर्तन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. दसऱ्याला म्हणजेच विजयादशमीला येथे भक्तांची अफाट गर्दी उसळते. याशिवाय दिवाळीच्या दिवसांत मंदिराभोवती तसेच गंज गोलाई बाजारपेठेच्या परिसरात हजारो दिवे लावले जातात. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्रीही येथे विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. दर मंगळवारी आणि शुक्रवारी देवीचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी होते. सकाळी ६ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत भक्त देवीचे दर्शन घेऊ शकतात.