संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपुरच्या विठ्ठल मंदिरापासून जवळच ताकपिठे विठोबा मंदिर आहे. मंदिर साधे आणि छोटे असले तरी या मंदिरातील विठूरायाची मूर्ती आणि मुख्य मंदिरातील मूर्ती यात कमालीचे साम्य आहे. आषाढी एकादशीच्या यात्रेच्या वेळी मुख्य मंदिरात प्रचंड गर्दी असते. त्यामुळे तेथील विठोबाचे दर्शन घेणे सर्वांना शक्य होत नाही. तेव्हा अनेक भक्तगण ताकपिठे विठोबाचे दर्शन घेतात. विठूरायाला प्रेमाने ताकपीठ भरविणारी एक सामान्य महिला भक्त आणि तिच्या भक्तीवर प्रसन्न होऊन तिच्या घरापर्यंत येणारा विठोबा यांच्यामधील अनोख्या नात्याची कथा हे मंदिर सांगते.
मंदिराची अख्यायिका अशी की पैठण नगरीतील रमाबाई पंढरपूर निवासी असणाऱ्या महाजन कुटुंबात लग्न होऊन आली. विठ्ठलभक्तीची गोडी तिला आधीपासून होती. प्रत्यक्ष विठुरायाच्या नगरीत आल्यामुळे प्रतिदिनी तिला विठूरायाचे दर्शन घेता येत होते. दररोज ती विठूरायासाठी घरातील लोणी घेऊन जात असे. असे सांगितले जाते की तिने नेलेला लोणी विठूराया आपल्या हातांनी खात असे. (तेव्हापासून आजही दररोज सकाळी मूळ विठ्ठल मंदिरातील विठ्ठलाला लोण्याचा गोळा भरवण्याची म्हणजे तोंडाला लावण्याची पद्धत आहे.) रमाबाईं दररोज घरातील लोणी घेऊन बाहेर जाते हे पती नामदेव यांनी पाहिले व ते क्रोधीत होऊन थेट काशी येथे सन्यास घेण्यासाठी निघून गेले. पतीने जेवल्याशिवाय पत्नीने काही खायचे नाही, अशी त्यांच्या घरातील पद्धत होती. त्यामुळे रमाबाईला उपवास घडू लागले. अनेक दिवस तिने अन्नाचा कणही खाल्लेला नव्हता.
दिवसांमागून दिवस जात होते, तशी रमाबाईची प्रकृती खालावत चालली होती. रमाबाईची ती अवस्था पाहून विठूराया अस्वस्थ झाला व तो एका लहान बालकाचे रूप घेऊन रमाबाईच्या दारात गेला व म्हणाला ‘माई मला खूप भूक लागली आहे काहीतरी खायला दे’ त्यावेळी तिच्या घरात फक्त शिळे ताक व लाह्यांचे पीठ होते.
ते कालवून तिने दगडाच्या भांड्यात ठेवले व ते भांडे तिने त्या बालकासमोर धरले. परंतु तो बालक म्हणाला की तुझ्या हाताने मला हे पीठ भरवलेस तरच मी खाईन. बालहट्टापुढे रमाबाई झुकल्या व त्यांनी तो पिठाचा गोळा त्या बालकाच्या तोंडाजवळ नेला. त्याचवेळी तिला बालकामध्ये विठोबाचे दिव्य रूप दिसले. ज्यासाठी ती दररोज मंदिरात जात होती तो स्वतः विठोबा तिच्या दारात आला आहे, हे समजल्यावर तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. तिने आपल्या हाताने विठोबाला ताकपीठ भरवले व त्याच्या पायावर लोळण घेतली. विठोबाने तिला दरवाजाकडे पाहण्यास सांगितले. तिचे पती नामदेव दारात उभे होते. हा सर्व प्रकार पाहिल्यावर नामदेवांनी रमाबाईचे पाय धरले व माफी मागितली. त्यानंतर दोघांनीही विठोबाचे दर्शन घेतले व देवाने कायम येथे थांबून माझ्याकडील ताकपीठ खावे, अशी विनंती केली. त्यावर विठोबाने येथे अंशरूपाने राहण्याचे मान्य केले. तेव्हापासून हा विठोबा ताकपिठे विठोबा म्हणून प्रसिद्ध आहे.
पंढरपुरातील विठ्ठल मंदिराच्या पश्चिम दरवाजापासून जवळच ताकपिठे विठोबा मंदिर आहे. हे मंदिर जेथे आहे तो पूर्वी महाजन यांचा वाडा होता. त्याचे रुपांतर मंदिरात झाले आहे. या मंदिराचे प्रवेशद्वार जुन्या वाड्याप्रमाणे आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला दगडी चौथऱे व त्यावर द्वारपाल शिल्पे आहेत. द्वारचौकटीच्या खालच्या बाजूला किर्तीमुख व ललाटबिंबस्थानी गणपतीची मूर्ती आहे. दुमजली असलेल्या या मंदिराच्या प्रवेशद्वारावरील हस्तांवर नागप्रतिमा कोरलेल्या आहेत. सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. प्रवेशद्वारातून सभामंडपात प्रवेश केल्यावर समोर पाषाणी नंदी व शिवपिंडी आहे. सभामंडपात एका मोठ्या वज्रपिठावरील तीन देवळ्यांमध्ये मध्यभागी संत रमाबाई, उजवीकडे मारुती व डावीकडे विष्णूस्वरूप मूर्ती आहे. या तिन्ही मूर्ती काळ्या पाषाणातील आहेत. दगडी व लाकडी बांधणीच्या या वाड्यात ठिकठिकाणी देवकोष्टके आहेत. त्यात गणपती, संत ज्ञानेश्वर, नृसिंह, श्रीदत्त आदी देवतांच्या मूर्ती आहेत. सभामंडपात लाकडी स्तंभ व त्यावर सज्जा आहे.
अंतराळाच्या प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूला द्वारपालांची चित्रे आहेत. अंतराळातून गर्भगृहात प्रवेश होतो. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराला बाजूने स्तंभशाखा आहेत. या स्तंभशाखांचा खालील भाग सपाट व वरील भागात काहीशी कलाकुसर आहे. प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबस्थानी गणपतीची मूर्ती व त्यावरील उत्तरांगावर नक्षीदार तोरण शिल्प आहे. गर्भगृहात एका उंच वज्रपिठावरील मखरात काळ्या पाषाणातील विठोबाची मूर्ती व त्याशेजारी रुक्मिणीची मूर्ती आहे. या दोन्ही मूर्तींना मुकुट व अंगावर वस्त्रे आणि अलंकार आहेत. येथील विठोबाची मूर्ती ही पंढरपुरातील मुख्य मंदिरातील मूर्तीप्रमाणे भासते. या मंदिरात एक शिलालेख आहे. ‘श्रीविठ्ठलदेव रुक्मिणीवल्लभ शके १५४० काळयुक्त नाम संवत्सरे आस्वन सुध पाडिवा ओवरी संपूर्ण.’ त्यानुसार येथील श्रीविठ्ठलमूर्ती ही तळघरातील गर्भगृहात होती. शिलालेख लिहिलेल्या ओवरीचे काम शके १५४० म्हणजेच इ. स. १६१८ मध्ये पूर्ण झाले होते.
मुळ विठ्ठल मंदिराप्रमाणे या मंदिरातही नित्योपचार होतात. यामध्ये सकाळी पाच वाजता काकड आरती, सायंकाळी सात वाजता धुपारती व रात्री नऊ वाजता शेजारती होते. दर महिन्याच्या शुद्ध एकादशीला येथे किर्तनाचे तर चातुर्मासात सायंकाळी चार ते पाच या वेळेत भागवत कथेचे आयोजन केले जाते. भाद्रपद महिन्यातही भागवत सप्ताह होतो. अश्विन वद्य द्वितीयेपासून हरिभाऊ महाजन यांच्या स्मरणार्थ हरिनाम सप्ताहाचे आयोजन येथे होते. याशिवाय कृष्ण जन्माष्टमी, दत्त जयंती असे सणही येथे उत्साहाने साजरे केले जातात. दररोज सकाळी पाच ते दुपारी बारा व सायंकाळी चार ते रात्री १० पर्यंत या मंदिरात भाविकांना ताकपिठे विठोबाचे दर्शन घेता येते. आषाढी व कार्तिकी वारीच्या कालावधीत सकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत मंदिर भविकांसाठी खुले असते.