अलिबाग तालुक्यातील रेवदंडा शहरापासून जवळ असलेल्या कुंडलिका नदीच्या तिरावर, साळाव गावानजीक, निसर्गसमृद्ध परिसरात एक मध्यम आकाराची टेकडी आहे. या टेकडीवर स्थापत्यसौंदर्याने नटलेले ‘विक्रम विनायक’ मंदिर आहे. ‘बिर्ला मंदिर’ म्हणूनही याची ओळख आहे. बिर्ला उद्योग समूहातर्फे १९३९ पासून देशात ठिकठिकाणी २० सुंदर मंदिरे उभारण्यात आली आहेत. हे मंदिर त्यांपैकीच एक आहे. १९८५ मध्ये बिर्ला उद्योग समूहाने या परिसरात लोखंड शुद्धीकरण प्रकल्प आणल्यानंतर प्रकल्प व वसाहत यांच्या मध्यभागी असलेल्या टेकडीवर हे मंदिर बांधले.
अलिबागहून मुरूडकडे जाणाऱ्या मार्गावर रेवदंडा खाडीवरील पूल ओलांडल्यानंतर साधारणतः दोन किमी अंतरावर साळाव हे गाव आहे. याच ठिकाणी कुंडलिका नदीचा समुद्राशी संगम होतो. या खाडीवजा नदीवर हा पूल आहे. येथूनच मंदिराचे उंच सुळक्याप्रमाणे असणारे शुभ्र संगमरवरी शिखर व त्यावरील कळस लक्ष वेधून घेतात. भोवताली असलेला आल्हाददायक निसर्ग, शांत वातावरण, वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यरचना, स्वच्छता आणि परिसरात असलेल्या प्रशस्त उद्यानामुळे विक्रम विनायक मंदिर हे अल्पावधीतच हजारो भाविक व पर्यटकांचे श्रद्धास्थान बनले आहे. दिल्ली आणि हैद्राबाद येथे असलेल्या प्रसिद्ध बिर्ला मंदिराच्या धर्तीवर हे मंदिर उभारण्यात आलेले आहे. त्यासाठी लागणारे संगमरवर हे राजस्थान आणि गुजरातमधून आणण्यात आले होते. या मंदिराच्या बांधणीत संगमरवरासोबतच वालुकाश्माचा वापर करण्यात आलेला आहे.
टेकडीच्या पायथ्याशी अनेक पूजासाहित्य विक्रीची दुकाने आहेत. मंदिराच्या आवारभिंतीच्या प्रवेशद्वाराजवळ दोन सिंहांची शिल्पे आहेत. मध्यम आकाराच्या टेकडीवर स्थित असलेल्या या मंदिरापर्यंत जाण्यासाठी येथून पायरी मार्ग आहे. याच प्रवेशद्वारापासून मंदिरापर्यंत जाणारा एक नागमोडी गाडीरस्ताही आहे; परंतु त्या रस्त्यावरून वाहने नेण्यास भाविकांना बंदी आहे. मंदिर परिसरात छायाचित्रणास बंदी असल्याने मोबाईल अथवा कॅमेरा या प्रवेशद्वारापासून पुढे नेता येत नाहीत. प्रशस्त उद्यानातून पायरी मार्गाने मंदिराकडे जाताना गवताची हिरवी शाल पांघरली असावी, असे भासते. या उद्यानात शेकडो शोभेची व फुलझाडे आहेत. याशिवाय येथे रंगीत कारंजी पाहायला मिळतात. पायऱ्या चढत असतानाच पांढऱ्या शुभ्र संगमरवरात बांधलेल्या मंदिराची भव्यता नजरेत येते.
बिर्ला उद्योग समूहाचे तत्कालीन प्रमुख आदित्य विक्रम बिर्ला यांच्या नावावरून हे मंदिर विक्रम विनायक मंदिर म्हणून ओळखले जाते. १ ऑक्टोबर १९९५ रोजी वयाच्या ५१ व्या वर्षी आदित्य विक्रम बिर्ला यांचे निधन झाले. त्यानंतर येथील मुख्य मंदिरासमोरील उद्यानात त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला. येथून काही पावलांवर मुख्य मंदिर आहे. जमिनीपासून आठ पायऱ्या चढल्यावर या मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो. येथील सभामंडप हा खुल्या प्रकारचा आहे, शिवाय याचे छत हे अर्धपारदर्शक अशा पॉलिकॉप शिटचे असल्यामुळे सभामंडपात मोकळ्या हवेचा संचार व भरपूर प्रकाश असतो. सभामंडपाच्या पुढील बाजूस असलेल्या मुख्य गर्भगृहात विनायकाची भव्य अशी संगमरवरी मूर्ती आहे. या मूर्तीच्या दोन्ही बाजूला रिद्धी व सिद्धी यांच्या मूर्ती आहेत. याशिवाय येथे असलेल्या लहान मंदिरांत शिव–पार्वती, दुर्गामाता, श्रीराम, कृष्ण व सूर्यदेव यांच्या मूर्ती आहेत. या सर्व मूर्ती जयपूर येथील कारागीरांनी घडविलेल्या आहेत. येथील सभामंडपावर दोन व गर्भगृहावर मुख्य असे तीन शिखर आहेत. गर्भगृहावर असलेले व आकाशाकडे झेपावणारे उंचच उंच शिखर हे शुभ्र संगमरवराचे आहे. त्यामुळे सुमारे चार ते पाच किलोमीटरच्या परिसरातून कोठूनही पाहिल्यावर हे शिखर दिसते.
मंदिर परिसरातून कुंडलिका नदी, त्यात विहार करणाऱ्या नौका, या नदीवर असलेला मोठा पूल, पुढे नारळी–पोफळीच्या बागांत घनगर्द झाडीत लपलेले चौल–रेवदंडा हे गाव, आग्राव बंदर, चौलचे दत्तमंदिर या मनोहारी दृश्यांचा एका नजरेत आनंद घेता येतो. विशेषतः रात्री हा परिसर आणखी खुलून दिसतो. सायंकाळी आकर्षक विद्युत रोषणाईने मंदिर सजवले जाते. त्यामुळे विविधरंगी कारंजी, समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यामुळे मंजुळ आवाजात खणखणणाऱ्या मंदिरातील छोट्या छोट्या घंटा, पांढऱ्या शुभ्र शिखरावर सोडलेला विद्युत प्रकाशझोत या सर्वांचा आनंद घेण्यासाठी भाविक व पर्यटक सायंकाळी येथे गर्दी करतात.
येथे वर्षभर भाविकांची आणि पर्यटकांची ये–जा असते. सकाळी ९ आणि सायंकाळी ७.१५ वाजता मंदिरात आरती व पूजा होते. दररोज सकाळी ६ ते ११.३० आणि सायंकाळी ४.३० ते ९ वाजेपर्यंत मंदिरात भाविकांना विनायकाचे दर्शन घेता येते. दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. याशिवाय अंगारकी, संकष्टी चतुर्थी, गणेश जयंती व रविवारसह इतर सुट्यांच्या दिवशी येथे भाविक व पर्यटकांची मोठी गर्दी असते.