बारावे शतक हे हिंदू धर्मात जागृतीचे शतक म्हणून ओळखले जाते. या काळात वर्णभेद, जातीभेद व लिंगभेदाविरोधात प्रथम संत ज्ञानेश्वरांनी महाराष्ट्रात क्रांती सुरू केली. तत्पूर्वी दक्षिणेकडे महात्मा बसवेश्वरांनी भेदाभेद, वेद आणि कर्मकांड नाकारले. त्यांनी शिक्षणाचा, मानवतेचा व समानतेचा प्रचार केला. या कार्यासाठी आवश्यक असलेले धन अनेक दानशूरांनी दिले. यात दानम्मा देवीचा महत्त्वाचा वाटा होता. अन्नदान, द्रव्यदान व ज्ञानदान अशा अनेक प्रकारच्या दानाचे कार्य दानम्माने केले. उमराणी या दानम्मा देवीच्या जन्मगावी देवीचे असलेले प्राचीन मंदिर प्रसिद्ध आहे.
दानम्मा देवी ही लिंगायत धर्मात ‘महान शरणी’ म्हणून ओळखली जाते. तिची कथा अशी की उमराणी गावात अनंतराय आणि शिरसम्मा या दाम्पत्याच्या पोटी तिचा जन्म झाला. तिचे जन्मनाम लिंगम्मा असे होते. शुंग गावातील संगमनाथ नामक शूर व शिवभक्त सरदाराशी तिचा विवाह झाला होता. त्या दोघांनीही गुड्डापूर ही आपली कर्मभूमी म्हणून निश्चित केली. सोलापूरचे सिद्धयोगी सिद्धरामेश्वर यांच्याकडून दानम्माने शिवदीक्षा घेतली होती. पुढे बसवेश्वरांच्या ‘अनुभवमंटपा’त सहभागी होऊन तिने नित्य इष्टलिंग साधना केली. कल्याण प्रतिक्रांती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रकरणात दानम्माचे शौर्य प्रकट झाले. तिने सम्राटाच्या सेनेविरोधात आपल्या पतीसमवेत निकराची झुंज दिली व शरणीसेनेचे नेतृत्त्व केले. यानंतरतिने पतीसह भारतभर संचार करून बसवतत्त्वांचा प्रसार केला. साधनेमुळे दानम्मा देवीभोवती चमत्कारकथांचे वलय निर्माण झाले.
गुड्डुपूर येथे दानम्मा देवीचे ‘लिंगैक्य’ (निर्वाण) झाल्यानंतर बाराव्या शतकात तेथे तिचे मोठे मंदिर उभारण्यात आले. यानंतर काही वर्षांनी तिच्या या जन्मभूमीत म्हणजेच उमराणीत तिचे मंदिर बांधण्यात आले, असे सांगण्यात येते. अलीकडील काळात या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे. उमराणी गावाच्या मधोमध हे मंदिर आहे. सुमारे तीस फूट उंच प्रवेशद्वारात दोनही बाजूच्या विशाल स्तंभांवर द्वारपाल आसने व त्यावर चतुर्भुज द्वारपालांची शिल्पे आहेत. द्वारपालांच्या तीन हातात शंख, चक्र व दंड आहे आणि चौथा हात आशीर्वाद मुद्रेत आहे. दोन्ही स्तंभ अर्धचंद्राकार कमानीने जोडलेले आहेत व त्यावर सज्जा आहे. सज्जावरील कठड्यावर असलेल्या देवकोष्टकात शिवपिंडी आहे. कठडा दोन्ही बाजूने चढत्या पायऱ्यांचा आहे. त्यावर मध्यभागी वज्रपीठावर शिवपार्वती व दोन्ही बाजूला नंदीशिल्पे आहेत.
मंदिराच्या प्रांगणाला पेव्हर ब्लॉकची फरसबंदी आहे. प्रांगणात डाव्या बाजूला दानम्मा देवीचे मंदिर आहे. सभामंडप अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. प्रांगणापेक्षा उंचावर असल्यामुळे सभामंडपाच्या प्रवेशद्वारासमोर सात पायऱ्या आहेत. पायऱ्यांच्या उजव्या बाजूला ध्वजस्तंभ आहे. सभामंडपास उजव्या व डाव्या बाजूला आणखी दोन प्रवेशद्वारे आहेत. येथील सभामंडप बंदिस्त स्वरूपाचा आहे व त्यात हवा व उजेड येण्यासाठी खिडक्या आहेत. सभामंडपात बाह्यबाजूस भिंतीत १४ गोलाकार स्तंभ आहेत व दोन स्तंभ गर्भगृहाच्या डाव्या बाजूला मधोमध आहेत. स्तंभांवर तुळई व त्यावर छत आहे. वितानावर चक्राकार नक्षी आहे. छताला पितळी घंटा व नवसाचे पाळणे टांगलेले आहेत. सभामंडपात डाव्या बाजूला अंतराळ आहे. अंतराळाच्या प्रवेशद्वारावरील द्वारशाखांवर उभ्या धारेची नक्षी आहे. अंतराळात मध्यभागी एका चौथऱ्यावर नंदीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे.
पुढे गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारासमोर मेजावर देवीच्या पितळी पादुका आहेत. प्रवेशद्वाराच्या लाकडी द्वारशाखांवर पानाफुलांची नक्षी आहे. गर्भगृहात वज्रपिठावर दानम्मा देवीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. या मूर्तीचे डोळे चांदीचे आहेत. मूर्तीस उंची वस्त्रे व अलंकार परिधान केले जातात. मूर्तीस रोज सकाळी, दुपारी व संध्याकाळी अनुक्रमे कन्या, तरुणी व वृद्ध रूपातील शृंगार केला जातो. अंतराळातून बाहेर पडण्यासाठी उजव्या बाजूला दुसरे द्वार आहे. या बाजूला सभामंडपातील कक्षात वज्रपिठावर आक्कामहादेवी यांची काळ्या पाषाणातील नंदीच्या पाठीला टेकलेली मूर्ती आहे.
मंदिराच्या छतावर चहुबाजूने सुरक्षा कठडा व गर्भगृहाच्या छतावर नक्षीदार शिखर आहे. शिखरात शीर्षभागी आमलक, त्यावर कळस व ध्वजपताका आहे. मंदिराच्या प्रांगणात असलेल्या अनेक इमारतींचा वापर भक्तनिवास, धर्मशाळा, अन्नछत्र व इतर कार्यांसाठी केला जातो. महाशिवरात्र, श्रावणी सोमवार, श्रावण अमावस्या व कार्तिक अमावास्या हे देवीच्या उत्सवाचे मुख्य दिवस आहेत. यावेळी मंदिरात भजन, कीर्तन, संगीत, महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. देवीची पालखी मिरवणूक काढली जाते. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी राज्यांतून हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. गुरूवारी व रविवारी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची येथे जास्त गर्दी असते.
कलचुरी राजा बिज्जल याच्या फौजेशी निकराने झुंज देणाऱ्या दानम्मा देवीच्या मंदिरापासून जवळच आणखी एका शूर योद्ध्याचे स्मारक आहे. ते योद्धे म्हणजे स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकापूर्वी १६७३ साली आदिलशाही सरदार अब्दुल करीम बहलोलखान हा स्वराज्यावर चाल करून आला होता. तेव्हा सरसेनापती प्रतापराव गुजर व बहलोलखान याची उमराणी येथे लढाई झाली. त्या लढाईत प्रतापरावांनी पराक्रम गाजवून बहलोलखानाचा पाडाव केला. परंतु तो शरण आल्याने त्यांनी त्याला सोडून दिले. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांची निर्भत्सना केली. त्यामुळे दुखावलेल्या प्रतापरावांनी मोजक्या सैन्यानिशी पुन्हा बहलोलखानावर हल्ला चढवला. नेसरीच्या खिंडीत झालेल्या त्या लढाईत प्रतापरावांना हौतात्म्य प्राप्त झाले. याच घटनेवर कविवर्य कुसुमाग्रजांनी ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ हे काव्य रचले आहे.