करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिराच्या परिसरात कोल्हापूरचे ग्रामदैवत कपिलेश्वर, त्याच प्रमाणे काशी विश्वेश्वर, जोतिबा, देवी भवानी, रंकभैरव आदी देवतांची मंदिरे आहेत. यातीलच धार्मिक व सांस्कृतिकदृष्ट्या एक महत्त्वाचे मंदिर म्हणून बिनखांबी गणेश मंदिर ओळखले जाते. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात उभारण्यात आलेले हे मंदिर विशिष्ट स्थापत्यशैलीत बांधलेले आहे. या मंदिराच्या सभामंडप वा गर्भगृहात एकही खांब नाही. यामुळेच या मंदिरास बिनखांबी या विशेषणाने ओळखले जाते. मूर्तीशास्त्र अभ्यासकांच्या मते येथील गणेशाची मूर्ती बाराव्या शतकातील असावी.
बिनखांबी गणेश मंदिर म्हणून ख्यातकीर्त असलेले हे मंदिर जोशीराव गणपती या नावानेही ओळखले जाते. त्याचा इतिहास असा सांगितला जातो की दाजीबा जोशी हे कोल्हापूर संस्थानचे शहाजी महाराज ऊर्फ बुवासाहेब महाराज यांच्या काळात, म्हणजे इ.स. १८२१ ते १८३७ या कालावधीत राजदरबारचे ज्योतिषी होते. ते कवीही होते व त्यांनी याच काळात ‘करवीर माहात्म्य’ या ग्रंथाची रचना केली. गणपती हे त्यांचे आराध्यदैवत होते. अंबाबाई मंदिराच्या महाद्वारातून आत गेल्यानंतर डाव्या हातास असलेले सिद्धिविनायकाचे मंदिर, तसेच जयंती नाल्याच्या काठावर असलेले ओढ्यावरचा गणपती म्हणून परिचित असलेले मंदिर त्यांच्याच मालकीचे होते. त्यांनीच या बिनखांबी मंदिराची स्थापना केली.
याबाबत अशी कथा सांगितली जाते की सध्या बिनखांबी गणेश मंदिर आहे त्याच्या नजीकच जोशीराव यांचा वाडा होता. एकदा या वाड्यातील विहिरीतील गाळ काढत असताना त्यांना त्यात एक गणेशमूर्ती सापडली. ही प्राचीन गणेशमूर्ती त्यांनी विहिरीच्या काठावरच प्रतिष्ठापित केली. त्यावेळी कोल्हापूरच्या राजगादीवर राजाराम महाराज (दुसरे) हे होते. त्यांच्या सूचनेनुसार जोशीरावांनी येथे मंदिर बांधून, सन १८७० मध्ये मंदिरात या गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली.
दगडी चिऱ्यांचा वापर करून बांधलेल्या या २० फूट लांब आणि २० फूट रुंद अशा मंदिराची संरचना सभामंडप आणि गर्भगृह अशी आहे. गर्भगृहावर असलेले उंच शिखर अंबाबाई मंदिराच्या शिखराशी साम्य सांगणारे आहे. या शिखरावर चारही बाजूंनी चार छोटे आमलक, त्याच्या मध्यभागी कमळपाकळ्यांत स्थित मोठा आमलक व त्यावर शिखर आहे. मंदिराच्या सभामंडपावर समतल छत आहे. येथील छताची रचना स्थापत्यशास्त्रातील ‘की–स्टोन’ प्रकाराची आहे. त्यात छताचे दगड एकात एक अडकवण्यात आले आहेत. त्यामुळे मंदिरास आधारासाठी खांबाची आवश्यकता भासली नाही. सभामंडपाच्या प्रवेशद्वाराची चौकट दगडी आहे व तिच्या दोन्ही बाजूंना कोरीव द्वारस्तंभ आहेत. चौकटीच्या ललाटबिंबस्थानी गणेशाची मूर्ती विराजमान आहे. आत मध्यभागी एका चौथऱ्यावर मूषकाची संगमरवरी मूर्ती आहे.
गर्भगृहास कोरीवकाम असलेला महिरपी लाकडी दरवाजा आहे. आत संगमरवरी अधिष्ठानावर, चांदीच्या मखरामध्ये गणेशाची काळ्या पाषाणातील चार फूट उंचीची मूर्ती विराजमान आहे. ही मूर्ती ललितासनात आहे. मूर्तीच्या हातात दंत, परशु, पाश इत्यादी गोष्टी आहेत. ऑगस्ट २०२२ मध्ये या मूर्तीवर वर्षानुवर्षे साठलेला सुमारे ५० किलो शेंदूर खरवडून काढण्यात आला. त्यामुळे या मूळ मूर्तीचे सौंदर्य समोर आले. कोल्हापूरमधील शिरोळ तालुक्यातील खिद्रापूरच्या जगप्रसिद्ध कोपेश्वर मंदिरात असणाऱ्या गणेशमूर्तीसारखीच ही मूर्ती असल्याचे अभ्यासकांचे मत आहे.
या मंदिराचे व्यवस्थापन सध्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडे आहे. मंदिरात वर्षभरात गणेश जयंती, गणेश चतुर्थी, संकष्ट चतुर्थी आदी सण व उत्सव भक्तिभावाने साजरे केले जातात. दर मंगळवारीही येथे भाविकांची मोठी गर्दी असते.
चांदीचा गणपती
कोल्हापूर शहरातील गणपतीचे दुसरे प्रसिद्ध स्थान म्हणजे कोल्हापूरच्या मध्यवस्तीत गुजरी चौकाजवळ, प्रतिभा नगरात असलेले चांदीचा गणपती मंदिर. सिद्धिविनायक महागणपती मंदिर तसेच गुजरीचा गणपती म्हणूनही हे मंदिर ओळखले जाते. या मंदिरात संपूर्ण चांदीतून बनवलेल्या गणपती विराजमान आहे. मुख्य रस्त्यालगतच असलेले हे मंदिर आधुनिक बांधणीचे व दुमजली आहे. वरच्या मजल्यावर सभामंडप आणि गर्भगृह अशी त्याची संरचना आहे. तळमजल्यावर मोठे सभागृह आहे. मंदिराचे शिखर हे बहुस्तरीय गोलाकाराने बनवलेले आहे. मंदिरास चारही बाजूंनी आवारभिंत आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर कोरीव काम व पारंपरिक नक्षीकाम आहे. या सभामंडपातच गर्भगृह व त्याभोवती प्रदक्षिणा मार्ग आहे. गर्भगृहात गणपतीची पाषाणात घडवलेली सुबक मूर्ती व त्यामागे चांदीचा गणपती विराजमान आहे. पूर्वाभिमुख असलेली ही मूर्ती चतुर्भुज आहे. तिच्या हातांत परशू, अंकुश, मोदक आणि कमळाचे फूल आहे.
गणेश चतुर्थीच्या काळात या मंदिरास आकर्षक सजावट करण्यात येत. या काळात मूर्तीही विशेष अलंकारांनी आणि फुलांच्या सजावटीने साजरी दिसते. तिच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी येथे होते. संकष्ट चतुर्थी आणि दर मंगळवारीही भाविकांची येथे गर्दी असते. बिनखांबी गणेश आणि चांदीचा गणपती ही दोन्ही मंदिरे कोल्हापूरच्या सांस्कृतिक इतिहासात महत्वाची मानली गेली आहेत. अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेले भाविक त्यांचे आवर्जून दर्शन घेतात.
उपयुक्त माहिती