सराला बेट हे योगीराज सद्गुरू ब्रह्मलीन गंगागिरी महाराज यांच्या वास्तव्याने व कार्यकर्तृत्वाने पुनीत झालेले पवित्र क्षेत्र आहे. ‘दक्षिण गंगा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीच्या प्रवाहाचे विभाजन होऊन हे बेट तयार झाले आहे. या बेटाचा विस्तार तब्बल ६५ एकर एवढा आहे. नदीच्या पाण्याने वेढलेल्या या बेटावर येण्यासाठी एक पूल बांधण्यात आलेला आहे. छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर व नाशिक या जिल्ह्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सराला बेटाची निसर्गरम्य पर्यटनस्थळ म्हणूनही ओळख आहे.
गंगागिरी महाराजांचा जन्म इ.स. १८१४ मध्ये एका गोसावी कुटुंबात झाला. पुणतांब्यापासून २५ किमी अंतरावर गोदातिरी असलेले कापूस वडगाव हे त्यांचे जन्मस्थान. येथे त्यांचे वडील देवगिरी हे गावात धर्मकार्ये व पोथीवाचन करीत असत. त्यामुळे गंगागिरी महाराजांवर लहानपणापासूनच धार्मिक संस्कार झाले. वयाच्या बाराव्या वर्षापासून ते गावात पोथीवाचन करू लागले. कुस्ती हा त्यांचा आवडता खेळ होता. ते नामांकित पहेलवान होते. वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी नाथबाबा या सत्पुरुषाचे शिष्यत्व स्वीकारले. आदिनाथ भगवान शिव, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, निवृत्तीनाथ व संत ज्ञानेश्वर अशी नाथबाबांची गुरुपरंपरा सांगितली जाते. गुरुआज्ञेनुसार गंगागिरी महाराजांनी सराला बेटात कठोर साधना केली. त्या साधनेमुळे ते योगीराज म्हणून संबोधले जाऊ लागले. ब्रिटिश आणि निजामसत्तेच्या काळात त्यांनी या प्रदेशात लोकांमध्ये आध्यात्मिक व सांस्कृतिक जागृती करण्याचे काम केले.
‘लेने को हरिनाम, देने को अन्नदान। तरने को लीनता, डुबने को अभिमान।।’ हे महाराजांचे ब्रीदवाक्य होते. ते स्वतः बोले तैसा चाले या पद्धतीचे सत्पुरुष होते. हरिनाम सप्ताहानिमित्ताने ते भव्य अन्नदानाचा उपक्रम राबवित असत. एकोणिसाव्या शतकाच्या त्या काळात समाजातील भेदाभेद नष्ट करण्यासाठी चारही वर्णाच्या लोकांना एका पंगतीत बसवून ते भोजन करायला लावले होते. अनेकांनी त्यांचे शिष्यत्व स्वीकारले होते.
गंगागिरी महाराजांनी आजन्म ब्रह्मचारी राहून संन्यासधर्माचे पालन केले. आयुष्याच्या ८८व्या वर्षी इ.स. १९०२ मध्ये त्यांनी सराला बेट येथे समाधी घेतली. त्यांच्यानंतर त्यांचे शिष्य सद्गुरू श्रीदत्तगिरी महाराज, नंतर सद्गुरू श्रीनाथगिरी महाराज, श्रीसोमेश्वरगिरी महाराज, श्रीनारायणगिरी महाराज या सत्पुरुषांनी गंगागिरी महाराजांची परंपरा निस्पृह भावनेने पुढे चालवली. १९ मार्च २००९ रोजी महंत नारायणगिरी महाराज यांचे महानिर्वाण झाल्यानंतर त्यांचे शिष्योत्तम व बाजाठाण आश्रमाचे महंत रामगिरी महाराज हे सराला बेटाची गादी सांभाळत आहेत. इ.स. २०२२ मध्ये त्यांनी सराला बेटाचे नामकरण ‘श्री सद्गुरू गंगागिरी महाराज गोदाधाम’ असे केले.
या बेटावर सद्गुरू गंगागिरी महाराजांचे भव्य समाधी मंदिर आहे. प्राचीन रजपूत वास्तुरचना शैलीशी साम्य साधणारी ही एखाद्या प्राचीन राजवाड्यासारखी, सुमारे १९ एकरावर पसरलेली भव्य दगडी वास्तू आहे. या सर्व परिसरास उंच दगडी; परंतु अत्यंत आकर्षक अशी तटबंदी आहे. जमिनीपासून काही उंचावर बांधलेल्या या वास्तूस भव्य प्रांगण आहे. त्यानंतर चार उंच टप्प्यांवर काही अंतर सोडून बांधलेल्या एकूण २० ते २५ दगडी पायऱ्या आहेत. या फरसबंदीवरून आल्यावर समोरच मुख्य प्रवेशद्वार असलेले दुमजली दर्शनमंडप आहे. नक्षीदार दगडी कमानदार खांब, जाळीदार गवाक्षांनी सजलेल्या भिंती, दरवाजाच्या दोन्ही अंगांस चौथऱ्यावर हत्तीच्या जिवंत भासणाऱ्या प्रतिमा अशा या वैशिष्ट्यपूर्ण दर्शनमंडपाच्या प्रवेशद्वारास कोरीवकाम केलेले मोठे लाकडी दरवाजे आहेत.
येथून प्रशस्त सभामंडपात प्रवेश होतो. त्यातील एका संगमरवरी छत्रीमध्ये असलेल्या नारायणगिरी महाराजांच्या समाधीस्थानावरील पादुकांचे दर्शन घेतल्यावर मुख्य मंदिरात प्रवेश होतो. येथे योगीराज गंगागिरी महाराजांची समाधी व त्यामागे विठ्ठल–रुक्मिणीच्या दगडी मूर्ती आहेत. मंदिराच्या गाभाऱ्यास आतून घुमटार कोरीव नक्षीकाम केलेले आहे. मंदिरास एक उंच आणि दोन लहान अशी तीन शिखरे आहेत. मंदिर परिसरात सर्वत्र दगडी बांधकाम तसेच दगडी फरसबंदी आहे. यामुळे या वास्तूच्या भव्यतेत अधिक भर पडली आहे. या परिसरामध्ये दत्त मंदिर, हनुमान मंदिर, शिर्डी येथे साईबाबा व गंगागिरी महाराजांची भेट झाली होती ते दर्शविणारी शिल्पे व गुरुकुलाची दुमजली इमारत आहे.
सन २०१४ मध्ये श्रीक्षेत्र सराला बेट येथील मंदिराचा जीर्णोद्धार करून सध्याची ही प्रशस्त वास्तू उभारण्यात आली आहे. त्यावेळी तेथे विविध देवतांच्या मूर्तींचा प्राणप्रतिष्ठा सोहळा तसेच श्री हरिहर महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. योगीराज गंगागिरी महाराजांवर श्रद्धा असलेले, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर तसेच नाशिक जिल्ह्यातील असंख्य भाविक या सोहळ्यात सहभागी झाले होते.
येथे मार्गशीर्ष वद्य अष्टमी ते अमावस्या या काळात ब्रह्मलीन गंगागिरी महाराज यांचा पुण्यतिथी सप्ताह, फाल्गुन वद्य अष्टमीला महंत नारायणगिरी महाराज यांची पुण्यतिथी, आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा उत्सव, श्रावण शुद्ध पंचमी ते द्वादशी या काळात श्रावण सप्ताह, नवरात्रीत दुर्गाष्टमी होमयज्ञ असे धार्मिक सोहळे साजरे केले जातात. याशिवाय या धार्मिक स्थळी दर्शनाकरीता सतत भाविक येत असतात. महाशिवरात्रीच्या पर्वकाळात येथे गोदास्नान करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर श्रद्धाळू येतात. महाशिवरात्रीला या परिसरात यात्राही भरते. बेटात गुरुकुल पद्धतीने ज्ञानदानाचे कार्य चालते. तसेच तेथे गोसेवेकरीता भव्य गोशाळाही उभारण्यात आली आहे. गंगागिरी महाराजांच्या शिकवणीस अनुसरून बेटावर संस्थानामार्फत अन्नदान केले जाते. त्यामध्ये सकाळी ७ ते ७.३० पर्यंत चहा, सकाळी ८.३० ते ९.३० या वेळेत नाष्टा, दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत भोजन, सायंकाळी ४ ते ४.३० पर्यंत चहा आणि रात्री ८ ते ९ वाजेपर्यंत भोजनाची सुविधा आहे. या बेटावर भाविकांसाठी निवास व्यवस्थाही आहे.