पारनेर तालुक्यातील कान्हूर पठाराजवळील वडगाव दर्या हे ठिकाण दर्याबाई व वेल्हाबाई देवी या दोन मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे. १००० वर्षांपूर्वीची ही मंदिरे शेजारी–शेजारी असून या स्थानाचे वैशिष्ट्य असे की येथे असलेले वानर देवीचे सैन्य मानले जातात. गावातील कोणत्याही लग्नसमारंभात या वानरसेनेच्या प्रमुखाला फेटा व मुंडासे बांधण्याची प्रथा आहे. याशिवाय गावातील धार्मिक विधी व लग्नातील जेवणाच्या पंगतीत माणसांसोबत वानरही बसतात. मागील कित्येक वर्षांपासून गावात ही प्रथा आहे.
दर्याबाई व वेल्हाबाई या बहिणी असून दर्याबाई ही वणीच्या सप्तशृंगीगडावरील अर्धेपीठ व वेल्हाबाई माहूरगडावरील रेणुका देवीचे पूर्णपीठ असल्याची मान्यता आहे. या स्थानाबाबतची आख्यायिका अशी की पारनेर तालुक्यातील पाडली दर्या या ठिकाणाहून या दोन्ही देवी वडगाव दर्या येथे आल्या व त्यांनी येथील निसर्गसमृद्ध परिसरात डोंगराच्या कपारीत वास्तव्य केले. या देवींनी त्यानंतर येथे महादेव व भैरवनाथ या देवांनाही सोबत आणले. मंदिर परिसरात दोन दीपमाळा व एक पाण्याचा कुंड आहे. हे कुंड शक्तितीर्थ नावाने प्रसिद्ध आहे. असे सांगितले जाते की दर्याबाई देवीने येथे आल्यावर गंगेला प्रसन्न करून येथे अवतीर्ण होण्यास सांगितले. तेव्हापासून हे कुंड वर्षाचे बाराही महिने भरून वाहत असते. या कुंडात अनेक भाविक आवर्जून स्नान करतात. यामुळे त्वचारोग नाहीसे होतात आणि पुण्य लाभते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
वडगाव दर्या हे गाव वृक्षवल्लीने वेढलेल्या दरीत वसले आहे. मंदिर परिसरात सीताफळ, चिंच, जांभूळ, आंबा, बाभूळ, वड व पिंपळ असे मोठमोठे वृक्ष नजरेस पडतात. कमानीतून आत प्रवेश केल्यावर मंदिरांकडे जाण्यासाठी पायरी मार्ग आहे. तेथून १२५ पायऱ्या खाली उतरल्यावर मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. या पायरी मार्गाशेजारी धबधबा आहे आणि त्याच्या बाजूला एक भुयार आहे. त्याची लांबी सुमारे १ किलोमीटर असल्याचे सांगितले जाते. मागील अनेक वर्षांपासून दगड–मातीने ते बुजले गेले असले तरी अजूनही १२५ ते १५० फूट आतपर्यंत त्यात जाता येते.
संपूर्ण मंदिर परिसराला फरसबंदी असून हा परिसर स्वच्छ आणि शांत भासतो. येथील डोंगराच्या कपारीत दर्याबाई व वेल्हाबाई देवींची मंदिरे आहेत. दर्याबाई मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर तेथे देवीची तांदळा स्वरूपातील स्वयंभू मूर्ती आहे. या मूर्तीच्या बाजूला शिवपिंडी आहे. येथून वेल्हाबाई मंदिरात जाण्यासाठी लहानसा दरवाजा आहे. या दोन्ही देवी बहिणी असून मोठ्या बहिणीने दर्याबाईकडे जाण्यासाठी आपल्या कोपराने तो दरवाजा निर्माण केला, अशी आख्यायिका आहे. वेल्हाबाई मंदिरातही देवीचा स्वयंभू तांदळा असून तेथे गणपतीची मूर्ती आहे. मंदिराच्या अशा रचनेमुळे दर्याबाई मंदिरातून प्रवेश करून भाविक आतून वेल्हाबाई मंदिरात जातात व तेथून बाहेर पडतात.
मंदिरापासून काही अंतरावर देवस्थानाची जमीन आहे. तेथे सामूहिक पद्धतीने ग्रामस्थ शेती करतात. त्यापासून आलेले उत्पन्न देवीचे सण–उत्सव आणि इतर धार्मिक कार्याबरोबरच येथील वानरांच्या अन्नासाठीही वापरले जाते. या कामात कोणी कुचराई केल्यास ही वानरसेना त्या व्यक्तीच्या जमिनीत जाऊन तेथील पिकांची नासाडी करते, असे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. येथील सर्व ग्रामस्थ ही वानरसेना म्हणजे देवीची लेकरे तसेच सैन्य आहेत, असे मानतात. ही सर्व वानरे माणसाळलेली असून कोणत्याही लग्न व धार्मिक कार्यात आवर्जून सहभागी होतात. त्यावेळी ग्रामस्थांकडून या वानरांना मानपान दिला जातो. टोळीतील प्रमुख वानराला फेटा बांधला जातो आणि विशेष म्हणजे हा वानर काहीही हालचाल न करता तो फेटा आपल्या डोक्यावर बांधून घेतो. कार्य समाप्तीनंतर सर्व वानर या फेट्याचे अनेक तुकडे करतात व आपापसात एक–एक तुकडा वाटून घेतात. याशिवाय यातील अनेक वानर हे कोणत्याही कार्याच्या वेळी जेवणाच्या पंगतीत ग्रामस्थांसोबत जेवायला बसतात.
चैत्र शुद्ध अष्टमीला देवींना हळद लावण्याची प्रथा आहे. त्या दिवशी संध्याकाळी परंपरेनुसार देवीची पालखी (छबिना) व मानाच्या काठीची मिरवणूक काढली जाते. पारंपरिक वाद्यांच्या गजरात गावातून मंदिरापर्यंत ही मिरवणूक जाते. नवरात्रोत्सवात येथे १० दिवसांचा उत्सव असतो. माघ शुद्ध पौर्णिमेस येथे मोठी यात्रा भरते. हे स्थान जागृत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे.