अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत शहराचे ग्रामदैवत असलेले गोदड महाराज संजीवन समाधी मंदिर हे हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. कामिका एकादशीला (आषाढ कृष्ण एकादशी) येथे होणारा रथोत्सव प्रसिद्ध आहे. या दिवशी प्रत्यक्ष पांडुरंग पंढरपूरहून येथे वास्तव्याला येतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. महाराष्ट्र राज्य पोलिस दलाकडून या दिवशी पोलिसांचा मानाचा ध्वज मिरवणुकीने या मंदिरात आणला जातो व त्याची पूजा केली जाते. ‘धाकटी पंढरी’ म्हणूनही हे स्थान जिल्ह्यात प्रख्यात आहे.
ग्रंथांमधील वर्णनानुसार, राजस्थानातील उदयपूर संस्थानातील भिकाजी व कर्जत येथील तोरडमल कुटुंबातील चंद्रभागा यांना अमरसिंह नावाचा पुत्र होता. अमरसिंह ६ ते ७ वर्षांचे असतानाच त्यांच्या मनात वैराग्याची भावना निर्माण झाली व तेव्हापासून ते विठ्ठल भक्तीत रममाण होऊ लागले. दगडाचे टाळ करून ते अभंग म्हणू लागले. एकदा संत एकनाथ महाराज यांचे शिष्य नारायणनाथ यांच्याशी त्यांची भेट झाली. त्यांनी आनंद संप्रदायाची दीक्षा देऊन आपल्याकडील गोधडी अमरसिंहांच्या अंगावर टाकली. यापुढे तुला गोदडनाथ (गोदड महाराज) म्हणून सर्वजण ओळखतील, असे सांगितले. सातपुडा पर्वतावर जाऊन तपश्चर्या करावी, तेथेच तुला विठ्ठलाचे दर्शन होईल, असा आशीर्वादही दिला. त्यानुसार महाराजांनी सातपुडा पर्वतावर १७ वर्षे खडतर तपश्चर्या केली. त्यांच्या तपश्चर्येचे फळ म्हणून विठ्ठल–रुक्मिणीने त्यांना दर्शन दिले.
अनेक ठिकाणी भ्रमंती केल्यानंतर गोदड महाराज पंढरपूर येथे गेले. तेव्हा एका स्त्रीने त्यांचा अपमान केला. ते सहन न झाल्याने त्यांनी आपला तंबू व सर्व साहित्य पेटवून दिले आणि त्यात स्वतःला झोकून देणार इतक्यात एक ब्राह्मण तेथे आला व त्याने गोदड महाराजांना सांगितले की आपण आपल्या गावी कर्नग्राम (आताचे नाव कर्जत) येथे जाऊन धर्मप्रचाराचे काम करावे व योग्य वेळ आल्यावर तेथे संजीवन समाधी घ्यावी. कामिका एकादशीला प्रत्यक्ष पांडुरंग येऊन तुमची भेट घेईल, असे सांगून तो ब्राह्मण तेथून गुप्त झाला. तो ब्राह्मण दुसरा कोणी नसून प्रत्यक्ष पांडुरंगच होता, हे महाराजांच्या लक्षात आले.
पांडुरंगाने सांगितल्यानुसार गोदड महाराज कर्जत येथे आले. कर्जत येथे त्यांनी ‘योगसिद्धांत’, ‘जगतारक’, ‘संतविजय’, ‘योगनिर्माण’ व ‘गोदड रामायण’ या ग्रंथांची रचना केली. याशिवाय तत्वज्ञान, अध्यात्म व वैद्यकशास्त्र यांसारख्या विषयांवर त्यांनी लेखन केले. त्याबरोबरच त्यांनी कामिका एकादशीला येथे पांडुरंगाचा रथोत्सव सुरू केला, तो आजतागायत सुरू आहे.
पांडुरंगाने दिलेल्या दृष्टांतानुसार माघ वद्य चतुर्थीला (१८३७ साली) मंगळवारी त्यांनी संजीवन (जिवंत) समाधी घेतली. त्या जागेवर आज मंदिर उभे आहे. विशेष म्हणजे समाधी घेण्याआधी गोदड महाराजांनी हे मंदिर बांधून घेतले होते. कर्जत शहरातील वर्दळीच्या भागात हे मंदिर आहे. मंदिराची रचना सभामंडप आणि गर्भगृह अशी आहे. सभामंडपातील संग्रहालयात गोदड महाराजांच्या दैनंदिन वापरातील वस्तू व त्यांचे ग्रंथ आहेत. गर्भगृहात चौथऱ्यावर गोदड महाराजांची आसनस्थ मूर्ती आहे. महाराजांच्या मूर्तीला शुभ्र वस्त्रे आणि फेटा परिधान करण्यात येतो.
कामिका एकादशीला येथे होणारा रथोत्सव प्रसिद्ध आहे. विठ्ठलाची मूर्ती असलेला हा रथ ओढण्यासाठी मिरवणुकीत हजारो भाविक सहभागी होतात. परंपरेनुसार या दिवशी महाराष्ट्र राज्य पोलिस विभागाचा मानाचा ध्वज सन्मानाने मंदिरात आणण्यात येतो. यावेळी येथे शेकडो पोलिस उपस्थित असतात. पंचक्रोशीतील अनेक गावांतून येथे दिंड्या आणल्या जातात. या दिवशी सर्वांचा लाडका पांडुरंग गोदड महाराजांच्या भेटीला कर्जतला येतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे कामिका एकादशीला संपूर्ण कर्जत शहरात गोदड महाराज व पांडुरंगाचा नामघोष सुरू असतो. असे सांगितले जाते की कर्जतकर रोजीरोटीसाठी देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात असले तरी या रथयात्रेच्या निमित्ताने त्यांची पावले कर्जतच्या दिशेने नक्कीच वळतात. या उत्सवाच्या निमित्ताने जत्रा भरते. त्यात कुस्त्यांच्या स्पर्धा होतात. देवस्थानच्या वतीने या दिवशी महाप्रसादामध्ये ‘शिपी आमटी’ (अहमदनगरमधील कर्जत परिसरातील प्रसिद्ध आमटी) भाविकांना देण्यात येते.
दरवर्षी माघ वद्य चतुर्दशीला येथे गोदड महाराजांचा समाधी सोहळा होतो. यावेळी मंदिरात सकाळपासूनच पूजा–अभिषेक आदी विधी होतात. गुढीपाडव्याला संवत्सर सोहळा व प्रत्येक एकादशीला दिंडी आणि कीर्तन असते. दररोज सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत भाविकांना गोदड महाराज समाधीचे दर्शन घेता येते.