अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर शहरापासून जवळ गणेशखिंड येथे गणपतीचे एक आगळेवेगळे स्थान आहे. हे स्थान ‘मंगळाचा गणपती’ म्हणून प्रसिद्ध आहे. ज्या व्यक्तीला मंगळ दोष आहे, त्या व्यक्तीने या गणपतीला अभिषेक केल्यास त्याचा ग्रहदोष नाहीसा होतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. राज्यात या नावाचे हे एकमेव स्थान असल्याचे सांगितले जाते. या स्थानाला धार्मिकतेसोबतच ऐतिहासिक किनारही आहे. थोर समाजसुधारक व क्रांतिकारक सेनापती बापट यांनी इंग्रजांना हुलकावणी देण्यासाठी या मंदिरात अनेक दिवस वास्तव्य केले होते, अशी नोंद आहे.
मंदिराची आख्यायिका अशी की भारद्वाज नावाचे वेदशास्त्रसंपन्न ऋषी स्नानासाठी नदीवर गेले असता तेथे जलक्रीडा करणारी अप्सरा त्यांना दिसली. तिचे सौंदर्य पाहून त्यांचे मन मोहित झाले. ऋषींकडून पापकर्म घडू नये, यासाठी त्यांचे तेज पृथ्वीने आपल्या उदरात गर्भरूपाने धारण केले. योग्य वाढ झाल्यानंतर पृथ्वीच्या उदरातून ते बाळ प्रकट झाले. पृथ्वीच्या उदरातून प्रकट झाला म्हणून त्याचे नाव ‘भूमिपुत्र’ असे पडले. या रक्तवर्णीय व गोंडस पुत्राचा पृथ्वीने ७ वर्षे सांभाळ केला. नंतर तिने त्याला त्याची जन्मकथा सांगून पिता भारद्वाज ऋषींकडे नेले. ऋषींनीही त्याचा स्वीकार केला. त्याच्यावर योग्य संस्कार करून ‘गणाना त्वा’ या गणेश मंत्राची दीक्षा देऊन त्याचे अनुष्ठान करण्यास सांगितले.
पित्याच्या उपदेशाप्रमाणे भूमिपुत्राने एका वनात राहून गणपतीची आराधना केली. १००० वर्षांच्या तपश्चर्येनंतर गणपती त्याच्यासमोर प्रकट झाले व त्यास वर मागण्यास सांगितले. ‘तुमच्या भक्तीत मला अढळपद लाभावे. चतुर्थीच्या दिवशी आपण दर्शन दिलेत म्हणून ही तिथी महापुण्यप्रद व्हावी. मला अमृतपान घडावे व माझ्या नावाची कीर्ती त्रिभुवनात व्हावी’ असा भूमिपुत्राने वर मागितल्यावर गणपतीने ‘‘तथास्तु भक्ता, यापुढे तुला ‘मंगळ’ नावाने ओळखले जाईल. मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीचे अधिक महत्त्व असेल. ही चतुर्थी मंगल, सुखकर, धन, आनंद व इच्छिलेले सर्व काही देणारी होईल. तुझा वर्ण अग्नीप्रमाणे तेजस्वी असल्यामुळे तुला ‘अंगारक’ व या चतुर्थीला ‘अंगारकी चतुर्थी’ म्हणतील. अंगारकी चतुर्थीचा उपवास केल्यास १२ चतुर्थींचे पुण्य लाभेल’’, असे अनेक आशीर्वाद देऊन गणपती तेथून अंतर्धान पावले. हा भूमिपुत्र मंगळ म्हणजेच नवग्रहामधील मंगळ ग्रह होय.
असे सांगितले जाते की या भुमिपुत्र मंगळाने गणेशाचे मंदिर बांधले, तेच हे गणेशखिंडीतील ‘मंगळाचे मंदिर’ म्हणून प्रसिद्ध आहे. राशीत मंगळ असणाऱ्या व्यक्तींनी येथील गणपतीची विधिवत पूजा करून मूर्तीला अभिषेक केल्यास त्यांचा मंगळ दोष निघून जातो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
पारनेर–आळकुटी रस्त्यावर चिंचोली घाट सुरू होण्यापूर्वी गणेशखिंडीकडे जाणारा मार्ग आहे. तेथून जवळच असणारे मंगळाचा गणपती हे मंदिर शांत व निसर्गरम्य परिसरात डोंगराच्या कपारीत वसले आहे. मंदिराच्या कमानीवजा प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर काही पायऱ्या उतरून मंदिर परिसरात प्रवेश होतो. मोठमोठ्या वृक्षांच्या छायेत असणारे हे प्राचीन मंदिर संपूर्ण दगडी व हेमाडपंती शैलीचे आहे. सभामंडप व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. सभामंडपात भलामोठा नंदी असून गाभाऱ्यात शेंदूरचर्चित गणेशाची अर्धमूर्ती आहे. या मूर्तीतील गणेशाचे कान व सोंड भव्य आहे. मंदिराच्या प्रांगणात एक विहीर व भुयारी मार्ग आहे. दर मंगळवारी व संकष्टी चतुर्थीला येथे भाविकांची गर्दी असते. अंगारकी चतुर्थीला मोठा उत्सव होतो. त्यावेळी हजारो भाविक गणेशखिंडीतील या मंदिरात दर्शनाला येतात.
पांडुरंग महादेव बापट ऊर्फ तात्या ऊर्फ सेनापती बापट यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथे झाला. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळातर्फे १९७७ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘सेनापती बापट : वाड्मय समग्र ग्रंथा’मधील उल्लेखानुसार सेनापती बापट यांचे वडील महादेव व आई गंगाबाई बापट हे दाम्पत्य गणेशखिंडीतील या गणपतीचे निस्सीम भक्त. ते या मंदिरात गणपतीची सेवा करीत असत. १९०३ साली तात्यांना मुंबई विद्यापीठाच्या बी. ए. परीक्षेत शिष्यवृत्ती मिळाल्यामुळे पुढील शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले; परंतु ब्रिटिशांविरोधात केलेल्या एका भाषणामुळे त्यांची शिष्यवृत्ती रद्द करण्यात आली. त्यामुळे त्यांना भारतात परतावे लागले. तोपर्यंत परदेशातील वास्तव्य काळात त्यांनी बॉम्ब बनविण्याची कला अवगत केली होती. तेव्हापासून इंग्रजांची त्यांच्यावर नजर होती. अनेकदा त्यांना इंग्रजांकडून अटकही झाली; परंतु पुरेशा पुराव्यांअभावी त्यांची सुटका होत होती.
असे सांगितले जाते की मंगळाचा गणपती मंदिरापासून सेनापती बापटांच्या पारनेर शहरातील घरापर्यंत भुयारी मार्ग आहे. या भुयारामध्ये अनेक लहान–मोठ्या खोल्या आहेत. इंग्रजांचा ससेमिरा चुकविण्यासाठी अनेकदा सेनापती बापट गणेशखिंडीतील या गणपती मंदिरात वा येथील भुयारात आश्रय घेत असत. त्या खोल्यांमध्ये सेनापती बापट व त्यांच्या सहकाऱ्यांकडून बॉम्ब व दारूगोळा बनविण्याचे काम होत असे. या भुयारी मार्गाची सध्या पडझड झाली असली तरी मंदिरापासून काही अंतरापर्यंत भुयारात जाऊन तेथील खोल्या पाहता येतात.